Monday, 1 April 2013

एक 'एप्रिल फूल ' मुलाखत !



सनदी अधिकारी म्हणून आम्हाला पदरात घ्या अशी विनंती गेली कित्येक वर्षे आम्ही राज्य शासनाकडे करतोय . आमच्या अर्ज-विनंत्यांना मान देऊन शेवटी त्यांनी आमची कलेक्टरकीसाठी  मुलाखत घ्यायचं ठरवलं . आणि मुलाखतीसाठी आम्हाला थेट मंत्रालयात पाचारण केलं . तिथे झालेल्या आमच्या मुलाखतीचा हा वृत्तांत … 



(मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी आमचा बायो-डाटा वाचला आणि पहिला प्रश्न विचारला )

तुम्ही मराठवाड्यातले दिसता.  सांगा पाहू दुष्काळ म्हणजे काय ?
 दुष्काळ हा तीन प्रकारचा असतो. ओला  दुष्काळ ,कोरडा दुष्काळ आणि  अकलेचा दुष्काळ .
पहिले दोन दुष्काळ परवडतात  पण तिसऱ्या प्रकारचा दुष्काळ हा  फार वाईट असतो .  अकलेचा दुष्काळ असला की  बाकी दोन प्रकारचे दुष्काळ त्यामागे आपोआप चालत येतात.
अकलेच्या  दुष्काळाला स्थलकालाचे बंधन नसते.  किंबहुना काही भागात हा दुष्काळ endemic म्हणून असतो . गीतेत ज्याला 'स्थानुरचलोयम  सनातनः'  म्हटले आहे तसा तो काही भारतीय राज्यकर्त्यांच्या ठायी दिसून येतो.
प्रशासनाच्या भाषेत त्याला 'नियोजनाचा अभाव' किंवा फारच sophisticated  शब्द  द्यायचा झाला तर 'policy paralysis' असेही म्हणतात .
हजारो कोट खर्चूनही केवळ  शून्य पॉईन्ट  काहीतरी टक्के शेतजमीन  सिंचनाखाली येणे, दुष्काळप्रवण  भाग आहे हे माहित असूनही साठ पासष्ट वर्षात काहीही ठोस उपाय-योजना न करणे  ही अकलेचा दुष्काळ पडल्याची  काही उदाहरणे देता  येतील .

जल-सिंचन खात्याची कार्ये सांगा. 
 जल सिंचन खात्याला सोन्याचे  अंडे देणारी कोंबडी असेही म्हणतात . महाराष्ट्रात नुकत्याच उघडकीस आलेल्या काही घटनांवरून ही  कोंबडी काहीजणांनी कापून खाल्ली असा संशय आहे.

तुम्हाला कार्ये विचारलीत तुम्ही व्याख्या सांगताय!
sorry  सर … जल-सिंचन खात्याचे मुख्य कार्य म्हणजे पाट बंधारे प्रकल्पांची टेंडरं भरणे आणि त्यातून अमाप पैसा खाणे . असे करताना तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांचे  उखळ पांढरे होईल याकडे खास लक्ष दिले जते. प्रकल्पाची जागा चुकली तरी चालेल पण कार्यकर्ता  नाराज नाही झाला पाहिजे हे या खात्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. म्हणूनच हे खाते नेहमीच वजनदार माणसाकडे दिले जाते. वर सांगितलेल्या कार्यांव्यातिरिक्त  दुष्काळाची उपाययोजना म्हणून जलसंधारण  करणे वगैरे चिल्लर कामेही जल-सिंचन खात्याला करावी लागतात . पण ही  कामे दुय्यम किंवा वैकल्पिक समजण्याची महाराष्ट्रात प्रथा अहे.

 घटनेतील कलम ३७१   कशाबद्दल आहे  ?
विभागीय असमतोल  राहू नये  व 'अनुशेष! अनुशेष!' म्हणून गळा काढून आपली झोळी भरणाऱ्या राजकारण्यांची पिलावळ निपजू नये म्हणून घटनेतच अशा प्रकारच्या राजकारण्यांची नसबंदी करण्याची तरतूद  आहे . ती म्हणजे  कलम  ३७१   अंतर्गत असलेली वैधानिक विकास महामंडळे . तथापि हे कलाम सत्ताधारी  पक्ष धाब्यावर बसवतात . कारण तसे केले नाही तर खरच समतोल विकास साधेल  आणि विकासाच्या राजकारणाशिवाय पर्याय राहणार नाही अशी धास्ती त्यांना वाटत रहाते .

