Thursday 14 July 2011

"कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं "


१३ जुलै २०११
मुंबई 

कसाब-
"माझी दोन वर्षाची कमाई- 
माझ्या सुरक्षेसाठी या सरकारला बसलेला ४० कोटी भुर्दंड, आजचे ३ बॉम्ब स्फोट ,१७ बळी११० जखमी...Happy birthday to myself! अजून १०० वर्षे मी इथे राहायला तयार आहे!"

गृहमंत्री आर.आर. पाटील-
स्फोटानंतर ज्या पद्धतीने  चिदंबरम, NSG , NIA , यांनी बाह्या सरसावून हालचाली सुरु केल्या ते पाहून महाराष्ट्राचे  गृहखाते  केंद्राने  दत्तक  घेतले  की काय  अशी  शंका यायला लागली.
दरम्यान महाराष्ट्राचे स्वतःचे गृहमंत्री कुठे गायब झाले कुणाला काही पत्ता नाही. नागपुराहून येतो म्हटले आणि मधेच कुठेतरी तोंड लपवून बसले. बऱ्याच जणांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या,
'यावेळेस एखादा भारी डायलॉग सुचतो का म्हणून वेळ घेत असतील... ते मागच्या वेळेसचं  "बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है" जरा अंगलटच आलं होतं.' 
त्यांच्या निकटवर्तीयांनी  आणि विशेषतः गृहखात्याच्या बाबू लोकांनी "गेले आबा कुणीकडे?" म्हणून एकच टाहो फोडला.
काही उत्साही मंडळींनी तर पेपरातही जाहिरात दिली.
"आपण यांना पाहिलात का?
नाव- आबा पाटील
हुद्दा- गृहमंत्री म.रा. (महाराष्ट्र राज्य) 
वर्ण- सावळा (फारच प्रामाणिकपणे  बोलायचं ठरलं तर काळा) 
कमी उंची ( शरीराची आणि कर्तृत्त्वाचीही) 
मध्यम बांधा
सदरहू इसम काल झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हरवले आहेत. शोधून देणारास चव्हाण साहेब योग्य ते इनाम देतील" ( आणि आबांना काय द्यायचं याचं ते नंतर ठरवतील!)

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण -
परिस्थिती चव्हाणांच्या कॅबीनमधेही फार चांगली नसणार. आयुष्य south block च्या चकचकीत ऑफिसांमध्ये  आणि गुळगुळीत रस्त्यांवर गेलेलेआता मुंबईच्या गल्ल्यांमध्ये गचके लागले की त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नेहमी दाताखाली सुपारी फोडत असल्यासारखा चेहरा करून बोलणाऱ्या चव्हाणांना सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच दाताखाली खडा आल्यासारखे वाटत असेल. 
'आषाढीला पंढरपूरच्या विठ्ठलाला "देवा मुंबईत स्फोट होऊ देऊ नको रे" एवढं मागायचा नेमका विसरलो आणि तेच मुळाशी आलं' असं राहून राहून त्यांच्या मनाला वाटत असेल.

अशोक चव्हाण- 
"सालं आडनावातच काहीतरी नाट आहे!"

 विलासराव देशमुख- 
                   २००७-           "मुख्यमंत्रीच रहावं की दिल्लीत जावं?"
                   २६-नोवेंबर -  "दिल्लीतच जावं!"
                   २००९-           "अवजड उद्योग सांभाळावे का पुन्हा मुख्यमंत्रीच व्हावे?"
                   २०११-           "छे छे! ग्रामीण  विकासत्यापेक्षा मुख्यमंत्रीच व्हावे."
                   १३ जुलै-       "मुख्यमंत्री नाही झालो तेच चांगले झाले. आपले विज्ञान तंत्रज्ञान खातेच बरे आहे!"

मेडिया 
"चला महिन्याभराची सोय झाली!" 

दिल्लीतील 'anti -अण्णा, anti - बाबागट  - 
हुश्श! आता काही दिवस तरी लोकांचे  लोकपाल बिलावरचे लक्ष जरा कमी होईल."

पाकिस्तान, चीन - (एका सुरात)- 
"आम्ही काही नाही केलं बरं!"

काही उत्साही कवी-

"नेमेचि येतो मग पावसाळा
पावसात घडती स्फोटांच्या माळा

मृत्यूचे थैमान पाहवेना डोळा
माणसांचे जीव जायपालापाचोळा 

मेडियासी मग गवसतो चाळा
पाहोनिया जन कापे चळचळा

दिल्लीत नेते भरवोणी शाळा
शेजाऱ्यांच्या नावाने काढिती गळा 

जुनेच हे प्रश्न तरी किती दिस घोळा
अकलेसि बसले का लावूनिया टाळा

असलिया सरकारा नेउनिया जाळा
श्वान पीठ खाय दळतो आंधळा"

मृत  
"सुटलो एकदाचे..."