Friday 30 December 2011

आयुष्यात पहिल्यांदाच मी दारू आज पिणार आहे



आयुष्यात  पहिल्यांदाच मी  
दारू आज  पिणार आहे 
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 


          जहाल  मवाळ  गोडसे  गांधी 
              मित्र  आपले  छंदी  फंदी 
         Thirty First ची  साधून  संधी 
              आज माजवू अंदाधुंदी
धाक धूक थोडं होणार आहे ,पण घेणार  म्हणजे घेणार   आहे
            आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
              दारू आज  पिणार आहे 


               धुंद  ,मंद ,आंबट ,धुरकट
               बार मधली मादक सृष्टी 
             ए. सी. मध्ये बसल्या बसल्या 
             हळूच  रमतील  गप्पा   गोष्टी
बोलका  मी  ही   होणार  आहे ,ऐटीत  order   देणार  आहे 
               आयुष्यात पहिल्यांदाच मी 
                 दारू आज पिणार आहे 


         कसली भीड कसली लाज  
          सज्जनतेचा  सारा साज 
        पेल्यामध्ये
                उतरवून 
                         आज
       म s स्त  मौला   होणार  आहे
         आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
           दारू आज  पिणार आहे 

                 (ओता  रे  ओता )
           आठवून  साऱ्या  जुन्या  आयटम
           पहिला  पेग  "top to bottom "
                    (cheers!)
            पहिली  स्साली         सोडून  गेली 
   दुसरी  भोळी         उगाच  भ्याली 
              तिसरी  च्यायला       बायकोच  झाली 
         चौथी  म्हणजे        माझी  साली !
    आढे   वेढे   घेणार   नाही , सगळं  खरं   सांगणार  आहे, 
                आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
             दारू
        आज  
पिणार आहे 

              यश -अपयश   सारंच  vague
              त्याच्या  साठी  दुसरा  पेग 
             मागवून  ठेव  लगेच  तिसरा  
             life चा पार  झालाय  कचरा 
पाचवा  
  सातवा 
   सहावा
     आठवा 
          मागोमाग  लगेच  पाठवा 
cock-tail भारी करणार आहे, बेफाम  होऊन  पिणार  आहे, 
          आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
            दारू आज  पिणार आहे

"एवढ्यातच   अक्कराss  वाजले  भाई ?
अजून   सिग्रेट  कशी  पेटली  नाही ?"
deeeep  कश  ओढणार   आहे... 
डोळे  मिटून  घेणार  आहे.......... 
ग 
       र 
ग 
          र 
त्या 
          मग  
             भो व ऱ्या म ध्ये 
क्षणभर बुडून  जाणार आहे

सेंटी-बिंटी  होणार आहे, मुकेश-फिकेश गाणार आहे
 आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू आज  पिणार आहे 


“आत्ता  कस्सं मस्स्त  वाटतंय !, सा sला सगळंच  double दिसतंय... ”
           “आयुष्याची  कर्मकहाणी  तुला  सांगतो  ऐक  रे  भावा... ”
“चखणा सारा  तुम्हीच  खावा,  मला  अजून  एक  पेग  हवा ”
          Dialogues भारी  मारणार  आहे ,माहौल करून सोडणार  आहे 
आयुष्यात    पहिल्यांदाच    मी 
    दारू आज 
  पिणार  आहे


अटक   मटक   चवळी  चटक 
चल  रे  पांडू  साईडला  वटक 
          फेकून  थोटूक  करीन  चेटूक 
          काय  रे *** बघतोस  टुकटुक 
मोडून मुंडी मुरगळून टाकीन
ash tray मधे चुरगाळून टाकीन 
        वैताग  बाहेर  काढणार  आहे , भैन*द  माद**द  म्हणणार  आहे 
                     आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
  दारू 
आज 
 पिणार
 आहे


           तुला  माझी  शप्पथ  भाऊ 
                     अजून  एक  पेग  घेऊ 
                               स्टेशनवरती  भुर्जी  खाऊ   
                                       झालाच  बार  बंद  तर 
                                                मागच्या  दाराने  बाहेर  जाऊ 
                        टल्ली  टल्ली  होणार  आहे , वरतून  पार्सल नेणार  आहे 
                                                                   आयुष्यात  पहिल्यांदाच मी 
                                                                               दारू आज  पिणार आहे 


नंतर पान खाणार आहे,  
चटणी चमन   रोजचंच  आहे , १२०-३०० मागवणार आहे   
  
                      बरळत 
               बरळत
         बोलता
 बोलता, 
       झुलत   
            झुलत  
                  चालता
                        चालता, 
मधेच थांबून रस्त्यावरती 
आयुष्याच्या तोंडावरती  
     'पच्चाssक्'
-कन्  थुंकणार आहे 
उमाळे  गिळून घेणार आहे, जरा डोळे  टिपणार आहे,

नंतर 
गाढ झोपणार आहे,
ठार मरून जाणार आहे 
सकाळी मात्र उद्या मी 
पुन्हा  कंबर  कसणार  आहे!  
नव्या  वर्षाचा  गालगुच्चा  घेऊन 
"काय  रे  बबड्या !" म्हणणार आहे!

