Thursday 19 December 2013

'फकिराचे राजकीय प्रयोग'



"दिल्ली विधानसभा  निवडणुकीत आम आदमी पार्टी २८ जागांवर विजयी!"


बातमी ऐकली आणि अंगात दहा हत्तीचं  बळ संचारलं . 
पेपर हातात नाचवीत आम्ही थेट मास्तर भागवतचं दुकान गाठलं . मास्तर भागवत म्हणजे आमच्या सुरूच न झालेल्या राजकीय कारकिर्दीचे फ्रेंड, फिलोसोफर आणि गाईड होते. आमच्या दुष्काळी गावातल्या रिकामचोट राजकीय टोळांचे ते पितामह भीष्म होते. 
मास्तर नेहमीप्रमाणे दुकानात माशा मारीत बसले होते .  मास्तरसमोर पेपर आदळला आणि म्हटलं, 
"मास्तर हे बघा! दिल्लीत काय धोबी पछाड दिलाय केजरीवालभाऊनं  कॉंग्रेस- बीजेपीवाल्यांना …" 
मास्तर पेपरात घुसले . पण आमच्या अज्ञानमिश्रित उत्साहाचा धबधबा धो धो वाहतच चालला, 
"… मायला, आता कळंल त्यांना . आम्हाला दारात उभे करीत नव्हते.… तुम्हाला  सांगतो मास्तर , आपल्या देशात जो काही भ्रष्टाचार चालला आहे ना, त्या सगळ्या भ्रष्टाचाराची इंजिनं आहेत हे राजकीय पक्ष म्हणजे . इंजिनं ! आपल्याला ना मास्तर, आधीपासूनच लोकशाहीतला हा 'राजकीय पक्ष' नावाचा प्रकारच मुळात कधी पटला नव्हता .साला ते महात्मा गांधी का  कोण म्हटलं होतं तसं राजकीय पक्ष पाहिजेतच कशाला हो मास्तर? सरळ सरळ जनता आणि उमेदवार असा हिशोब राहू द्या न भाऊ . म्हणजे तुम्हीच तिकीटं विकायची , लोकांची मतं वरच्यावर हायज्याक करायची, शेवटी तिसऱ्याच पक्षासोबत आघाडी करायची आणि जनतेला दाखवायचा बाबाजी का ठुल्लू … ही तर मायला लोकशाहीची होलसेल दुकानदारीच झाली… आन आमच्या सारख्या तरुण तडफदार धडाडीच्या …. "
मास्तर केव्हाशिक उठून माझ्याजवळ आले आणि तोंडाचा वास घेत म्हणाले, 
"सकसक्काळ नशापाणी करून आलायस का काय बे ? ही दिल्लीची बातमी वाचून तुला पुन्हा एकदा  निवडणुकीची हुडहुडी भरली का काय जणू ? . तुला इथं गल्लीत कोणी इचारीना अन गप्पा मारतोस दिल्लीच्या ? ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उताणा पडलास ते विसरलास काय बे इतक्यात? मायला,बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. हो भाईर!" 
मास्तरनं  एका फटक्यात आमच्या दंडात उठलेली राजकीय बेटकुळी जिरवून टाकली. ते बोलले ते पण काही खोटं नव्हतं म्हणा . अपयश ही  यशाची पहिली पायरी असते असं मानून आम्ही आतापर्यंत ग्रामपंचायत ते जिल्हापरिषदेपर्यंत सगळ्या निवडणुकांना उभे राहिलो. सोसायट्या म्हणू नका पतपेढ्या म्हणू नका…आम्ही सगळीकडं हातपाय मारून पहिले . पण यश तर सोडाच , निवडणुकीनंतर साधं डिपोजिटपण हाती लागलं नव्हतं. मास्टरनं घाव फारच वर्मी हाणला होता . निराश होऊन आम्ही मोर्चा 'पार्लमेंट' कडे वळवला. 'पार्लमेंट' म्हणजे आमच्या गावातल्या कामानं रिकामचोट अन पैशानं भिकारचोट असलेल्या स्वयंघोषित बुद्धिवाद्यांच चर्चेचं ठिकाण होतं . इथं हे चार पाच टोळ दिवसभर बसून गुऱ्हाळ घालीत. 
मी गेलो तेव्हा यांच्या चर्चा ऐन रंगात आल्या होत्या. मास्टरमाईंड बंटी मालुसरे खाजगी आवाजात सगळ्यांना सांगत होता- 
"… म्हणून म्हणतो त्या  केजरीवालला काही सरकार बिर्कार स्थापन करायचच नाही . त्याला नुस्ता टाईम काढायचाय. म्हणजे पुन्हा निवडणुका होतील आणि आम आदमी पार्टीला संपूर्ण बहुमत मिळेल. त्यांना नेमकं तेच पाहिजे - निर्विवाद बहुमत. तोपर्यंत त्यांचा मेडियाच्या पैशानं फुकट प्रचार चाललाय. आणि त्या १८ अटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुनर्निवडणुकीचा मेनिफेस्टो आहे त्यांचा . प्रशासकीय मुद्दे कोणते आणि राजकीय मुद्दे कोणते हे न कळण्याइतका दुधखुळा आहे की काय तो? सगळ्या अटी populistic… "
बंटी मालुसरे  म्हणजे आमच्या गावातून  दिल्लीला जाऊन आलेला एकुलता एक माणूस . कलेक्टर होण्यासाठी हा दिल्लीला गेला . तिथं  परीक्षा तर पास  झाला नाही पण एक पंजाबी पोरगी पटवून तिकडंच लग्न करून गावाकडे परत आला . त्यामुळं याचं  गावात खूप नाव झालं . तिकडं बुकात शिकलेली इंग्रजी वाक्यं बासुंदीत काजू किसमिस पेरावी तसा हा चर्चेत पेरायचा . त्यामुळं ह्याच्या कोणी नादीच लागायचा नाही . 'वासरात लंगडी गाय शहाणी' या न्यायानं पार्लमेंटनं  त्याला 'मास्टरमाईंड' हा किताब देऊन टाकला होता . 
बंटी मालुसरे सुरूच होता- 
"… पण  सत्तेत आल्यावर ह्यांची काय ग्यारंटी देता ? 'Power corrupts and absolute power corrupts absolutely' . (शांतता ) अन तू काय घाबरू नको मुन्न्या.  आम आदमी पार्टी काय महाराष्ट्रात येत नाही . ह्या चळवळ गोठून राजकीय पक्ष बनलेल्या पार्ट्यांना मराठी माणूस भीक घालीत नाही . माजघरात कोणाला घ्यायचं अन शेजघरात कुणाला न्यायचं हे मराठी माणसाला पक्कं ठाऊक असतं."
मुन्ना गवळीचा चुलत चुलत चुलत भाऊ राष्ट्रवादीचा आमदार होता . त्यामुळं मुन्ना दिल्लीतलं बघून धास्तावला होता .
इतक्यात कोपऱ्यात बसलेल्या दुलेखान बाबरची नजर आमच्यावर पडली .आमची एन्ट्री झाल्याचे कळताच पार्लमेंटचं कामकाज तहकूब करण्यात आलं . आमचा एकंदरीतच अवतार बघून भाऊ आज काहीतरी भयानक गौप्यस्फोट करणार याचा सगळ्यांना अंदाज आला. सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. पार्लमेंटमध्ये अभूतपूर्व शांतता पसरली…       
 त्या शांततेचा भंग करीत आम्ही गंभीरपणे खंबीर राहून  आमचा मानस सगळ्यांसमोर जाहीर केला .  
"दोस्तहो! या वेळेस  आपण ठरवलंय … यंदा आपण आमदारकीला उभे राहणार !"
आम्ही पार्लमेंटवर असा बॉम्ब टाकल्यावर सगळे काहीवेळ स्तब्ध झाले . आणि एकाएकी फिस्स करून सगळेचजण हसत सुटले . 
बंटी मालुसरेनं  सगळ्यांना आवर घातला . पुन्हा पार्लमेंट बसली . अन चार घंटे पन्नास सिग्रेटीनंतर पार्लमेंटचा असा ठराव झाला की नाहीतरी देशात सध्या प्रयोगशील राजकारणाचे वारे वाहत आहे . जनमत कधी नव्हे इतके सेन्शिटिव झाले आहे . Gay rights पासून ते foreign diplomats पर्यंत जनता कशावरूनही चेकाळून उठायला लागली आहे.  तेव्हा अशा अंदाधुंदीच्या वातावरणात गावातला एक नवीन राजकीय प्रयोग म्हणून भाऊ फकीरला आमदारकीला उभा करायला काहीएक  हरकत नाही.   
ठरलं ,भाऊ फकीर यंदा आमदारकी लढवणार!