राज्यात विविध महामंडळे स्थापन करण्यामागचा  हेतू काय आहे ?
 लोकमतावर निवडून यायची क्षमता नसलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हा या महामंडळांच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू असतो . मर्जीतल्या लोकांची,, इमानी नोकरशहांची ,पडेल नेत्यांची या महामंडळावर नेमणूक करून त्यांनी केलेल्या सेवेची पावती देणे हा आपल्याकडे एक राजकीय शिरस्ता आहे.

अशी काही अजून उदाहरणे तुम्हाला देता  येतील का?
होय सर. राज्यसभा आणि विधान परिषदा हि अनुक्रमे राष्ट्रपातळीवरील आणि राज्यपातळी वरील सर्वात मोठी राजकीय पुनर्वसन केंद्रे आहेत.
 
राज्यपाल जास्त पावरफुल असतो कि राष्ट्रपती ?
नर्मदेचा गोटा  जास्त गुळगुळीत असतो कि गंगेचा ?

तुम्ही मुलाखत द्यायला आलात कि घ्यायला आलात?
सॉरी सर!  संसदीय लोकशाहीमध्ये  कार्यकारी मंडळ जर इमानेइतबारे  काम करील तर या पदांना फार महत्व उरत नाही . म्हणूनच या पदांना  'Rubber stamp 'ची उपमा दिली जाते. माझ्या ओळखीचे  एक थोर राजकीय विचारवंत   'राष्ट्रपती हे भारतीय राज्यघटनेचे अपेंडिक्स आहे'  या मताचे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे विभाजन करून वेगळा विदर्भला मान्यता द्याला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते?
 एक न धड भरभर चिंध्या करून काही उपयोग होईल असे मला वाटत नाही . रक्त सांडून आपण एकसंध महाराष्ट्र घेतला आणि आता आपणच त्या महाराष्ट्राला ओरबाडून रक्तबंबाळ   करतोय .  वेगळा विदर्भ केला काय अन वेगळा मराठवाडा केला काय आपल्यासमोरच्या समस्य….   

सध्या महाराष्ट्रासामोरील मुख्य समस्या कोण कोणत्या आहेत?

दुष्काळ, प्रादेशिक असमतोल, कायदा सुव्यवस्था, नक्षलवाद, स्त्री-भृणहत्या ,दलितांवरील अत्याचार…   सर तुमच्याकडे वेळ किती आहे.?त्याचं  काय रात्री ११ ला माझी शेवटची लोकल असते.

'good governance'  म्हणजे काय?
माफ करा सर, मला या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित नाही .  मला तर वाटते काही प्रशासकीय विचारवंतांच्या डोक्यातून निघालेली ही एक कपोलकल्पित संकल्पना असावी .  good governance  ही  'नेती-नेती' न्यायाने  अभावातूनच लक्षात घेण्याची संकल्पना अहे. तथापि , नागरिकांच्या अन्न, पाणी ,वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पुरेशा प्रमाणात भागवल्या गेल्या तरी सुशासन आहे असे म्हणता येईल  असे मला वाटते .

(यानंतर मंडळातल्या दुसऱ्या सदस्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.)

तुमच्या hobbies  and  interests मध्ये तुम्ही 'spirituality' असं  लिहिलय.  spirituality  म्हणजे काय?
spirituality ला सोप्या भाषेत 'बुवागिरी' असे म्हणतात .  धार्मिकतेच्या  नावाखाली स्वतःचे प्रस्थ वाढवून घेणे हा बुवागीरीचा हेतू असतो . त्यासाठी फार उच्च दर्जाचे talent  लागते . प्रशासनात जर काही जुगाड नाही जमला तर पुढे बुवागीरीतच करीअर  करायचे असा माझा विचार आहे. परमपूज्य आसारामजी बापू हे माझे आदर्श आहेत.