 हे सगळं पुढचं पुढे, पण 
आजचा प्लान (लई  भारी ) जमणार  आहे
संध्याकाळ पर्यंत थांबतंय  कोण
दुपारीच बैठक रंगणार आहे  

 कारण 

आयुष्यात  पहिल्यांदाच मी   
 दारू आज  पिणार आहे.
ग्लास माझा काठो  काठ भरून  घेणार  आहे
जुन्या  सगळ्या  दिवसांसाठी  रडून  घेणार  आहे 
आयुष्यात पहिल्यांदाच मी 
   दारू आज पिणार आहे 


 (टीप  - कविता  हेच  आग्रहाचे  निमंत्रण  समजावे ) 

Thursday 8 December 2011

मंत्र्याचे पसायदान

                 मंत्र्याचे पसायदान
('फकीरगाथा' अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२ )


आता हायकमांडे देवे ।  येणे सत्तायज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।   'कॅबिनेट' हे  ।।१।।

जे विपक्षांची व्यंकटी सांडो ।  तया फुटीरांची गती वाढो।
अपक्षांशी  आपुले पडो ।   मैत्र जीवाचे  ।।२।।
 
अल्पमताचे तिमिर जावो ।  जनकौलही म्याची पाहो । 
जो जे वांछील तो ते लाहो।   मंत्रिजात  ।।३।।

'वर्षा' त सांजसकाळी ।  सत्तानिष्ठांची मांदियाळी ।
तयांत 'फायनान्सर' मंडळी ।  भेटतु या भूता  ।।४।।

करा अस्मितेचा आरव ।  गाठा दिल्लीश्वराचे गाव ।
करिता तेथ आर्जव ।   फायद्याचे  ।।५।।
 
लोकनेते जे अलांछन ।   बुद्धिमंत जे निष्कांचन ।
ते झाडून सर्व सज्जन ।   कचरा होतु  ।।६।। 

किंबहुना सर्व सुखी ।  उरी बसुनी इये लोकी ।
भजितो मी  हीच खुरची ।   अखंडित  ।।७।।
 
आणि सत्तोपजीविये ।  राहोनि मन्त्रिपदी इये ।   
लुटालूट जी म्या करो जाये ।   वाटून घ्यावी  ।।८।।
 
तेथ म्हणे हा घडला ठराओ ।   हा होईल दान पसावो । 
येणे वरे मंत्रीदेवो ।  सुखिया झाला  ।।९।।  
 

Monday 10 October 2011

पोतराज





मुंबईतल्या  अनेक  गजबजलेल्या  जागांपैकी  ही  एक  जागा . हवेत  समुद्राचा  दमट  वास , ओसंडून  वाहणारी  गर्दी , दाटीवाटीने  उभी  असलेली  दुकाने ,उंचच उंच इमारती, कॉर्नरवरच्या   चहाच्या  टपर्या , बेवारस  फिरणारी  कुत्री , आणि  असंख्य  आवाज  एकमेकात  मिसळून  तयार  झालेला  परिचित  कोलाहल .
बायको  क्लिनिकमध्ये  पेशंट  तपासत  होती . माझी  कामं  उरकून  मी तिला  न्यायला  आलो होतो . तिचं  होतंय  तोवर  बाळाला घेउन  मी  क्लिनिकबाहेरच्या   स्ट्रीटवर   फेऱ्या  मारायला  लागलो . समोरच्या  ग्यारेजवाल्याच्या  दुकानातील  धांदल  टुकूटुकू   बघत  बाळ   चांगलीच  रमली  होती . एवढ्यात  कसल्याशा   अनोळखी  आवाजाने  तिची  तंद्री  भंग  पावली . टुणकन मान  वर  करून  ती  त्या  आवाजाचा  वेध  घेऊ  लागली . इथल्या  गर्दीत  असला  आवाज  अपेक्षितच  नसल्यामुळे  मी  ही  तिला  घेऊन  त्या  आवाजाच्या  दिशेनं  गेलो . मार्केटच्या  मुख्य  रस्त्यावरून  तो  आवाज  येत 
होता . या  आधी  गावाकडेच  ऐकलेला ... गुबू ..गुबू ..गुबू ...
मी आवाजाच्या  दिशेनं  नजर  वळवली  आणि  बघितलं ....पोतराज !!!
कमरेच्या  वर  उघडेबंब अंग ,पिळदार  शरीर , पाठीवरून  मोकळे  सोडलेले लांबसडक  केस  ,कपाळभरून  कुंकवाचा  मळवट , त्याखालचे  उग्र  डोळे , धारदार  नाक ,  कमरेभोवती  वेगवेगळ्या  रंगांच्या  कापडी  झीरमाळ्याचे  वस्त्र , पायात  घुंगरू , ओल्या  कुंकवाच्या रेषा ... आणि हातात  धरलेला लांबलचक असूड! 
त्याच्यासोबत त्याची बायको होती.  फाटकं   लुगडं नेसलेली , खांद्यावर   दोरीनं  अडकवलेला  चामड्याचा  ढोल,  मानेवरून पोटावर बांधलेल्या कळकट कापडात सुकट चेहऱ्याचं   तान्हं बाळ , आणि डोईवर मरीआई!  तिचा चेहरा सावळा पण कोरीव होता.  एका हातातली टिपरी चामड्यावर घासत ती वाजवीत होती -
                                                                गुबू ..गुबू ..गुबू ...