      

एकदा आम्हाला राजकीय प्रयोगातला गिनिपिग बनवायचा ठरवल्यावर सगळी टीम पार्लमेंट कामाला लागली. प्रत्येकाने कामे वाटून घेतली .आमच्या मिशन आमदारकीचे राजकीय सल्लागार म्हणून मास्तर भागवत, थिंकटैंक म्हणून मास्टरमाईंड बंटी मालुसरे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून दुलेखान बाबर तर जनसंपर्क प्रमुख म्हणून मुन्ना गवळी यांनी जबाबदाऱ्या उचलल्या . प्रायोजकपदाची जबाबदारी मात्र पद्धतशीरपणे खुद्द आमच्याच गळ्यात येउन पडली .
दुलेखान बाबर म्हणजे निव्वळ गोबेल्सची अवलाद होता. प्रोपोगंडा कसा करावा ते कुणी दुल्याकडून शिकावं. दुल्या आधी पुण्यात फ्लेक्स-बँनर प्रिंटींगचं काम करायचा. त्यामुळे 'आधी इमेज बिल्डींग, मगच निवडणुकीची फिल्डिंग' असा टीमचा ठराव झाल्याबरोबर दुल्याच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली .

पांढरा शुभ्र शर्ट , पांढरी शुभ्र प्यांट , तेवढाच पांढरा बूट अशा वेषात एका हाताने मोबाईल कानाला लावलेला आणि दुसऱ्या हाताने इंग्रजी V अशी दोन बोटे दाखवणारा आमचा लाईफसाईझ  फोटो अन त्याच्या शेजारी हे वाक्य -

'डिपॉझिट जप्त होण्याला पण अंत आहे
म्हणूनच  भाऊ शांत आहे!'

कामं वाढली तसा दुल्या पेटलाच .
मुख्य प्रश्न फायनान्सचा होता. मास्तर भागवत म्हणाले, "राजकारणात सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पैशाला हात आखडून राजकारण होत नाही भाऊ फकीर" .
मग काय एक घाव दोन तुकडे . फटक्यात नदीकडची दोन एकर विकून झटक्यात पैसा उभा केला.
दुल्याचं फ्लेक्स तयार-

" नदीकाठची दोन एकर विकून निवडणुकीला पैसा उभा केल्याबद्दल भाऊचे अभिनंदन !
  चर्चा तर होणारच ! होऊ दे खर्च!!!"
           - शुभेच्छुक-
   भाऊ फकीर फ्यान क्लब .

प्रचारासाठी म्हणून आम्हाला एक गाडी विकत घेणं भाग होतं. गाडी घेतली.
दुल्या तयार -
" रोख क्याश देऊन नवी कोरी टाटा सुमो गोल्ड विकत घेतल्याबद्दल भाऊंचे  हार्दिक अभिनंदन ! होऊ दे डिझेलचा खर्च!"
खाली गाडीच्या बाजूला एका हातात मोबाईल  (अजून कानाला लावलेला)  अन दुसऱ्या हातानं गाडीची चाबी श्रीकृष्णासारखी फिरवीत असलेला आमचा फोटो!

दुल्याचं हे अती व्हायला लागल्यावर आम्ही मास्टरमाईंड बंटी मालुसरेला म्हटलं की हे काही बरं नाही.  अशानं आपण लोकांच्या नजरेत येऊ . त्यावर तो एकदम भारी बोलला. म्हणाला,
"भाऊ पंचे नेसून राजकारण करण्याचा  काळ गेला आता. आजकाल लोकांना नेता कसा भपकेबाज पाहिजे. आपण स्वतः जे करू शकत नाही ते जनता आपल्या नेत्यात पाहत असते. आपल्या दुष्काळी भागात तर भाऊ चार पाच गाड्या मागेपुढे घेऊन फिरल्याशिवाय अन अंगावर किलोभर सोनं घातल्याशिवाय  लोकं कुणाला नेता मानायलाच तयार होत नाहीत. म्हणून म्हणतो भाऊ ' Expenditure should not only be done , it must be seen to be done "
"अरे पण अशा मंदीच्या काळात भाऊनं ही  काय उधळपट्टी चालवली म्हणून लोक आपल्याला बदनाम करतील त्याचं काय ? राहुल गांधी काय म्हणील? नरेंद्र मोदी  काय म्हणील? ओबामा काय म्हणील ?"
"भाऊ, मंदीतच संधी साधायची असते. अमेरिकेला मंदीतून बाहेर काढण्यासाठी 'केन्स' नावाच्या त्यांच्याच अर्थतज्ञानं सर्वप्रथम 'होऊ दे खर्च' चा नारा दिला होता. अमेरिकी अध्यक्षाला त्यानं बजावलं  "Dig holes in the ground and then fill them up- होऊ दे खर्च!"
बंटी मालुसरेनं असं इंटरन्याशनल अपील टाकल्यावर मात्र आम्ही दोन्ही खिसे मिशन आमदारकीसाठी मोकळे करून दिले. तेवढंच इंटरन्याशनल अपील आमच्या प्रचाराला यावं म्हणून दुल्यानं अजून एक पोस्टर बनवलं . थेट अमेरीकेचे अध्यक्ष बराक ओबामा आमच्या गळ्यात गळा घालून स्माईल करीत असलेला फोटो अन त्याच्याखाली वाक्य -

" लक्षुमन राज्य करतो रामासंगं , भाऊची दोस्ती ओबामासंगं "
           -शुभेच्छुक -
 भाऊ फकीर NRI फ्यान क्लब !