बुवाबाजीच करायची तर मग प्रशासनात का येताय ?
सर, बुवागीरीसाठी जो attitude लागतो तो प्रशासनामध्ये काम केल्याने develop  होईल असा माझा विश्वास आहे.   प्रशासकीय अधिकाऱ्यांचा  मख्खपणा- म्हणजेच कितीही समस्या आल्या तरी निर्विकार रहाणे- हा खरे तर एक आध्यात्मिक गुण आहे. गीतेत ज्याला 'समशीतोष्ण सुखदुखेषु' असं  म्हटलंय तो एक तर अधिकारी असू शकतो नाहीतर बाबा!  प्रशासनात मला या skill development ची संधी तर मिळेलच शिवाय माझ्या कारकिर्दीत निर्माण झालेले राजकीय हितसंबंध पुढे बाबागीरीत उपयोगी पडतील असे मला वाटते .

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वहात आहे. या निवडणुकीत मुख्य मुद्दे काय असतील असं  तुम्हाला  वाटतंय?
राहुल गांधीने लग्न करावे की  नाही; करावे तर कुणाशी करावे; संजय दत्तला अटक ह्वावी कि नाही; असे बरेच गंभीर मुद्दे यावेळच्या निवडणुकीच्या तोंडावर उभे राहिलेले आहेत.  शिवाय तोंडी लावायला आर्थिक मंदी , अंतर्गत सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई, बलात्कार  इत्यादी चावून चोथा झालेले  विषयही आहेत. तथापि भारतीय लोकशाहीची परंपरा पाहता यावेळेसही जातीय समीकरण आणि पैसा हेच मुख्य मुद्दे ठरतील असा माझा अंदाज आहे.

राज ठाकरे यांच्या राजकीय शैलीबद्दल तुमचे काय मत आहे?
(या प्रश्नाचे उत्तर आम्ही जाहीर करू इच्छित नाहि. प्रश्न अभिव्यक्तीचा नाही . प्रश्न वैयक्तिक  सुरक्षेचा आहे.)

(यानंतर  मुलाखत मंडळाच्या तिसऱ्या  सदस्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली . )

आर्थिक तूट म्हणजे  काय?
राज्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये अंगापेक्षा बोंगा मोठा झाला की जी परिस्थिती उद्भवते तिला आर्थिक तूट म्हणतात .

त्यावर उपाय म्हणून काय करतात?
आर्थिक तूट  घालवण्याचा सोपा उपाय म्हणजे उधारी घेणे . माझ्या वैयक्तिक अनुभवावरून कुठल्याही आर्थिक समस्येवर मला हा फारच नामी उपाय वाटतो . यात परतफेड नाही करता आली तर दिवाळखोरी जाहीर करता येण्याचाही पर्याय असतो. उधार उसणवारी करणे  हे आपल्या सामाजिक संस्कृतीचेच   नव्हे तर आर्थिक धोरणाचेही महत्वाचे अंग आहे. आपला देश जागतिक बँकेकडे उधारी मागतो, दुष्काळात आपले राज्य केंद्राकडे उधारी मागते. तेव्हा कुठलाही संकोच न बाळगता  "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हे  आपल्या आर्थिक धोरणाचे तत्त्व म्हणून स्वीकारायला हवे . पूर्व नियोजन करून किंवा कष्ट करून संचित जमवण्यापेक्षा  'तंगी आली की हात पसरणे' हीच  जास्त pragmatic economic policy आहे असे मला वाटते.    