पोतराज मोकळ्या जागेत उभा राहायचा  आणि नाचत नाचत चाबूक हवेत उंच फिरवायचा. चाबकाचा फटकारा त्याच्या पाठीवर बसताक्षणी  काडकन आवाज व्हायचा. मग त्याची बायको दुकाना- दुकाना समोर उभी राहून मरिआईच्या नावानं दान मागायची. काहीजण द्यायचे , काहीजण फटकारून लावायचे ,काहीजण बघून न बघितल्यासारखं करायचे. काहीजणांच्या नजरा तिच्या फाटक्या वस्त्रामधून  जे बघायचे ते बघून घेत होत्या. माझं लक्ष तिच्या झोळीतल्या बाळाकडे गेलं. धुळीनं माखून  कळकट झालेलं ते बाळ कधी रडत होतं, कधी त्या झोळीच्या कापडाशी खेळत होतं. तिचं त्या बाळाकडे लक्ष नव्हतं.
पोतराज पुन्हा नवीन जागी उभा राहिला  आणि नाचत नाचत  त्याने कडाडकन चाबकाचा आवाज काढला . त्या  आवाजासरशी माझ्या अंगावर शहारे आले  आणि मला माझ्या लहानपणीचा पोतराज आठवला!
                                                   "आली आलिया मरीआई
                                                     तिचा कळंना आनभाव 
                                                   भल्या भल्याचा घेती जीव    
                                                    आली आलिया मरीआई " 

भरदार आणि उग्र दिसणारा हा पोतराज गावात आला म्हणजे बायाबापड्यांची लेकराबाळांची  एकच धांदल उडायची. ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या सावरीत आणि शेंबडी नाकं पुशीत आम्ही लेकरं मोठ्या उत्साहानं "पोतराज आला!" "पोतराज आला!" म्हणीत उड्या मारीत  पोतराज बघायला पळत सुटायचो.पायातल्या  घुंगराचा  नाद  करीत  ठेका  घेऊन  पोतराज नाचायला  लागला  की  आम्हा  लेकरांना  आभाळाएवढा  आनंद  होई . चाबूक हवेत फिरवून त्यानं पाठीवर 'कडाड' आवाज काढला की छातीत  धड धड करी आणि तरी आम्ही दोन्ही डोळे विस्फारून पोतराजाकडे  बघत रहायचो.
हा  पोतराज  शहरी पोतराजासारखा चिरमटलेला  नसायचा . हा मिजाशीने  गावात मिरवायचा . हक्काने घरा घरात जायचा . वाड्याच्या दारासमोर उभा राहून कडक आवाजात साद घालायचा- 
                                                           'दार उघड बये दार उघड!"
त्या हाकेसरशी घरातल्या सवाशीण बायका, म्हातारी आजी- जी  कुणी असेल ती -घाई गडबडीने हळदी कुंकुवाचा करंडा घेऊन,  सुपात धान्य घेऊन, डोक्यावर पदर घेऊन मरीआईच्या दर्शनाला यायच्या. पोतराज मरीआईचा सांगावा घेऊन  यायचा. कोणी काही नवस बोलला असेल तर बायका, म्हाताऱ्या पोतराजाची वाट बघायच्या. मग तो आला की मरीआईला  साडी चोळी करून नवस फेडायच्या. आई पोतराजाच्या अंगात यायची आणि प्रसन्न होऊन वरदान द्यायची-
                                   " इडा पीडा टळो. वंश वाढीला लागो. धन धान्याला बरकत येवो"   .
मरीआई म्हणजे 'कडकलक्ष्मी'.  तिचा  'सराप' वाईट असतो. तिचा कोप झाला तर घरात पडझड सुरु होते, माणसं, लेकरं, गुरं ढोरं दगावतात. म्हणून तिला खूष ठेवण्यासाठी माय मावल्या धडपड करायच्या. दान मिळालं की पोतराज खुश होई. मग नाचत नाचत गोल रिंगण घेई आणि आम्हा लेकरांकडे  बघून पुन्हा एकदा  चाबूक फिरवून पाठीवर  आवाज काढी- कडाड!
तेव्हा आमच्या वाड्यात पोतराज यायचा, वासुदेव यायचा, गोंधळी यायचे...हे लोक पावसासारखे हवे हवेसे  आणि विठ्ठलाइतके  खरेखुरे वाटायचे !
इथे- मुंबईत- मात्र हा पोतराज फारच विजोड वाटत होता. आजूबाजूच्या चकचकीत इमारतीत, इमारतींप्रमाणेच  वसकन अंगावर येणाऱ्या लोकांच्या नजरांमध्ये, इथल्या करकरीत अलिप्तपणात हा कसातरीच बेंगरूळ वाटत होता. रानात सुंदरपणे बागडणारं फुलपाखरू एखादे दिवशी बेडरूमच्या ट्यूबलाईट भोवती चिलटासारखं घिरट्या घालायला लागलं म्हणजे कसं ओंगळवानं वाटत तसं!
हा पोतराज त्याचं गाव सोडून इथे का आला असावा ?
कदाचित शहरामध्ये खूप पैसा असतो असं त्याला कुणीतरी सांगितलं असेल.  कदाचित इथे तुला चांगला लौकिक मिळेल असं कुणीतरी म्हटलं असेल .  कदाचित ही बाई दुसऱ्या जातीची असेल आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून याला गावातल्या लोकांनी हाकलला असेल....तोंड लपवायला मुंबई सारखं शहर नाही. तुटून पडलेल्या सगळ्या लोकांसाठी आणि गावातून भिरकावून दिलेल्या सगळ्यांसाठी उकीरड्यासारखं, हे  शहर म्हणजे एक वरदान आहे.
माझं लक्ष पोतराजाच्या चाबूक धरलेल्या हाताकडे गेलं. त्याचा  अंगठा तुटलेला होता. गावातून रानावनातून निखळलेला हा एकलव्य शहरात आला होता. आणि तो एकटाच नाही, अख्खी एक संस्कृतीच विस्थापित होत होती.
त्याच्या बायकोने ताल धरला होता. हातातल्या दुसऱ्या टिपरीने ती आता वेगळाच ठेका वाजवीत होती-

                           डंग डंग डडांग-  डांगचिक  डडांग,   डंग डंग डडांग- डांगचिक  डडांग 

मघाचं केविलवानं  गुबू गुबू आता बंद झालं होतं आणि हे टिपेचं, घाबरवून सोडणारं  संगीत सुरु झालं होतं.
आता ती दान मागत नव्हती. निर्विकार चेहऱ्याने  सरळ समोरच्या डांबरी रस्त्याकडे बघून ती भेदक सूर वाजवीत होती-
                           डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
जणूकाही सगळा बाजार त्या क्षणात गोठून बसलाय आणि त्याच्या पलीकडे जाउन ती  एकटीच तिथे वाजवीत होती. तिच्या वाजवण्यात लोककथेतील पात्रांचा मनस्वीपणा होता. आपलं बाळ गळ्यात लटकवून जणू ती ह्या इमारतींना, ह्या शहरांना, ह्या संस्कृतीला प्रश्न विचारत होती.