गावात जिकडे तिकडे असले अचाट पोस्टर बघून आमच्याबद्दल हळूहळू जनमत जागे व्हायला लागले. चार दोन फुटकळ कार्यकर्तेही आमच्या मागे पुढे फिरायला लागले .
तेव्हा मास्तरच्या सल्ल्यानुसार गावात आमचा एक जाहीर कार्यक्रम घेण्याचे ठरले .
बंटी मालुसरे म्हणाला "हीच योग्य वेळ आहे. Timing is very crucial in politics."
पण कार्यक्रमाचे स्वरूप काय ठेवायचे यावर कुणाचे एकमत होईना . मुन्न्या म्हणायचा आपण एक भव्य marathon स्पर्धा ठेऊ . गुजरातेत नरेंद्र मोदी च्या 'रन फॉर युनिटी' ने मुन्न्या फारच भारावून गेला होता . पण आम्ही त्याच्या ह्या कल्पनेला व्हेटो दिला . सालं काही लोक चड्ड्या घालून रस्त्यावर पळाल्यामुळं समाजात जागृती कशी निर्माण होते हे कोडंच आपल्याला अजून उमगलेलं नाही. हा सगळा प्रकारच आपल्याला एकदम हस्तिदंती मनोऱ्यातला वाटत आलेला आहे . राष्ट्रीय एकत्मेसाठी पळा , जागतिक शांततेसाठी पळा, स्त्रियांच्या सुरक्षेसाठी पळा… अन  शेवटी पळता भुई थोडी झाली तरी एक प्रश्न सुटायच्या मार्गी नाही? अरे हुडूत!  मुन्नाचा प्रस्ताव आम्ही धुडकावून लावला .
बऱ्याच चर्चेनंतर  एक जंगी सभा घ्यायची असा  निर्णय पक्का झाला .सभेसाठी पत्रकं छापण्यात आली . आमचा राजकीय दृष्टीकोण सर्वसमावेशक वाटावा म्हणून या पत्रकांवर भारतीय उपखंडातल्या तमाम राजकीय विचारधारांच्या प्रणेत्यांचे फोटो छापण्यात आले . एका टोकाकडून सुरुवात करून - महात्मा गांधी, त्यांना खेटून भगतसिंग, त्यांच्या बाजूला अयोध्या मंदिराच्या ब्याग्रौंडवर उभे असलेले प्रभू रामचंद्र, त्यांना चिटकून दाढीवाले कार्ल मार्क्स, त्यांच्यानंतर दाटीवाटीने फुले-शाहू-आंबेडकर, त्यांच्या पलीकडे ह.भ.प. मोतीराम महाराज… सगळी मांदियाळी त्या पत्रकावर अवतरली .   मास्टरमाइंड बंटीचं लॉजिक पक्कं होतं -कोणीच सुटायला नको आणि कोणीच नाराज व्हायला नको. ह्याला तो  'Politics of Inclusion' म्हणायचा. "Not exclusion but inclusion is the essence of true democracy"!
सभेच्या तयारीसाठी मुन्न्यानं  कंबर कसली . गरज पडेल म्हणून तो आणखी डझनभर पोरं घेऊन आला आणि वाघासारखा कामाला लागला.
"मतदारसंघातली सगळी गावं कव्हर करायची म्हणजे भाऊ लाखभर तरी पत्रकं वाटावी लागतील." मुन्न्याने म्हटल्याबरोबर आम्ही फट्कन हजाराच्या नोटांचं एक बंडल काढून त्याच्या हातात दिलं.
"भाऊ धा-वीस गाड्या तरी बुक कराव लागतीन " म्हटल्याबरोबर आम्ही अजून एक बंडल त्याच्या हातात दिलं. नंतर नंतर कामं वाढली तसतशी मुन्न्याची पोरं सुद्धा पैसे न्यायला येऊ लागली. 'भाऊ शामियानावाल्याचे पैसे', 'भाऊ साउंडवाल्याचे पैसे', 'भाऊ डेकोरेशनचे पैसे','भाऊ डिझेलचे पैसे ',' भाऊ कार्यकर्त्यांना दारू तर पाजावीच लागते… त्याचे पैसे!'
मुन्ना एकदिवस म्हणाला, "भाऊ तयारी जोरदार चालू आहे . लई मोठी पब्लिक येणार असं दिसतंय . पण ऐन वेळेस काही राडा बिडा झाला तर आपल्याकडं बी काही मानसं पाहिजेत. "  असं म्हणून मुन्न्या दहाएक पहिलवानांच्या सरबराईचा खर्च घेऊन गेला.
पैसा पाण्यासारखा खर्च होऊ लागला . जादूची कांडी फिरावी तशी तिजोरीतली बंडलाची थप्पी खाली खाली येऊ लागली . रोज रात्री आमच्या स्वप्नात 'फादर ऑफ होऊ दे खर्च फिलॉसाफी' जे . एम . केन्स  यायचा आणि म्हणायचा ,
" खर्च करायला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होऊ दे खर्च!"

हे राड्याचं मुन्न्यानं इतकं जीवावर घेतलं होतं की खबरदारी म्हणून त्यानं दुल्याला सांगून एक खास पोस्टर बनवून घेतलं .  त्यात आमच्या रुबाबदार फोटोच्या शेजारी मुन्न्याचा खतरनाक गुंडासारखा दिसणारा क्लोज-अप फोटो अन खाली लिहिलेलं -
 " एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
   भाऊचा नाद केला तर हातपाय गळ्यात "
पण खटक्यावर बोट ठेवलं ते दुल्याच्या पुढच्या पोस्टरनं. सभा दोन तीन दिवसावर आली तेव्हा दुल्यानं गावातल्या मेन चौकात एक मोठ्ठ  फ्लेक्स लावलं . त्याच्यावर एका बाजूला दस्तुरखुद्द भाऊ फकीर आणि दुसऱ्या बाजूला चक्क कतरिना कैफ! खालची लाईन तर कहरच होती -
" राजाचं राजपण , कालपण आजपण
  फकीर भाऊ तुमच्यासाठी कायपण
  कधीपण , कुठेपण "

गावात चर्चेला नुसतं उधाण आलं . सभा उद्यावर आली म्हणता मुआइना करण्यासाठी म्हणून आम्ही गावात एक चक्कर टाकून यायचं ठरवलं .गाडी काढली आणि चार पाच कार्यकर्ते सोबत घेऊन आम्ही निघालो . गावात जिकडं तिकडं आमच्याच नावाची चर्चा सुरु ! चौकात, बाजारात, हॉटेलात, पानाच्या टपऱ्यावर, ब्यानर्सच्या खाली जिथं तिथं लोक गटागटानं जमून आमच्याच नावाचा महिमा गात होते . सगळं वातावरण फुल्ल पेटलं  होतं. आता सभा यशस्वी होणार हे तर पक्कंच होतं . आम्हाला तर दिवसाढवळ्या आमदार झाल्याचं स्वप्न पडायला लागलं होतं.  शेवटी एक नजर सभेच्या जागी टाकून येऊ म्हणून तिथे गेलो तर दुल्याचं लेटेस्ट ब्यानर स्वागताला तयारच होतं -
" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
   भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"
तृप्त मनाने आम्ही घरी परत आलो . म्हणजे एवढा खर्च केला तो काही फुकट जाणार नाही तर! 'मिशन आमदारकी' सक्सेसफ़ुल्ल होणार!
सगळ्या कार्यकर्त्यांचे आम्ही मनातल्या मनात आभार मानले आणि ठरवलं 'उद्याची सभा अश्शी गाजवून सोडायची की अख्खा मतदारसंघ दणाणून उठला पाहिजे' .