गुड! तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून नेमल्यास तुम्ही प्राधान्याने कोणत्या गोष्टी कराल?
सर्वप्रथम मी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष घालीन . महाराष्ट्र पोलिसांना आमदार- खासदारांच्या गाड्यांचे नंबर माहित नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन झाले इत्यादी  क्षुल्लक कारणावरून पोलिस मुर्खासारखे त्यांच्या गाड्या अडवतात आणि मार खातात . यासाठी  पोलिसांना खास प्रशिक्षण देउन व्हि. आय . पी . च्या गाड्या कशा ओळखायच्या , अशी गाडी आली कि नियमपुस्तिका बाजूला ठेवायची आणि लवून मुजरा कसा करायचा याचे ट्रेनिंग देण्यात येईल. दुसरी मुख्य समस्या म्हणजे शिक्षकांचा संप . यावर तोडगा म्हणून उच्च शिक्षणाचे खाजगीकरणच केले पाहिजे. म्हणजे 'तुला न मला, घाल कुत्र्याला' असे होइल आणि प्राध्यापक मंडळी  थंडगार पडतील. असंही  शिक्षणाचा आणि आयुष्यातील यशाचा काही संबंध नसतो अशी माझी धारणा असल्यामुळे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा काही प्रश्नच  नाही .
या गोष्टी राबवणे खूप अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण 'एक धडाडीचा प्रशासक' अशी प्रतिमा बनवायची असेल तर असे कठोर निर्णय घेतलेच पाहिजेत असे मला वाटते .

व्हेरी गुड! तुम्ही पेपर कुठला वाचता?
 सर मी कुठलाच पेपर वाचत नाही.  पेपरात बातम्या कमी आणि भंकस जास्त असते. पेपर वाचल्याने विचारांची आणि मतांची originality दूषित होते अशी माझी धारणा आहे . त्यामुळे पेपरच काय पण कुठल्याच  छापील गोष्टीवर माझी श्रद्धा नाही .
माझ्यातला अंगभूत आळशीपणा हे त्यामागचे दुसरे कारण आहे.    

पुढचा प्रश्न विचारणार इतक्यात  बाहेर "आग! आग!" "पळा!पळा !" असा गोंधळ सुरु झाला . मुलाखत मंत्रालयात चालू  असल्यामुळे लागलेल्या  आगीबद्दल  शंका असण्याचे काही कारणच नव्हते .  अध्यक्षांनी घाईघाईने मुलाखत संपली असा इशारा करून पळ  काढला . आणि माझी मुलाखत संपली .

मित्रहो!  आता काही दिवसातच माझा निकाल लागेल . मुलाखत वाचून तुम्हाला काय वाटतंय.  होईल की  नाही माझं  सिलेक्शन ?



Thursday, 24 January 2013

व्हीलचेअर



अमीबापासून  ते  आजोबापर्यंत कोणीच नपुंसक निघालं  नाही 
कोणीही लग्नाआधी मेलं नाही 
की कोणीच सन्याशी झालं नाही 
चमत्कार म्हण षडयंत्र म्हण 
बाप,तू जन्माला आलास 


तू जन्माला आलास बाप आणि पाचव्या दिवशी सटवाईनं 
तुझ्यासोबत माझ्याही कपाळावर चित्रकथा  कोरली 
त्या क्षणापासून बाप माझ्या आयुष्याची गुंतावळ 
तुझी देणेकरी झाली 


पालं उचलून तू आम्हाला शेतापासून लांब 
शहरात घेउन आलास 
तेव्हापासून बाप अगदी तेव्हापासून 

तुझा संघर्ष 
तुझी शर्यत 
तुझी गरिबी 
तुझी दहशत
मुस्कटदाबी माझ्या श्वासांची 
घुसमट गुदमर करीत राहिले 

दोष, उपदेश, भाकरी, 
तुझ्या जनुकांची गुलामगिरी 
या रिंगणात बाप 
कधी मी इडीपस  कधी तू ययाती 
बनत राहिलो, कण्हत राहिलो 


आता मला  सांग बाप
आता मला सांग  
आयुष्याच्या संध्याकाळी 
खिडकीत बसून विषण्ण नजरेने 
दूरवर बघत असतोस तेव्हा 
तुला नेमकं काय आठवतं 

तीस वर्षाची मास्तरकी ? 
कपाटाच्या किल्ल्या ?
नदीतला डोह ?
गीतामाईचा पदर ?
भांडून गेलेला पूत  ?
सरणावरची लेक ...?

खरं सांग बाप 
कॅन्सरनं पांगुळलेलं शरीर घेऊन 
व्हीलचेअर वर बसल्यावर आज 
तुला नेमकं काय काय आठवतं ? 