                    " गावं खेडी भाकड झाली . जुने सांधे निखळले.  पोतराज फुटून शहराकडे वळले."
                          
                        डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग
                     
                                  " माये नाळ वाळून गेली,  पान्हे सारे आटून गेले
                                      मुळं  पाळं  खुडून गेले, भगत सारे बुडून मेले" 
                                           
                            डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
                 
                                   "रेट्यामध्ये जिरत चाललो, आम्ही आता मरत  चाललो 
                                    देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो" 
                                           
                             डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या या प्रश्नात अगतिकता नव्हती, याचना नव्हती की उपकाराची आस नव्हती. ती फक्त साऱ्या शहरानं दवंडी देत फिरत होती - 'आम्ही आता बुडत चाललो'.
तिच्या डोळ्यात रानावनातल्या अघोरी देवतांचं तेज उतरलं होतं.
गोठून बसलेल्या त्या क्षणाच्या बुडबुड्यातून काही इमारती सरसरून वर आल्या.  आणि जादू   ह्वावी तशा चमचम चमकत गगनाला भिडल्या. अजस्र  अफाट  महाकाय. .अमरवेलीसारख्या.   क्षितिजापर्यंत  लांबल्या. आसमंत व्यापून गेल्या.
आणि तेवढ्या त्या चिंचोळ्या डांबरी रस्त्यावर बाई वाजवीत राहिली . तिचा ठेका या सगळ्या जंजाळातून  दुमदुमायला लागला.

                               डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

आणि बघता बघता त्या बाईच्या पाठीमागे एक भल्ली मोठी रांग उभी राहिली. या रांगेत पोतराज होते, वासुदेव होते, गोंधळी होते, बोहारणी, कोल्हाटणी , अंगठा तुटलेले आदिवासी, मोरपिसांचा झाडू घेतलेले फकीर होते...दूर कुठेतरी वारकरयांचे  झेंडे दिसत होते.
या गर्दीला थांग नव्हता. या सगळ्यांच्या वतीनं ती वाजवीत होती-

                                    "देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो."
                                
                                डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या ठेक्यात कुठेतरी अस्पष्ट भूपाळीचे सूर ऐकू येवू लागले, कुठेतरी 'ग्यानबा तुकाराम' चा  गजर ऐकू येऊ लागला आणि हा सगळा नादकल्लोळ  वर वर चढत आभाळाला भिडत चालला. आभाळावर आता सत्ता ह्या  जत्थ्याची होती की त्या इमारतींची हे सांगवत नव्हते  .
आणि ह्या सगळ्या गर्दीच्या पुढे पोतराज चालला होता. आता पोतराजाच्या अंगात आलं होतं. तो जोरजोरात घुमू लागला होता. आणि त्वेषाने गोल  गोल फिरून स्वतःच्या चामड्यावर चाबकाचे आवाज काढीत होता - कडाड कडाड!

कुणीतरी  'साहेब' म्हणून हाक मारली आणि  मी अचानक भानावर आलो.
माझ्या अंगावर चांगले कपडे होते. माझं बाळ संगमरवरासारखं  गोरंपान आणि  गुटगुटीत दिसत होतं.
शहरी झालो होतो. साहेब झालो होतो. इस्तरीच्या कपड्याची घडी मोडू  देणं परवडणारं  नव्हतं. पोतराज केव्हाच निघून गेला होता.

पाऊस माती सुगीत उगवलेली ही संस्कृती आणि तिचे हे शिलेदार माझ्या वनरूम किचन मधे मी कुठे बसवू? देवघरासाठी एक स्क्वेअर फूट जागा जिथे चैन वाटावी तिथे मी पंढरीची दिंडी कुठे बसवू? पोटापाण्यासाठी रोज लोकल मधून जाता येता जिथे घरातल्या भिंतींप्रमाणेच मनालाही कुबट ओल सुटते तिथे मी ही एक पोतराज झालेला असतो...सांधा निखळलेला, फुटून बाहेर पडलेला!





                    


                    

  


    




Tuesday 27 September 2011

"कोण आहे रे तिकडे ?"