 ठरलं, आता लक्ष्य उद्याची सभा !



(दोन दिवसानंतर)

" फकीर भाऊ आहे राजकारणात दर्दी
  भाऊच्या सभेला लाखानं गर्दी !"

हे पोस्टर म्हणजे गावात विनोदाचा विषयच होऊन बसलं होतं.  सभेला काळं कुत्रं देखील फिरकलं नव्हतं.
आमच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला असा सुरुंग लागला म्हटल्यावर आमच्यावर तर आभाळच कोसळले. पाणी नेमकं मुरलं कुठं हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही तत्काळ पार्लमेंट बोलावली. सगळ्यांना तडक वाड्यावरच यायला सांगितलं .
पार्लमेंट बसली. आमच्या रागाचा थोडा निचरा झाल्यावर सगळेजण म्हणाले,
"भाऊ  झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं काय करायचं ते ठरवा."
"आता पुढचं अजून काय ठरवणार ? एका सभेतच आमचा पार लेहमन ब्रदर्स झालाय राजेहो !"  पैसाच संपला म्हटल्यावर कसचं करता राजकारण? "एका मताचा रेट हजार रुपये चाललाय  मतदारसंघात. मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत पाकिटं घरोघर नाही पोचली तर संपलं  आमचं  राजकारण"
मग सगळेजण आपापल्या परीने  पैसा जमवण्याचे उपाय सुचवू लागले .
मुन्न्या म्हणाला 'भाऊ ते आम आदमी पार्टीचं कोणीतरी म्हनं  नुस्त्या कविता वाचून दाखवून करोडपती झालंय . तुमच्या बी काही कविता हैतच कि भाऊ…'
 दुल्या म्हटला 'भाऊ, अजून एक पोस्टर बनवू आणि पब्लिकलाच चंदा देण्याचं अपील करू.'
 "अन पोस्टरवर काय लिहायचं?" .
सैपाक घरातून सौभाग्यवतीचा कडक आवाज आला,
" 'खायला नाही दाना अन मला आमदार म्हणा' असं लिहा म्हणाव."
राजकारणाच्या नादापायी चाललेली आमची उधळपट्टी बघून  बायको कावली होती . आमदारकीचा लढा आता आम्हाला घराबाहेर अन घराच्या आत दोन्ही ठिकाणी द्यावा लागत होता. अण्णा हजारे खरच हुशार माणूस . त्याला हे लाग्नाबिग्नाच लचांड आधीच कळलं असेल . आपल्या अंगात चळवळ करायची वळवळ आहे  हे लक्षात घेऊन त्यानं  लग्न करून हळहळत बसण्यापेक्षा अविवाहित राहून तळमळत बसणंच पसंत केलं . अण्णा हजारे जिंदाबाद!
बंटी मालुसरे म्हणाला, 'पैसा तर आम आदमी पार्टीला पण लागलाच असेल की . आपण थेट केजरीवाललाच पत्र लिहून विचारू'.
सगळे निघून गेल्यावर आम्ही पत्र लिहायला बसलो . त्यात आमची कैफियत मांडली आणि लिहिलं,
'जो गती भई कांग्रेस की, वही गती हमरी आज
बाजी जात 'आमदारकी'की,  केजरीवाल राखो लाज'
खरा मजकूर आम्ही पत्राच्या मागच्या बाजूस लिहिला , " अरविंद भाऊ तुमचे लग्न झाले आहे काय? झाले असेल तर तुम्ही अशा राजकीय उचापत्या करीत असताना तुमची बायको तुम्हाला काही म्हणीत नाही काय? म्हणत असेल तर तुम्ही तिला कसे  handle  करता? पत्राच्या मुख्य बाजूस विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे नाही दिलीत तरी चालतील पण ह्या प्रश्नाची उत्तरे मात्र तातडीने द्यावीत."
घायकुतीला आलेला-
आपला फकीर.