Thursday, 28 June 2012

पावसाळा


पावसाळा. लहानपणी चिखलात अंगठे रोवून शाळेत जाणारा.
पावसाळा. मळ्यात आंब्याच्या झाडावर चढून पानावरून गळणारी टीप टीप पाहणारा.
पावसाळा. सायकलवरून भिजत कॉलेजात जाणारा. हट्टानं प्रत्येक पावसात भिजणारा. 
पावसाळा . रात्रीच्या अंधारात मद्यधुंद गझल ऐकणारा.
पावसाळा.  रेशीमस्पर्शाने गात्रांचा उत्सव सजवणारा.
पावसाळा. तुझ्या निरोपाचा.
पावसाळा. नुसताच.

Thursday, 3 May 2012

... आपली शाळा पुन्हा भरवा !




तीर्थरूप मास्तर, 
तुम्ही गेल्याचं कळलं... खूप खूप दुःख झालं मास्तर .एवढं दुःख बाप मेला तेव्हाच झालं होतं.
कळायला लागल्यापासून तुम्हाला बघतोय मास्तर .तुमचा तो जाड फ्रेमचा चष्मा आता मिळत नाही बाजारात. (आता बाजारात पिझ्झा, मोबाईल आणि शिक्षण मिळतं.)
तुमचा तो ट्रेड मार्क चष्मा, चुरगळलेला पांढरा सदरा, आणि पांढरी ढगळ पतलून ...लहानपणापासून तुम्ही जुनेच वाटायचात मास्तर .पण  तो  उत्साह..एवढा उत्साह आणायचात  कुठून मास्तर? दहावीला बोर्डात आलो तेव्हा लहान मुलासारखं कडेवर घेवून नाचलात मला! केवढा ओशाळलो होतो तेव्हा..वर्गमित्र अजूनही चिडवतात... कधी भेटलेच तर! पण तुमचा विषय आता फारसा निघत नाही. कुणी काढत नाही. जुनी  कोवळीक आठवणीतही सोसवत नाही कुणालाच आता...
वर्गात यायला मला नेहमीच उशीर व्हायचा तेव्हा अख्ख्या  वर्गासमोर  'कोंबडी' ची  शिक्षा द्यायचात. कान पकडून खाली वाकल्यावर तुमच्या चपलीचा तुटलेला अंगठा दिसायचा...किती वर्षे एकच जोड  वापरत होतात मास्तर? 
निकालाचे पेढे द्यायला तुमच्या घरी यायचो तेव्हा मंगळवार पेठेतल्या तुमच्या त्या दोन खोल्याच्या कळकट बसक्या घरात आणि तुमच्यात मला फारसा फरक वाटायचा नाही... आताच्या मास्तरांनी गावात plotting चा धंदा सुरु केलाय. नुसत्या पगारावर कुठं भागतंय  आजकाल मास्तर! सोबतीला शिकवण्या, real -estate  , राजकारण असं काहीतरी करावंच लागतं की...तसं आताच्या मास्तरांना मास्तर म्हटलेलंही आवडत नाही. पण टी - शर्ट घालणाऱ्या , आणि शाळेच्याच टपरीसमोर गुटखा चघळणाऱ्या  या पोरांना 'मास्तर' म्हणवत देखील नाही...सर्व शिक्षा अभियान , मिड डे मिल , पट पडताळणीच्या गदारोळात गुरु मात्र हरवलाय !
फाशी घेउन मेलात मास्तर!
बातमीत त्यांनी  छापलं होतं तुमच्या मागे परिवार नाही. पोरकं करून गेलात मास्तर, पण  जाताना डोक्यावर फार मोठे ओझे ठेवून गेलात. तुमच्या मरणाचं दुःख एकवार सोसवेल मास्तर, पण तुमच्या संस्कारांचा भार सोसवत नाही . 