"कोण  आहे  रे  तिकडे ?"
राजमहालात अस्वस्थपणे येरझारा घालत महाराज गरजले.
एवढ्यात आपली पगडी सांभाळत प्रधानजी धावत धावत येतो.
"मुजरा महाराज. आपण आज्ञा  केलीत? सेवक आपल्या चरणी हजर आहे महाराज "
येरझारा घालीतच राजाने विचारले ,
"प्रधानजी, ही 'गरिबी' म्हणजे काय भानगड असते तुम्हाला ठावूक आहे काय?"
"नाही महाराज! मला तर काही ठावूक नाही . तसा बऱ्याचदा आपल्या राज्यात मी हा शब्द ऐकलाय पण गरिबी म्हणजे काय मला नेमकं नाही सांगता येणार."....
"तथापि आपण काळजी करू नये महाराज . मी ताबडतोब एक समिती नियुक्त करतो आणि गरिबी म्हणजे काय याचा छडा लावतो"..."काय झालं महाराज? आपण फारच अस्वस्थ दिसत आहात. नेमकं झालंय तरी काय ?"
"प्रधानजी , गोष्ट मोठी गंभीर आहे, तेवढीच ती नाजूक पण आहे. रूपनगरीच्या  राजकुमारीचं  स्वयंवर आहे. आम्ही स्वयंवराचा विडा उचलून बसलोत. पण...पण प्रधानजी आम्हाला भीती वाटतेय की आम्ही हे स्वयंवर नाही जिंकू शकणार."
"असं काय म्हणताय महाराज? अहो तुम्ही एवढे शूर वीर असताना कुणाची टाप आहे तुम्हाला स्वयंवर जिंकण्यापासून रोखण्याची?"
"प्रधानजी, रूपनगरीच्या राजकन्येनं असं जाहीर केलय की ज्या राज्यात गरीब लोक असतील त्या राजाच्या गळ्यात ती माळ घालणार नाही. प्रश्न आता प्रतिष्ठेचा होऊन बसलाय प्रधानजी."
प्रधान, " हात्तिच्या! एवढंच ना? महाराज, तुम्ही  काही  टेन्शन  घेऊ  नका. आज तुम्ही निवांत झोपा. उद्यापासून आपल्या राज्यात झाडून झटकून बघितलं तरी गरीब दिसणार नाही याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही निर्धास्त रहा."  
महाराजांना गुड नाईट करून प्रधानजी जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रधानजी दरबारात हजर होतो. त्याच्या सोबत सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला एक मरतुकडा इसम हातात  भल्या मोठ्या फायलींचा गठ्ठा   घेऊन   उभा   असतो  .
राजाला  लवून  मुजरा  करून प्रधानजी सांगतो , "महाराज , हे आपल्या राज्यातले  फार मोठे  विद्वान  आहेत . 'गरिबी' हा  त्यांचा स्पेशालिटीचा विषय  आहे. गरीबीवर  आपण काल नेमलेल्या  एकसदस्यीय  समितीचे  तेच  अध्यक्ष  आहेत. त्यांनी समितीचा अहवाल सुद्धा सोबत आणला आहे."
हे ऐकून राजा अवाक होतो.
"महाराज,त्यांच्या  अहवालानुसार   तर  आपल्या  राज्यात  भरमसाठ  गरीब  लोक  असे ठासून  भरले  आहेत . मला  तर  वाटतंय  की  महालातले  आपण  काही  निवडक  लोक  सोडले  तर  आपली  अक्खी  प्रजा  गरीब  वर्गातच  मोडत असावी  .पण  तुम्ही  घाबरू  नका  महाराज , तसाच  गरिबी  'निर्मूलनाचा'  मार्ग  सुद्धा  मी  शोधून  काढलाय ." 
"तो काय?"
"महाराज  आपण  काय  करायचं  गरिबीची  रेषाच  इतकी  खाली  ओढायची  की  सगळेजण  आपोआप  गरिबी  रेषेच्या   वरच दिसले  पाहिजेत . म्हणजे  ती  गोष्ट  नाही  का , 'रेषेला  हात  ना  लावता  तिला  छोटी  करायची  असेल  तर  तिच्या  बाजूलाच  एक  मोठी  रेषा  काढायची' ...हे  थोडफार  तसच  आहे . एक  दमडीच्या  वर  ज्याचं   उत्पन्न  असेल  तो  श्रीमंत  म्हणूनच  घोषित  करायचा!"
"अहो,  पण  प्रधानजी, असं  कोंबडा  झाकून  ठेवला  म्हणजे  काय  उजाडायचं   थोडीच  राहणार  आहे? गरीब  तर  शेवटी  गरीबच  राहणार  ना ?"
"महाराज,  तुम्हाला  राजकन्येशी  लग्न  करायचंय   की  नाही ? मग  मुकाट्याने  मी  सांगतोय  तसं  करा . अहो  ते  स्वयंवर  म्हणजे  एक प्रकारची  शर्यतच  असणार  आहे . आणि  अशा  शर्यतीत  तुम्ही  ह्या  गरीबांचं   ओझं  पाठीवर घेवून धावणार  असाल  तर  कसली  जिंकताय   तुम्ही  शर्यत ?"