 दुसऱ्या दिवशी गावात मास्तर भागवतची गाठ पडली .
मास्तर म्हटले " अरे फकीर ,अशी कशी तुझी इलेक्शनची  तयारी भाऊ? पेपरात बोटभर बातमी वाचायला मिळाली  नाही तुझ्या नावची अजून ? तुला बजावून ठेवतो बघ पेपरात नाव छापून आल्याशिवाय राजकारणी म्हणून शिक्का लागत नाही माणसाला "
मास्तरनं  असं पेपरबाजीचं पिल्लू डोक्यात सोडल्यावर आम्ही लागलीच एक दोन कार्यकर्ते (भाड्याने) घेऊन   'दैनिक पिपाणी' चे  ऑफिस गाठले. तिथं तास दोन तास वाटाघाटी झाल्यानंतर संपादक  बातमी द्यायला तयार झाले. बदल्यात आम्ही दैनिक पिपानीच्या पुरवणीला पान भरून  रंगीत जाहिरात देण्याचे ठरलं. आधीच दिवाळं निघालेलं असताना ही जाहिरात बोकांडी बसल्यामुळं तर आमचं पार कंबरडंच  मोडलं. पण पेपरात नाव येणं तितकच महत्त्वाचं होतं म्हणून  यावेळेस आम्ही कर्ज काढायचं ठरवलं. दुल्या असता तर त्यानं ह्या प्रसंगावर काय सॉलिड लायनी छापल्या असत्या! पण पैशाचा ओघ आटला तशी दुल्याची कल्पकता आपोआप आटली होती.
बातमी छापून आणायची तर तशी काहीतरी घटना घडली पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसायचं ठरवलं.आता उपोषण करायचं म्हणजे काहीतरी मुद्दा तर पाहिजे . तेव्हा आमच्या सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीला साजेसा असा उपोषणाचा विषयसुद्धा सर्वव्यापी ठेवण्यात आला . तालुक्याच्या गावापर्यंत पक्का रस्ता, कांद्याचे भाव या लोकल मुद्द्यांपासून  ते जगातिक आर्थिक संकट , ग्लोबल वार्मिंग असल्या  ग्लोबल मुद्द्यांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यात घेण्यात आल्या . ठरल्याप्रमाणे उपोषणाच्या दिवशी दैनिक पिपानीचे पत्रकार हजर  झाले . मुलाखत सुरु झाली.  पण सुरुवातीलाच पत्रकाराने 'कलम ३७७ बद्दल तुमची भूमिका काय?' वगैरे अवघड जागचे प्रश्न विचारायला सुरुवात केल्यामुळे आम्ही पार बावचळून गेलो. तेव्हा मास्टर माईंड बंटी मालुसरे जीवा महाला सारखा धावून आला . पत्रकारानं लोकपाल  कायद्याबद्दल विचारलं तेव्हा बंटी म्हणाला 'भ्रष्टाचार ही  निव्वळ कायदेशीर बाब नसून ती  एक सामाजिक व सांस्कृतिक बाब आहे असा भाऊंचा विश्वास आहे.   केवळ ढीगभर कायदे करून भ्रष्टाचार नष्ट होणार नाही . भाऊ नेहमी म्हणतात  'If you have ten thousand regulations you destroy all respect for the law.'! पुढे कुठल्यातरी प्रश्नाला उत्तर देताना बंटी म्हणत होता, '… निर्णयक्षमतेचा प्रश्नच कुठे येतो. थेट लोकांनाच एसएमएस, ई मेल पाठवून कौल घ्यायचा . नुस्ती डेमोक्रसी नाही तर 'ई - डेमोक्रसी' हे भाऊचे लक्ष्य आहे!  
मुलाखत झकास झाली .
दुसऱ्या दिवशी  मुलाखतीची बातमी वाचावी म्हणून आनंदाने पेपर उघडला . पानामागून पाने चाळतोय पण बातमी काही सापडेना.  दैनिक पिपाणीने आमचीच पुंगी  वाजवली होती . बातमी छापायला दिलीच नव्हती. तावातावाने जाब विचारायला संपादकाकडे गेलो तर संपादक दुसऱ्याच पक्षाच्या एका वजनदार नेत्यासोबत वाटाघाटी करीत बसले होते . सगळा प्रकार आमच्या लक्षात आला . आमची इथे पण घोर फसवणूक झाली होती… . आता मात्र आम्ही पुरते हताश झालो . एव्हाना निवडणुकीच्या रिंगणात नेहमीचे जंगी लोक उतरले होते . अमाप पैसा आणि ताकत घेऊन उतरलेल्या ह्या लोकांसमोर आमची मोहीम पाला पाचोळ्यासारखी कुठल्याकुठे उडून गेली . आमचे नामोनिशाण कुठे राहिले नाही . नवीन पोस्टर्स ब्यानार्स सजू लागले होते. आमच्या मागेपुढे फिरणारे कार्यकर्ते आता यांचे झेंडे घेऊन मिरवू लागले … हे निवडणुकीचं खूळ डोक्यात घेतल्यापासून सगळीकडे आमची फजितीच होत चालली होती . सर्रकन डोळ्यासमोरून मागचे सगळे दिवस गेले आणि घोर निराशेने मनाला ग्रासले. खुळ्यासारखं मृगजळाच्या मागे धावत जाऊन आम्ही दिवाळखोरी तर  ओढवून घेतलीच होती पण सगळीकडे स्वतःचं हसं पण करून घेतलं होतं. आम्हाला स्वतःचीच प्रचंड कीव आली . भाऊ फकीर आपण फसलो. डोळ्यात पाणी आलं.
इतक्यात अर्जंट सांगावा घेऊन एकजण आला . पार्लमेंट वरून बोलावणं आलं होतं . डोळे  पुशीत आम्ही निघालो. पार्लमेंटवर सगळेजण तर जमले होतेच. पण कधी नव्हे ते मास्तर पण आले होते . मास्तरला पाहताच आमच्या अश्रुचा बांध फुटला . आम्हाला धीर द्यायला सगळेजण जवळ आले.  बंटी मालुसरेने हळुवारपणे आमच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक भयानक गौप्यस्फोट केला,
'भाऊ आम्हीच  सगळ्यांनी मिळून  तुमची गेम केली!'
आता मात्र आमच्या पायाखालची जमीनच सरकली.  काय बोलवं तेच सुचेना.  तेव्हा मास्तर पुढे सरसावले आणि म्हणाले,
'आमच्याच सांगण्यावरून झालं हे सगळं'.
 'मास्तर … तुम्ही !' कानावर विश्वासच बसत नव्हता .
 'होय आम्हीच. या राजकारणाच्या नादी लागून तू पार घरदार बुडवायला निघाला होतास. अर्ध्या हळकुंडानंच पिवळा झाला होतास तू ! अरे, करतूद करणाऱ्याकडं  सत्ता आपल्या पायानं चालत येत असते … राजकारण करावं आपल्यासारख्यानं, पण ते आधी स्वतःचं घरदार सांभाळून.  पण तू असा घरदार वाऱ्यावर  टाकून अन गुडघ्याला बाशिंग बांधून नेतेगिरीचे स्वप्नं बघायला लागला म्हणल्यावर आमच्याच्यानं रहावलं नाही बघ…  या आंधळ्या वेडापायी देशोधडीला लागलेली काय कमी पोरं पाहतोस तू रोज ?  तुला वेळीच सावरलं नाही तर तुझी तीच गत होणार हे दिसत होतं आम्हाला.  म्हणून तुला ताळ्यावर आणण्यासाठी आम्ही हे सोंग रचलं.'
'म्हणजे मग सगळा झालेला खर्च , विकलेली जमीन … '?
"काही कुठे गेलं नाही . ते सगळं या सोंगाचाच एक भाग होतं. आता तरी थाऱ्यावर ये पोरा!  काढून टाक हे खूळ डोक्यातून… "
असं म्हणून मास्तरनं मायेनं हात पाठीवरून फिरवला आणि अंगात  होतं नव्हतं तेवढं सगळं बळ गळून पडलं . दोन्ही डोळे गच्च मिटून खाली बसकन मारली . खूप वेळानं मान वर काढून डोळे पुसले आणि  निर्धारानं सगळ्यांकडे बघून आम्ही शेवटची प्रतिज्ञा जाहीर केली,
"दोस्तहो! आता आपण ठरवलंय . आजपासून आपण राजकारणाच्या वाटेला चुकूनही जाणार नाही . भाऊ फकीर राजकारणातून कायमचा संन्यास जाहीर करीत आहे .आणि यावेळेस भाऊ खरंच सिरियस आहे !"






Wednesday 4 December 2013

प्रेषित


सगळा गाव
अंधाराची चादर पांघरून
चुपचाप निजला की
मला आपोआप जाग येते

आणि

काळोखात निपचित पडलेल्या
रस्त्यांवरून
माझे पाय मला
अगतिकपणे ओढत घेऊन जातात

हमरस्ते मी मुद्दामहून टाळतो
मला गल्ली-बोळातून जाणारे
वळणा-वळणाचे रस्ते
स्वतःच खेचून आणतात

अनवाणीच असतो मी अशावेळी
म्हणून
जमिनीखालचे सुप्त प्रवाह देखील
मला सहज कळतात

शांत निजलेल्या घरांच्या भिंतींना चाचपडत
मी कानोसा घेत असतो
आणि ह्या भिंती मला
घरांची रहस्ये सांगायला लागतात

गढीखाली दडलेल्या धनाचे
रहस्य
माजघरात पुरलेल्या प्रेताचे
रहस्य
वेड लागलेल्या थोरल्या मुलाचे
रहस्य
तुळईला दोर बांधून गळफास घेतलेल्या कुमारिकेचे
रहस्य…
तडा गेलेल्या घरभिंतींचे
रहस्य

घरांनाही वासना असते
घरांनाही स्वप्न पडतात

घरभिंतींची गुपितं तोलून धरीत
हळुवारपणे वाट काढीत मी पुढे चालत जातो
आणि घरस्वप्नांचे धुके माझ्या मेंदूला
वेढून टाकते

आर्जवे करीत काही कहाण्या
अजून सरसावून येतात
काहींची फिर्याद काहींचा आक्रोश…
कल्लोळ माजतो

गल्लीबोळातून वाट काढीत
मी गावाबाहेर येतो तेव्हा
गावाबाहेरच्या तळ्यावर धुके
जमलेले असते