तुम्ही  म्हणायचात तसं पाय ठेवील तिथे पांढरी कमळे  उगवीत गेलो मी,पण आज माझ्या अंगावर फक्त    चिखलच उरलाय मास्तर!
तुम्ही काय गांधी- टोलस्टोयच्या गोष्टी  सांगायचात पण असलं काहीच चालत नाही इथे .  तुम्ही कसलं  ते मूल्य-शिक्षण म्हणायचात...आज शिक्षण विकत मिळतंय, उद्या  मास्तर मूल्येही मिळतीलच की...तुम्ही सांगायचात तसं काही होत नसतं... भव्य ,उदात्त असलं  आयुष्यात काहीच नसतं ,जे काही असतं ते फारच मुलभूत आणि भोंगळ असतं...नागड्या जगात नागडंच होऊन जगावं लागतं ..आता भेटलात कधी तर मीच तुमची शिकवणी घेईन म्हणतो...
पण हेसुद्धा फार उशिरा कळलं मास्तर! 
रागावू नका मास्तर, पण पाटी आणि दप्तर सावरण्याच्या नादात प्रभातफेरी फार पुढे निघून गेली हे कळेस्तोवर आयुष्य मध्याह्नी आलं होतं...वर्गात नेहमी पुढच्या बाकावर बसलो पण आयुष्यात मात्र मागे राहिलो मास्तर... तुम्ही अभिमानाने 'माझा  विद्यार्थी'  म्हणून ओळख करून द्यावी अशांपैकी मी काहीच झालो नाही. गर्दीतलाच एक निनावी चेहरा बनलोय. लोकलने अप-डाऊन करतो मास्तर, ई. एम. आय. भरून संसार करतो, ऑफिसात बसून  तिकिटाच्या कागदावर महिन्याचे हिशोब जुळवीत असतो. दिवस रात्र भेदरलेला असतो मास्तर, दाखवत नाही कुणाला पण आतून नुसता फाटलेला असतो. चेहऱ्यावरची घडी विस्कटू देत नाही मी वर्षभर...पण १५ ऑगस्टला, 'ऐ मेरे वतन के लोगो' ऐकू आलं की आपोआपच  रडू येतं मास्तर!!!
आपली शाळा पांगली मास्तर, बालपण कुठल्याकुठे विरून गेलं...आणि  तुमच्यासोबत आता निरागस चांगुलपणाशी असलेलं नातं देखील..
खूप खूप एकटं  वाटतंय मास्तर...
सोडून गेलात मास्तर! . 
पहिल्या पगारावर तुम्हाला एक नवा कोरा सदरा  घेउन द्यायचा होता, कुठे खूप मोठा अधिकारी झालो तर भाषणात तुमचं नाव घ्यायचं होतं, वेळ काढून तुमच्या घरी एकदा भेटायला यायचं होतं,तुमचे सुरकुतलेले हात हातात घेउन माहेरवाशिणीसारखं  गुज करायचं होतं... सगळ्या जगाचे गाऱ्हाणे तुमच्याकडे सांगून तुमच्यापाशी मनभरून रडायचं होतं...
माफ करा मास्तर , यातलं काहीच करू शकलो नाही.
पण, एकदा या की मास्तर!
परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा ! 
पुन्हा एकदा वर्गात तोच चुरगळलेला सदरा आणि  पतलून घालून या...पुन्हा एकदा मला  शिक्षा करा, पुन्हा एकदा जाड भिंगाचा चष्मा सावरीत आम्हाला त्या हितोपदेशाच्या गोष्टी सांगा...परत या मास्तर, आपली शाळा पुन्हा भरवा ! 