"पण प्रधानजी हा चक्क खोटारडेपणा आहे. आपण सत्याच्या मार्गाने जाउन खरं म्हणजे गरिबी नष्ट करायला पाहिजे."
राजाच्या  वक्तव्यात काही दम नाही हे धूर्त प्रधान जाणून असतो. कावेबाजपणे तो राजाला म्हणतो,
'मला सांगा महाराज आपण किती वर्षांपासून "गरिबी हटाव"चा नारा देतोय. झाली गरिबी दूर? कशी होणार? अहो आपल्या राज्यात शेवटचा गरीब मरून जात नाही तोपर्यंत गरिबी दूर होणारच नाही. आणि गरिबी निर्मूलनाचा हाच एक शहाणपणाचा मार्ग  आहे.आपण त्यांचं अस्तित्त्वच मान्य करायचं नाही राज्यात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी..."
"....इतकच नाही तर 'गरिबी' हा शब्दावरच आपण बंदी घालायची. राज्याच्या शब्दावालीत 'गरीब' हा शब्द शोधून देखील नाही सापडला पाहिजे. फार झालं तर बाराखडीतूनच 'ग' हा शब्द आपण काढून टाकू. म्हणजे कसलीच नौबत राहणार नाही."
"पण मग प्रधानजी, सगळे गरीब गरजू लोक जर राज्यातून नष्ट झाले तर आपल्याला काम तरी काय राहणार? आपली राज्यव्यवस्था मुक्त आणि उदार आहे, जो तो आपली आपली कामे स्वतः करतो. एक जनतेला सामाजिक सुरक्षा देण्याचं काम तर तेवढं आपण करीत असतो. तेही झटकून टाकायचं म्हणजे जरा अतीच..."
" तिथेच  तर खरी मेख आहे महाराज! अहो असला फुकटचा खर्च आपण उरावर घ्यायचाच कशाला? तेवढ्या पैशात आपल्या अक्ख्या महालात ए.सी.बसवून होईल... बड्या बड्या लोकांना नजराणे भेट करता येतील... त्यांच्या आगमनासाठी मलमली गालिचे अंथरता येतील...भारी भारीची शस्त्रास्त्रे  विकत घेता येतील... त्यांच्या जोरावर शेजार्याना दम भरता येईल...आणि मुख्य म्हणजे महाराज रूपनगरच्या राजकन्येची मर्जी संपादन करता येईल! तसं पाहिलं तर आता आजूबाजूंच्या सगळ्या राज्यांमध्ये तुमच्याशिवाय सामर्थ्यवान दुसरा कोणी राहिलेला राहिला नाही. हीच नामी संधी आहे. अशा निर्वाणीच्या क्षणी  ही गरिबीची नाट लावून घेऊ नका. झटकून टाका आणि पुढे व्हा."
प्रधानाच्या ह्या बोलण्याचा  राजाला तिरस्कार वाटतो पण त्याच क्षणी त्याला  आत कुठेतरी हलकेच सुखावल्याची  जाणीव  होते. वरकरणी तो प्रधानाला विचारतो, 
"आपणच असं झटकून टाकल्यावर या लोकांनी जायचा तरी कुठे? त्यांना कोण वाली आहे. काय करणार बिचारे?"
"वा! वा! असं कसं? असं कसं? चांगले  तीन पर्याय  आहेत की त्यांच्या समोर-
पहिला पर्याय म्हणजे 'उपोषण करणे'. नाहीतरी सध्या राज्यात उपोषण करण्याची फ्याशन पडलीच आहे तेव्हा गरिबांनी सुद्धा तेच करीत रहायचं. ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा अनुकरण करायचं. काय म्हणतात बरं त्याला...महाजनो येन गता स पंथः!   हा हा हा!
उपोषणे फारच असह्य व्हायला लागली की दुसरा पर्याय आहेच- 'फाशी घेणे'! तोपर्यंत आपण कायद्याने फाशी घेण्याला शिस्तशीर मान्यताही  देऊन टाकू. फार झालं तर जीव देणाऱ्या गरीबांना मरणोपरांत पुरस्कार जाहीर करू. नाहीतरी जीव देऊन हे लोक राज्यावरचा भार हलकाच तर करीत आहेत. ही पण  एक प्रकारची राष्ट्र भक्तीच आहे की? हा हा हा हा !
त्यातले काही कट्टर गरीब मात्र तिसरा मार्ग पत्करतील. तो म्हणजे- 'हाती बंदूक घेणे'! हा हा हा ! पण आपल्याला  घाबरायचं  मुळीच कारण नाही. एवढी सुसज्ज सेना आपण बनवलीय तरी कशासाठी मग? या बंडखोरानाच आपला 'एक नम्बरचा शत्रू' म्हणून जाहीर करायचं आणि...आणि करायचा गोळीबार...धाड धाड धाड..हा हा हा हा हा ! "
प्रधानाचा अभिनिवेश पाहून राजा घाबरतो पण मनातल्या मनात मात्र तेवढाच खुश होतो. 
समितीच्या शिफारसपत्रिकेवर राजा स्वहस्ते राजमुद्रा उठवतो. आणि स्मितहास्य करीत स्वयंवराची गुलाबी स्वप्ने रंगवीत स्वतःच्या कक्षात निघून जातो.