तिथे घरस्वप्नांची कावड मी
जमिनीवर ठेवतो
आणि
मातीमध्ये पाय रोवून
आकाशाकडे पाहत

अनंतात पसरलेल्या
काळोखास
दोन्ही हात उभारून
आवाहन करतो

"तुझ्या गर्भातून सोन्याची
किरणे निघू देत आणि
उजळून जाऊ देत ही भूमी

राख होऊ दे इथल्या घराघरांची
आणि ढासळू देत
भिंती

नष्ट होऊ देत ही कोळीष्टके
आणि मुक्त होऊ दे
घुसमटलेले श्वास


बदल्यात
ह्या युगाचे शाप मी माझ्या कपाळावर कोरीन
बदल्यात
ह्या युगाचे करंटेपण मी पाठीच्या कुबडावर वाहीन
आणि
कातडीवर मिरवीन ह्या युगाच्या जखमांची रांगोळी "


कळकळून मी प्रार्थना करतो
तेव्हा दिशा हेलावून जातात
प्राण कंठाशी येतो
आणि गात्रे थरथरू लागतात

हजारो रात्रींची जाग सोसून
जर्जर  झालेला मी कोसळतो
तेव्हा क्षितिजावर सोनेरी छटा
उमटू लागलेली असते








Sunday 13 October 2013

प्रार्थना




रोज सकाळी
झोपून उठल्यावर
एका नव्याच जागेवर
एका नवीनच चेहेऱ्यानिशी
जाग येवो

कालच्या दिवसाचा
रोजच्या
रोज
घडून येवो
complete retrograde amnesia

कसलेच hangovers
न राहो
मायेचे
संस्कृतीचे वा  
विकारांचे

स्मृतीच्या स्तंभात
guilt च्या cantilever वर
रोवलेले सगळे तुरुंग
वितळून जावो
सुर्योदयासरशी

कपाळावरच्या रेषा
चेहेऱ्यावरच्या सुरकुत्या
पोटावरची बेंबी
जनुकांचे नकाशे
मेंदूवरच्या वळ्या

हे ईश्वरा
माझी हात जोडून प्रार्थना तुला

माझी
ही
पाटी
पुन्हा
पुसून
टाक…

तुझ्यासहीत !


Saturday 24 August 2013

आजकाल मला काय झालंय ?


आजकाल मला काय झालंय तेच कळत नाही
अस्वस्थ म्हणून कशानं मी होतंच नाही
कशाचंच वाईट वाटत नाही
कशाचाच राग येत नाही .

सगळ्याच जाणिवांना जणू
कुणीतरी
जनरल अनस्थेसिया
दिल्यासारखं झालंय

डोळ्यावर झापडं बांधतो आणि
माझ्या माझ्या कातडीच्या आत
स्वतःचंच आत्मकेंद्री विश्व
जगत असतो मी .


तुपट यश
चरबट सौख्य
चकचकीत गाड्या
लखलखीत पगार
छमछमीत बार
छिनाल गाणी
फेसबुकी 'फ्रेंड्स'
पुचाट विनोद
उथळ विषाद
अळणी निषेध

महासत्तेच्या महान स्वप्नात
महान राष्ट्रातला महा गांडू झालो आहे मी .

भर रस्त्यात मस्तक्कात गोळी घालून कोणी,
माझ्या सहिष्णू परंपरांचा खून करतो
बेवारशी
कुत्र्यासारखा.
पण बंदुकीच्या गोळीबाराने माझ्या कानठळ्या बसत नाहीत

उजेडाच्या गावात, ऐन चौकात
शालीन पदराच्या चिंध्या चिंध्या होऊन उडत असतात
बाजारभर
दररोज .
पण तो आक्रोश ऐकून आग उतरत नाही माझ्या डोळ्यात

नागडे तांडव चालू असतात पिशाचांचे
सत्ते-मत्तेच्या कुंटणखाण्यांतून
आणि रांड बनून जाते
माझ्या प्राचीन घरासमोरची तुळस .
पण तिच्या विटंबनेचा सूड बनून रक्त पेटत नाही माझे

कशाचंच  वाईट  वाटत  नाही
कशाचाच     राग     येत      नाही

आणि …

त्याची
मला
साधी
लाज सुद्धा
वाटत
नाही ?


मॉलमधल्या गलबलाटात
chatting मधल्या कलकलाटात

लोकलच्या धक्क्यामध्ये
पालिकेच्या खड्ड्यामध्ये

दुष्काळाच्या चटक्यापाई
विकासाच्या फटक्यापाई

भ्रष्टाचाराच्या गटारामध्ये
निवडणुकीच्या बाजारामध्ये

फायलीच्या ढिगाऱ्याखाली
सायबाच्या ढुंगणाखाली

संस्काराच्या ओझ्याखाली
संस्कृतीच्या कुबडाखाली

पिचून पिचून पार चिखल झालो आहे मी

महासत्तेच्या महान स्वप्नात
महान राष्ट्रातला महा गांडू झालो आहे मी





Sunday 7 July 2013

मराठी आडनावे - एक चिंतन



शेक्सपिअर म्हणायचा नावात काय आहे ? आम्ही म्हणतो नावात नसेल हो काही, पण आडनावात मात्र बरंच काही आहे.  
पाणिनी ऋषीने तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतले.   महादेवाने डमरू वाजविले आणि त्यातून अख्ख्या शब्द्सृष्टीचा उगम झाला असे  म्हणतात . शब्दांमधून नावांचा उगम झाला… ईथपर्यंत सगळं  ठीक. पण पुढे नावातून आडनावे कधी आणि का उदयाला आली हा एक मोठाच प्रश्न आम्हाला हल्ली पडलेला आहे. 
त्याचा झालं  असं की आमचे एक मित्र आहेत. 'बब्रुवाहन महाडिक' म्हणून . यांना आपल्या नावाचा जबर अभिमान बरं का. एकदा हे असेच स्वतःवर खूष असताना आम्हाला म्हणाले, 
          " काही म्हण फकीरा, पण आपलं नाव कसं वजनदार वाटतं का नाही?" 
आता आम्हाला स्पष्टवक्तेपणाची खोड ! आम्ही आपलं सांगितलं प्रामाणिकपणे,
        " नाव आहे रे वजनदार… पण आडनाव मात्र जरा अश्लिलच वाटतं बघ "
 पठ्ठ्या पडला न पेचात!  म्हणाला,
           "त्यात अश्लील काय?"  
आता 'महाडिक' आडनावात अश्लील काय हे मराठी आणि इंग्रजी भाषेचं प्राथमिक ज्ञान असलेल्या कुणाच्याही लक्षात येईल.  पण हा जाणूनबुजून  'महाडिक'च होता . चार दिवसानंतर महाडिकचा मेसेज आला - 
          " साल्या फकीर!  आडनावाची टिंगल करतोस काय? मला कळलं तू काय म्हणालास ते ". 
 चार दिवसानंतर ! 
त्यादिवशी संध्याकाळी महाडिकने चार पैलवानांना सोबत घेऊन मला गाठलं.… आणि  चार दिवसानंतर थेट हॉस्पिटलमधेच आम्हाला शुद्ध आली . एक हात आणि एक पाय फ्र्याक्चरलेला  घेऊन  हॉस्पिटलमध्ये पडल्या-पडल्या आम्ही फारच आंतर्मुख झालो. असं का व्हावं ? जिगरदोस्त असलेल्या महाडिकने  आपल्याला डबल फ्र्याक्चर का करावं ? फक्त आडनावावरून ?  मग आम्ही 'आडनाव' या विषयावरच खूप विचारमंथन केलं .  त्या विचारमंथनाचा सारांश आपल्या आणि मराठी भाषेच्या सेवेत आम्ही इथे सादर करीत आहोत--
आडनाव ही एक लोकोत्तर संकल्पना आहे. उत्तरेकडच्या लोकांची आडनावे आणि दक्षिणेकडच्या लोकांची आडनावे यांची  स्वतंत्र वैशिष्ट्ये  आहेत . ही वैशिष्ट्ये राज्यनिहाय वेगवेगळी असतात.  
कपूर,चोप्रा, खन्ना ,बेदी ही  पंजाबी आडनावं  कशी श्रीमंत आणि glamorous वाटतात . 
तर शहा, पटेल, पारीख, मेहता ही  गुजराथी आडनावं तुंदिलतनु आणि थुलथुलीत वाटतात.  
केरळातली अय्यर, मेनन, सुब्रमण्यम ही  मल्लू आडनावं  intellectual  वाटतात तर 
बंगाल्यांच्या दास, घोष, बनर्जी, मुजूमदार या आडनावांना क्रांतीचा वास येतो. 
पण मराठी माणसाच्या आडनावाचे   असे  वैशिष्ट्य कोणते  याचा आम्ही फार विचार केला . प्रगाढ चिंतानांती आम्ही असा निष्कर्ष काढला की  'अगम्य आडनाव असणे'  हे मराठीपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे . खरा मराठी माणूस तोच ज्याच्या आडनावाचा काही म्हणून अर्थ लागत नाही . जेवढे आडनाव अगम्य तेवढे  त्याच्यात मराठीपण ठासून भरलेले.  (पहा - चव्हाण, भोसले,शिंदे, पवार इ . ). ही आडनावं  इतकी परिचयाची झाली आहेत की  मुळात ती अगम्य आहेत हे आपल्या लक्षातही येत नाही .  नाहीतरी धोंडगे, शेंडगे, शिंगटे असल्या आडनावांचा तुम्ही लावून लावून काय अर्थ लावाल ?