Tuesday, 6 March 2012

होळीची कविता- 'कॉन्डोमचे चाराणे




सर्व  मित्रांना  कळविण्यात  अत्यंत  आनंद  होतो  की  यंदाच्या  होळी निमित्त आपणा सर्वांसाठी  प्रेमाची एक 'आंबट'  भेट  म्हणून  आम्ही  एक  कविता  सादर  करीत आहोत.  तथापि  सदरील  कविता  'फक्त प्रौढांसाठी'  या  गटात  मोडणारी  असल्यामुळे  (थोडे  सभ्यतेच्या  हव्यासापोटी आणि  थोडे  कपिल सिब्बलच्या भीतीपोटी)  आम्ही ती  जाहीरपणे  प्रकाशित  करू शकत नाही.  पण  टायटल  वाचून  एव्हाना  चाळवलेली  तुमची रसिकता ( आंबटशौकीनपणा ) भंग  पावू  नये  म्हणून  आम्ही  त्यावर  एक  तोडगाही  काढला  आहे.  सर्व  इच्छुकांनी आपआपला  ई-मेल आयडी  ह्या पोस्टखालील  कॉमेंट  मधे द्यावा.  कविता  तात्काळ  आपल्या  'इन-बॉक्स' मधे पोचती केली जाईल.  इच्छुकांमध्ये  आमच्यापेक्षाही  कुणी  लोकलज्जेला  घाबरणारे  असतील  तर त्यांनी गुपचूप  आपला  ई-मेल आयडी  आम्हास  मेसेज करावा.  "आपली प्रतिष्ठा हीच आमची प्रतिष्ठा"  असे  मानून आम्ही आपली माहिती गोपनीय ठेवू. पामराच्या कवितेमुळे होळीच्या आपल्या आनंदात तिळभर का होईना भर पडावी 'तेवढी माझी कमाई'!
आपण सर्वांना हुताशनी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपलाच - फकीरा.

Friday, 30 December 2011

आयुष्यात पहिल्यांदाच मी दारू आज पिणार आहे



आयुष्यात  पहिल्यांदाच मी  
दारू आज  पिणार आहे 
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 


          जहाल  मवाळ  गोडसे  गांधी 
              मित्र  आपले  छंदी  फंदी 
         Thirty First ची  साधून  संधी 
              आज माजवू अंदाधुंदी
धाक धूक थोडं होणार आहे ,पण घेणार  म्हणजे घेणार   आहे
            आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
              दारू आज  पिणार आहे 


               धुंद  ,मंद ,आंबट ,धुरकट
               बार मधली मादक सृष्टी 
             ए. सी. मध्ये बसल्या बसल्या 
             हळूच  रमतील  गप्पा   गोष्टी
बोलका  मी  ही   होणार  आहे ,ऐटीत  order   देणार  आहे 
               आयुष्यात पहिल्यांदाच मी 
                 दारू आज पिणार आहे 


         कसली भीड कसली लाज  
          सज्जनतेचा  सारा साज 
        पेल्यामध्ये
                उतरवून 
                         आज
       म s स्त  मौला   होणार  आहे
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 

                 (ओता  रे  ओता )
           आठवून  साऱ्या  जुन्या  आयटम
           पहिला  पेग  "top to bottom "
                    (cheers!)
            पहिली  स्साली         सोडून  गेली 
   दुसरी  भोळी         उगाच  भ्याली 
              तिसरी  च्यायला       बायकोच  झाली 
         चौथी  म्हणजे        माझी  साली !
    आढे   वेढे   घेणार   नाही , सगळं  खरं   सांगणार  आहे, 
                आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
             दारू
        आज  
पिणार आहे 

              यश -अपयश   सारंच  vague
              त्याच्या  साठी  दुसरा  पेग 
             मागवून  ठेव  लगेच  तिसरा  
             life चा पार  झालाय  कचरा 
पाचवा  
  सातवा 
   सहावा
     आठवा 
          मागोमाग  लगेच  पाठवा 
cock-tail भारी करणार आहे, बेफाम  होऊन  पिणार  आहे, 
          आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
            दारू आज  पिणार आहे

"एवढ्यातच   अक्कराss  वाजले  भाई ?
अजून   सिग्रेट  कशी  पेटली  नाही ?"
deeeep  कश  ओढणार   आहे... 
डोळे  मिटून  घेणार  आहे.......... 
ग 
       र 
ग 
          र 
त्या 
          मग  
             भो व ऱ्या म ध्ये 
क्षणभर बुडून  जाणार आहे

सेंटी-बिंटी  होणार आहे, मुकेश-फिकेश गाणार आहे
 आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू आज  पिणार आहे 


“आत्ता  कस्सं मस्स्त  वाटतंय !, सा sला सगळंच  double दिसतंय... ”
           “आयुष्याची  कर्मकहाणी  तुला  सांगतो  ऐक  रे  भावा... ”
“चखणा सारा  तुम्हीच  खावा,  मला  अजून  एक  पेग  हवा ”
          Dialogues भारी  मारणार  आहे ,माहौल करून सोडणार  आहे 
आयुष्यात    पहिल्यांदाच    मी 
    दारू आज 
  पिणार  आहे