 

Saturday 20 August 2011

'अण्णा हजारेंचा काटा काढण्याचे १०१ मार्ग'



माननीय पंतप्रधान साहेब,
आपण सध्या किती कठीण परिस्थितीतून जात आहात याची मला एक जागरूक नागरिक या नात्याने जाणीव आहे.
तुमच्या पगडीतून आतले टक्कल दिसत नसले तरी त्याच्यावर आलेला लोड मी समजू शकतो.
अण्णा हजारे या माणसाचे काय करावे तुम्हाला काही कळत नसेल नाही. होतं असं कधी कधी. (माझ्या सासऱ्याबद्दलही मला अधून मधून असंच काहीतरी वाटत असतं.)
तुम्ही एवढ्या महान देशाचे पंतप्रधान. मी आपला सामान्य माणूस. माझा वकूब तो केवढा. पण  माझ्या परीने का होईना तुम्हाला मदत करावीच म्हणतो.
 तुमची या अडचणींतून  सुटका व्हावी या निर्मळ हेतूने प्रेरित होऊन मी एक पुस्तक लिहिले आहे- 'अण्णा हजारे यांचा काटा काढण्याचे १०१ मार्ग' !
हवं तर तुम्ही याला 'सेल्फ हेल्प बुक' समजा.
हे पुस्तक मी अनुक्रमे तुम्हाला आणि सोनियाबाईंना समर्पित करीत  आहे.
अहो एक माणूस अख्खी संसदीय लोकशाही वेठीस  धरू पाहतो म्हणजे गम्मत आहे की काय? अशात काहीतरी चमत्कार घडावा आणि हे शुक्लकाष्ठ एकदाचं निघून जावं असं तुम्हाला कित्ती कित्ती वाटत असेल नाही?   
म्हणूनच असले असले जालीम उपाय सुचवले आहेत या पुस्तकात तुम्हाला सांगतो....
उदाहरणादाखल काही उपाय मी तुम्हाला वाचून दाखवतो.
पान नंबर १३ उघडा.
धडा २ रा.   
"जगबुडीची आवई उठवणे"  
अशा नाजूक  वेळेस जनतेचं ध्यान दुसरीकडे वळवायचा हा सर्वात सोपा आणि निरुपद्रवी मार्ग आहे. नाहीतरी २०१२ साली  जगबुडी येणार अशी  हवा आहेच. आपण त्याचाच फायदा घ्यायचा.आणि "जगबुडी आली! जगबुडी आली!" अशी आवई उठवायची! मेडिया सगळा म्यानेज करा. यावेळेस  ती चूक करू नका. हवं तर जॉर्ज बुशला फोन करा. त्याने पण अशीच अफगाण युद्धाच्या वेळेस रुपर्ट मर्डोकसोबत सोयीच्या प्रसारणासाठी एक डील केली होती म्हणे. तुमची अवस्था  बघून तो तुमचं काम स्वस्तात करून देईन.
तसं जनतेचं लक्ष वळविण्याचा दुसरा एक घरगुती उपाय होता माझ्याकडे. तो असा की आपण ऑलिम्पिक  सारखे  काहीतरी अचाट खेळ अगदी वाजत गाजत सुरु करून द्यायचे. जुन्या काळी जनतेला भुलवण्यासाठी ग्रीसमध्ये अशा खेळांचा उपयोग करून घ्यायचे. पण नेमकाच आपला राष्ट्रकुट खेळांचा पचका झालाय. अजून लोक तेच विसरले नाहीत. त्यामुळे तूर्तास हा उपाय वापरणे शक्य नाही. उगाच खाजवून खरुज कशाला काढायची?
हे उपाय फारच पानचट वाटत असेल काही जालीम उपायांसाठी पान नंबर ४७ उघडा .
धडा ५ वा .
"जारण मारण तंत्र" 
अण्णा हजारेंना सरळ अटक करायचं . पण यावेळेस त्यांना तिहार जेलमध्ये नाही ठेवायचं. लांब कुठेतरी नेवून ठेवायचं. ते अंदमानातले  काळ्या पाण्याचे जेल चालू आहे  का हो अजून?
अण्णांच्या मागे जाणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे वगैरे उपाय मला सुचले होते. पण या उपायांत काही originality नाही. इंग्रज लोकांनी ते आधीच करून ठेवलय. नाहीतर निष्पाप जनतेवर गोळीबार करण्याचा तुमचा नंदीग्राम, मावळचा  अनुभव इथे कामाला आला असता. 
तसं 'प्रत्यक्ष' हिंसा न करताही आपलं काम होऊ शकेल बरं का . म्हणजे बघा अण्णा आहेत वयोवृद्ध. आधीच तब्येतीने तोळामासा. त्यात पुन्हा उपोषणाला बसलेत. आठवडा तर होतच आलाय... बसू द्या असंच...!
पण या उपायात एक फार मोठा धोका आहे. अण्णांचं असं काही बरं वाईट  झालं तर सगळीच जनता पेटून उठेल. आपल्याला आताच देशात क्रांती वगैरे परवडणार  नाही. आहे त्या सिस्टीम मधले आपले ' vested interests ' आपल्याला विसरून कसे चालेल? 
शिवाय क्रांती ,संपूर्ण क्रांती हे एकदा पोळलय ना आपल्याला ? तेव्हा आता जरा जपूनच !
आणिबाणी वगैरे लागू करा असंही सुचवणार होतो पण जाऊ द्या.... तुम्हाला नाही झेपायचं ते.
त्यापेक्षा आपला एक सनातन उपाय सांगतो- "यामागे विदेशी शक्तींचा हात आहे" असा सरळ ठोकून द्यायचं! "नेमका कोण?" म्हणून विचारलं की काहीतरी मोघम मोघम सांगून द्यायचं. तेवढं तर तुम्हाला चांगलंच जमतं की!
जारण मारण तंत्रात अजून एक उपाय आहे. तो म्हणजे अण्णांना वेडा ठरविणे. नाहीतरी "समाजसेवा"! "समाजसेवा"! करीत आयुष्यभर लोकांसाठी झिजून स्वतःसाठी दमडीही शिलकीत न ठेवणाऱ्या  माणसाला आपल्याकडे वेडाच म्हणायची पद्धत आहे. आणि  आतातर हा माणूस उभ्या देशाला वेडाच्या नादी लावतोय. अशा वेड्यांवर धमक्या बिमक्यांचाही  काही परिणाम होत नाही. नंगे से खुदा डरे!