मराठी आडनावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती मुळातच  'Non -glamorous' असतात . म्हणजे प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय ह्या बायका  (की  मुली ?) त्यांच्या आडनावामुळेच  glamorous  वाटतात असे  आमचे  मत आहे . हेच त्या बिचाऱ्या मराठी घरात जन्माला येऊन 'प्रियांका पोटदुखे' आणि 'ऐश्वर्या ढोले' असल्या नावानिशी चमकू म्हटल्या असत्या तर झाल्या असत्या का एवढ्या फेमस?  म्हणजे बघा, आता 'शारोन स्टोन' हे नाव जितकं glamorous वाटतं तितकं 'सुवर्णाबाई धोंडे' का वाटू नये ?   'स्टेलिओन' आडनाव जेवढं  macho वाटतं तेवढं  'घोडके' हे आडनाव का वाटू नये? 'चावला' हे आडनाव glamorous  आणि 'तांदळे'  हे आडनाव उगाच गरीब होतकरू असल्यासारखे का वाटावे?  तरी बरं मातोंडकर, बेंद्रे (असल्या) आडनावाच्या मुलींनी (की  बायकांनी?) मराठी नावाला थोडं फार का होईना glamour ( थोडे फार का होईना कपडे घालून) मिळवून द्यायचं पुण्यकर्म केलय. पण महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णदिन तोच असेल जेव्हा ढमढेरे, धोत्रे किंवा जमसांडे या आडनावाची तरुणी मिस युनिवर्स होईल !
आडनावासंबंधी आमची अजून काही निरीक्षणे आहेत ती सोदाहरण खाली देत आहोत. 
मराठी आडनावाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे  ठासून  भरलेली दांडगाई.  त्यातली  जरग,जठार, जाचक, गडाख ही नुसती आडनावं जरी उच्चारली तरी अंगाला दरदरून घाम फुटतो! या उलट काही आडनावं  मात्र नावाला जागत नाहीत. 'खुळे' आडनावाचे आमचे एक मित्र आहेत. हे एकदा बोलायला लागले की ऐकणाऱ्यालाच  खुळं लागायची पाळी (वेळ ) येते.  बरं यांना उलटं काही बोलावं  तर हे एवढे दांडगट की  आपलाच खुळखुळा करून टाकतील. दुसरे असेच आमचे मित्र 'भोळे ' आडनावाचे आहेत. त्यांचे  आडनाव भोळे असणे म्हणजे तमाम  महाराष्ट्राची शुद्ध फसवणूक आहे. हे भोळे इतके अतरंगी आहेत की  त्यांच्या सौभाग्यवती देखील " भोळे हे फिल्मी गडे" असे गाऊन त्यांचे प्रियाराधन करतात असे आमच्या ऐकिवात आहे.  
काहीजण मात्र आडनावाला जागतात. शाळेत आमचे एक मित्र होते. त्याचं  आडनाव होतं 'रणवीर' . ह्यांचे वडील मिलिटरीत होते आणि हा क्रिकेट टीममध्ये एक नंबरचा batsman होता . वेगवेगळया  मार्गाने का होईना पण बापलेकांनी आडनाव सार्थक केलं !  
बरीच मराठी आडनावं मात्र धारणकर्त्याला awkward करायला लावणारी असतात. उदा. नागवेकर, भोंगळे ई.   
एखाद्याला आडनाव विचारल्यावर त्याने 'नागवेकर' असे सांगितल्यावर ते assertive statement आहे की imperative statement ते कळायला मार्ग नसतो .
'भोंगळे' आडनावाची पंचाईत अशी आहे की अशा व्यक्तीचे first name तुम्हाला माहीत नसेल आणि ऐन गर्दीत यांना हाक मारून बोलवायची वेळ पडली तर फारच अवघड परिस्थिती निर्माण होते. ( आमचा आपणास सल्ला आहे की ह्या आडनावाची व्यक्ती- स्त्री किंवा पुरुष - आपल्याशी परिचित झाल्यास  त्याचे किंवा तिचे 'प्रथम नाम' आधी  विचारून घ्यावे . म्हणजे गर्दीत पंचाईत होणार नाही .)     
'उंद्रे' आडनावाचे आमचे एक मित्र कॉलेजात होते . त्या आडनावाखाली  ते इतके ऑक्वर्डून गेले होते की  पुढे त्यांनी आडनावाचे वजन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून 'उंद्रे पाटील' असं नाव वापरायला सुरुवात केली . कॉलेजातले काही टगे ( दस्तुरखुद्द त्यातलेच ) मात्र त्याला मुद्दाम हिणवायचे ,
    "उंदर्या , साल्या तू उद्या वाघ जरी मारलास  तरी पेपरात 'उंदरे यांनी वाघ मारला' असेच छापून येईल "
तथापि सांख्यिकीच्या दृष्टीने पाहिल्यास अशी आडनावे विरळच असतात . काही मराठी आडनावे मात्र घाऊक असतात .या आडनावाची माणसे महाराष्ट्रात पोत्याने आढळतात .  'पाटील' हे त्यातले अग्रेसर आडनाव. पाटील आडनावाने अख्खा  महाराष्ट्र भरून ( (आणि क्वचित भारून ) टाकला आहे . इतके की 'महाराष्ट्र म्हणजे पाटील'  असे समीकरणच रूढ झाले आहे. हे आडनाव जातीधर्माच्या सीमा जुमानीत नाही . पाटील आडनाव असले म्हणजे आडनाव विचारून जातीचा अंदाज काढू बघणाऱ्याची  मोठी पंचाईत होते . मराठे,ब्राह्मण दलित मुस्लिम… पाटील कुणीही निघू शकतो . डॉ. खंडीझोडे नावाचे आमचे एक  सर्जरीचे प्राध्यापक होते . त्यांचे  व्यसन आणि व्यासंग दोन्ही दांडगे होते. ते म्हणायचे,
 " धर्मात हिंदू, पक्षात काँग्रेस, प्राण्यात अमिबा आणि आडनावात पाटील - omnivorous and  formless.  "  
आमच्या विचारमंथनातही  आम्हाला याचा वारंवार प्रत्यय येत आहे . 
पाटील, कदम,मोरे,जोशी, कुलकर्णी,कांबळे  ही आडनावे आणि सचिन, संदीप, नितीन, सायली, अश्विनी ही  नावे ह्यांचे permutation-combination करून पाहिल्यास अर्ध्या महाराष्ट्रीयांची नावे cover होतात असा आमचा दावा आहे . 'महाराष्ट्रात प्रत्येकाला 'संदीप पाटील' नावाचा एक मित्र असतो' आणि 'प्रत्येकाचे आयुष्यात एकदातरी 'सायली जोशी' नावाच्या मुलीशी प्रेम जडलेले असते' असा आमचा सिद्धांत आहे.( अपवाद असलेल्यांनी वाट पहावी. )
आडनावांबद्दल असे चिंतन चालू असताना आमच्या मनाला बरेचसे  निरागस प्रश्नही पडले. जसे की - 
 ज्यांचे आडनाव 'जाधव' असते त्यांचे नाव 'माधव' कधीच का असत नाही ? 
'घैसास' आडनाव असल्यास मुलाचे नाव 'कैलास' ठेवू नये असे ठरवून होते की योगायोगाने ? 
'श्रोत्री' आडनाव असलेले लोक घराण्यात कुणी बोबडा जन्माला येऊ नये म्हणून काही विधी करीत असतील का? वगैरे. पण ज्या प्रश्नाने आमची झोप उडवली आहे तो म्हणजे - ही आडनावे ठरविते तरी  कोण? आणि त्यांना ते सुचते तरी कसे?
आडनाव मुक्रर करण्यात 'self - determination principle' नक्कीच लागू होत नसावे. उगाच कोण स्वतःचेच आडनाव 'लांडे' असे ठेऊन घेईन ? 
आडनाव देणारी एखादी गुप्त एजन्सी कार्यरत असावी असाही आम्हाला काही काळ संशय होता . राजाश्रयाने तिचे काम चालू असावे असे वाटते . त्या काळात राज्यपद्धती oligarchic असावी . आपल्या विरोधकांचा   पिढ्यानपिढ्या पुरून उरेल असा सूड उगवण्यासाठी त्यांनी असली भयंकर आडनावे शोधून काढली असावीत . 'गोडबोले' सारखी मधाळ आडनावे ठेऊन घेणारे मात्र ह्या एजन्सीतलेच insiders असावेत.
शेवटी लोकांनीच मोठे बंड करून ही जाचक पद्धती  झुगारून दिली  आणि सरळ गावावरून आडनावे लावण्याची प्रथा महाराष्ट्रात पडली असावी . उदा. वसमतकर  नांदेडकर;  पारसकर , घोनसीकर…. करमरकर  ई.
      