अटक   मटक   चवळी  चटक 
चल  रे  पांडू  साईडला  वटक 
          फेकून  थोटूक  करीन  चेटूक 
          काय  रे *** बघतोस  टुकटुक 
मोडून मुंडी मुरगळून टाकीन
ash tray मधे चुरगाळून टाकीन 
        वैताग  बाहेर  काढणार  आहे , भैन*द  माद**द  म्हणणार  आहे 
                     आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू 
आज 
 पिणार
 आहे


           तुला  माझी  शप्पथ  भाऊ 
                     अजून  एक  पेग  घेऊ 
                               स्टेशनवरती  भुर्जी  खाऊ   
                                       झालाच  बार  बंद  तर 
                                                मागच्या  दाराने  बाहेर  जाऊ 
                        टल्ली  टल्ली  होणार  आहे , वरतून  पार्सल नेणार  आहे 
                                                                   आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
                                                                               दारू आज  पिणार आहे 


नंतर पान खाणार आहे,  
चटणी चमन   रोजचंच  आहे , १२०-३०० मागवणार आहे   
  
                      बरळत 
               बरळत
         बोलता
 बोलता, 
       झुलत   
            झुलत  
                  चालता
                        चालता, 
मधेच थांबून रस्त्यावरती 
आयुष्याच्या तोंडावरती  
     'पच्चाssक्'
-कन्  थुंकणार आहे 
उमाळे  गिळून घेणार आहे, जरा डोळे  टिपणार आहे,

नंतर 
गाढ झोपणार आहे,
ठार मरून जाणार आहे 
सकाळी मात्र उद्या मी 
पुन्हा  कंबर  कसणार  आहे!  
नव्या  वर्षाचा  गालगुच्चा  घेऊन 
"काय  रे  बबड्या !" म्हणणार आहे!

 हे सगळं पुढचं पुढे, पण 
आजचा प्लान (लई  भारी ) जमणार  आहे
संध्याकाळ पर्यंत थांबतंय  कोण
दुपारीच बैठक रंगणार आहे  

 कारण 

आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
 दारू आज  पिणार आहे.
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
आयुष्यात पहिल्यांदाच मी 
   दारू आज पिणार आहे 


 (टीप  - कविता  हेच  आग्रहाचे  निमंत्रण  समजावे ) 

Thursday, 8 December 2011

मंत्र्याचे पसायदान

                 मंत्र्याचे पसायदान
('फकीरगाथा' अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२ )


आता हायकमांडे देवे ।  येणे सत्तायज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।   'कॅबिनेट' हे  ।।१।।

जे विपक्षांची व्यंकटी सांडो ।  तया फुटीरांची गती वाढो।
अपक्षांशी  आपुले पडो ।   मैत्र जीवाचे  ।।२।।
 
अल्पमताचे तिमिर जावो ।  जनकौलही म्याची पाहो । 
जो जे वांछील तो ते लाहो।   मंत्रिजात  ।।३।।

'वर्षा' त सांजसकाळी ।  सत्तानिष्ठांची मांदियाळी ।
तयांत 'फायनान्सर' मंडळी ।  भेटतु या भूता  ।।४।।

करा अस्मितेचा आरव ।  गाठा दिल्लीश्वराचे गाव ।
करिता तेथ आर्जव ।   फायद्याचे  ।।५।।
 
लोकनेते जे अलांछन ।   बुद्धिमंत जे निष्कांचन ।
ते झाडून सर्व सज्जन ।   कचरा होतु  ।।६।। 

किंबहुना सर्व सुखी ।  उरी बसुनी इये लोकी ।
भजितो मी  हीच खुरची ।   अखंडित  ।।७।।
 
आणि सत्तोपजीविये ।  राहोनि मन्त्रिपदी इये ।   
लुटालूट जी म्या करो जाये ।   वाटून घ्यावी  ।।८।।
 
तेथ म्हणे हा घडला ठराओ ।   हा होईल दान पसावो । 
येणे वरे मंत्रीदेवो ।  सुखिया झाला  ।।९।।