पुस्तकात अजुन पुढे काही तात्त्विक उपाय सुचवले आहेत.त्यासाठी पान नंबर १६७ उघडा. 
धडा ११ वा . 
"मनमोहन विषाद योग" 
यातला पहिला मार्ग आहे- 'सन्यास घेणे'.
राजकारणातूनच नाही, तर एक आपला, जनरली, संन्यासाच घेऊन टाकायचा. म्हणजे कसं "राजकारण नको पण अण्णा आवर" असं जे तुमचं होतंय ना त्यातून तुमची कायमची सुटका होईल.
आता तुमचा राजकारणाचा लोभ सुटतच नसेल तर त्यासाठीही काही मार्ग आहेत आपल्याकडे.
काय करा, तुम्ही आत्तापुरता राजीनामा देउन टाका. मग तुमच्या अख्ख्या मंत्रीमंडळासोबत विदेशात जाउन सगळ्यांची  होलसेल प्लास्टिक सर्जरी करून घ्या. आणि एका 'नव्या चेहऱ्यानिशी' परत येउन एक नवीनच राजकीय पक्ष सुरु करून मगच जनतेसमोर या! (तुमच्या नवीन पक्षासाठी  राजकीय सल्लागार म्हणून मी आहेच!)
यातूनही यशाची खात्री वाटत नसेल तर एक काम करा. एखादं नवीन बेट शोधून काढा. तिथे जावून निवडणूक लढवा. गेलाबाजार राहुलबाबाचं पंतप्रधान व्हायचं  स्वप्न तर नक्की पूर्ण होईल!
एक खबरदारी मात्र बाळगा. तुमचे काही कच्चे सल्लागार "अन्नांनाच तिकीट द्या" असं सुचवतील. ही घोडचूक अजिबात करू नका! अशी खतरनाक माणसं सत्तेच्या रिंगणात मुळीच घुसता कामा नयेत.
आता आपण राजकीय उपायांकडे वळलोच आहोत तर पान नंबर ८२ वरचा, ८ व्या धड्यातला एक उपाय जाता जाता सांगून टाकतो.' विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणे'. आज तुम्ही जात्यात आहात ते सुपात आहेत. तुमच्याकडे अशोक चव्हाण आहेत तर त्यांच्याकडे येडीयुरप्पा आहेत. तेव्हा त्यांनी नुसती मजा बघून किंवा आगीत तेल ओतून कसं चालेल? पण सध्या कात्रीत तुम्ही अडकला आहात तेव्हा पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागेल. एकत्र मिळून अण्णांवर काही तोडगा निघतो ते पहावे. 

हे उपाय करा न करा. पण एक गोष्ट मात्र आधी करा. आधी ते मख्ख  चेहऱ्याचे पक्ष प्रवक्ते हटवा आणि स्वतः पब्लिकला सामोरे जा. अहो लोकशाहीत तुम्ही खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुम्हीच  असं लोकांपासून तोंड लपवून कसं चालेल? इकडे तुम्ही ताटी लावून बसलात. तिकडे सोनियाबाई सोवळ्यात असल्यासारखं वागतायत. लोकशाहीत जनतेलाच असं अस्पृश्यासारखं वागवून कसं चालेल? जा की त्यांना सामोरे. आणि त्यात एवढं कानकोंडा वाटून घ्यायची गरजच काय? शेवटी ती तुमचीच जनता आहे. आणि भ्रष्टाचार जगात कुठे होत नाही? या एकदा समोर. संवाद घडला की सगळ्यांची मने निर्मळ होतात.
जन-लोकपाल बिलाचे तुम्ही म्हणता तसे 'grave consequences for parliamentary democracy ' , तुमची 'theory of parliamentary supremacy ' ,' एक शक्तिशाली लोकपाल बनविण्यातल्या मर्यादा आणि संभाव्य  धोके' .....हे सगळं अगदी बरोबर आहे हो. पण सामान्य जनतेला एवढं जास्त कळत नसतं. ते त्यांना समजेल अशा भाषेत आणि योग्य त्या व्यक्तीने सांगणेच ...जाऊ द्या. त्यापेक्षा सरळ तुम्ही पान नंबर २१४ काढा आणि धडा १४ वा 'public perception management ' वाचून काढा.
अण्णांच्या उपोषणाचे दिवस वाढत जातील तशी तुमची गोचीही वाढत जाणार आहे. तेव्हा काही निर्वाणीचे उपायही आताच सांगून ठेवतो. पुस्तकात ते Annexture -२ मधे दिले आहेत.
फारच अटीतटीची  वेळ आली तर अण्णांना एक 'जादू की झप्पी' द्या आणि त्यांचे म्हणणे सरळ मान्य करून टाका! लोकपाल ते म्हणतात तस्साच  काही अगदी बनवायची गरज नाही. पण काहीतरी बनवा तर खरे! अहो लोकांनी तर  तुमचा लोकपाल येणार की अन्नाचा लोकपाल येणार यावर सट्टा लावायला सुरुवात केली आहे म्हणे!
शेवटी आता तुम्हाला खरं सांगू का, मूळ मुद्दा भ्रष्टाचाराचा नाहीच आहे. 'तळे राखील तो पाणी चाखील' हा न्याय भारतीय जनतेला अनादी काळापासून मान्य आहे. आज मुद्दा आहे तो महागाईचा, misgovernance चा  आणि असल्याच छोट्या छोट्या गोष्टींचा. आणि ह्याच छोट्या गोष्टी बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. म्हणूनच ती लोक आज अण्णा हजारेंच्या मागे उभी राहतात.  त्यांच्या मागे उभ्या असलेल्या गर्दीला आणि त्यांच्या आंदोलनाला मेणबत्त्या घेऊन फिरणार्यांचा  urban  middle class phenomenon समजण्याची चूक करू नका. राष्ट्राचं भवितव्य बदलण्याच्या शक्यता या आंदोलनात दडलेल्या आहेत.तेव्हा पंतप्रधान साहेब... सावध असा!
सगळेच उपाय काही मी तुम्हाला फुकट  सांगणार नाही. हे फक्त एक ट्रेलर दाखवतोय. बाकी पुस्तकात मी सगळं लिहिलंच आहे. पुस्तकाचे मानधन म्हणून माझी फार काही मागणी नाही. आपल्या सरकारात जेवढे काही  भ्रष्ट व्यवहार होतील त्याच्या फक्त 0 .१%  रक्कम माझ्या बँक खात्यात जमा होत रहावी इतकेच. घाबरू नका...माझेपण स्विस बँकेत खाते आहे! आधी तिकडे खाते उघडून मगच पुस्तक लिहायला बसलो!
(ता.क. - चुकून माकून परत सत्तेवर आलात तर तुमचा राजकीय सल्लागार म्हणून माझ्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा ही नम्र विनंती.)

                                                                     आपलाच-
                                                                       फकीरा