व्यवसायानुसार आडनावे पडली असावीत असे मात्र आम्हाला वाटत नाही . कारण तसे म्हटले तर  कुटे, ठोके, कुबल ह्या आडनावाचे लोक हाणामाऱ्या करण्याच्या सुपाऱ्या  घेत असावेत तर  डाके, डाखोरे, चोरमले  हे लोक व्यावसायिक दरोडेखोर असावेत असे मान्य करावे लागते. पण हे काही आमच्या सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही . महाराष्ट्रात तर खुपसे, मानकापे, गळाकाटू यासारखी अशी काही आडनावे आहेत की  ती ऐकूनच एखाद्या  वधूपित्याला त्या  घरी मुलगी द्यावी की  नाही असा प्रश्न पडावा! 
शिवाय व्यवसाय सिद्धांतानुसार रुकारी, खल्लाळ यासारख्या अगम्य आडनावाचे  लोक नेमका काय  व्यवसाय करीत असावेत याचा तर्क लावता येत नाही . सबब हा सिद्धांताच आम्ही  मोडीत काढला. 
स्वभावानुसार आडनावे ठरत असावीत असा दुसरा एक कयास संभवतो. पण तसे घडत असते तर 'थापा' आडनावाच्या लोकांनी राजकारणात भारतीय उपखंड गाजवला असता . पण तसेही काही दिसत नाही. म्हणून हा ही सिद्धांत आम्ही बाद ठरवला . 
हे सर्वच  सिद्धांत बाद ठरतात म्हटल्यावर  आम्हीच आमचा एक नवा सिद्धांत मांडला .               
चार्ल्स डार्विन च्या 'Theory of  Evolution' वर आधारित ह्या सिद्धांताचे नामकरण आम्ही ' Theory of  Surnames' असे केले आहे. ( यथावकाश 'Origin of surnames' हा ग्रंथ लिहिण्याचा आमचा मानस आहे. )  
आमच्या सिद्धांतानुसार जशी जशी समाजाची उत्क्रांती होत गेली तशी तशी त्या त्या कालखंडातल्या भौगोलिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीनुसार मानवी समूहांची आडनावे ठरत गेली. 
उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात मानव जेव्हा टोळ्या-टोळ्यांनी  इतर प्राणिमात्रांच्या सोबतीनेच रहात होता त्या काळातच कोल्हे, लांडगे, डुकरे, चित्ते अशी प्राणिजन्य आडनावे पडली  . वाघ हे त्या टोळीच्या प्रमुखाचे आडनाव असावे . प्रमुखास मारून टोळीचा कब्जा घेणारे 'वाघमारे' असावेत . 
उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात काही कारणामुळे भीषण दुष्काळ पडून प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झाले असता उपासे,कोरडे, भाजीभाकरे अशा आडनावांची fashion आली असावी . 
हा दुष्काळ संपून पुढे अन्नधान्याची  सुबत्ता आल्यावर लोकांनी हरखून जावून दुधभाते, दहिफळे, भातलवंडे अशी आडनावे धारण करायला सुरुवात केली असावी .      
 ( पोटदुखे ,हगवणे ही  आडनावे  या सुबत्तेच्या परमोत्कर्षाच्या काळातली  असावीत . )
उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर धातूचा शोध लागल्यावर तांबे, लोखंडे, पितळे अशी धातूजन्य आडनावे निघाली . अश्मयुगात ज्याप्रमाणे 'खडके ' आणि 'दगडे' ही प्रमुख  घराणी होती त्याचप्रमाणे लोहयुगात  व ताम्रयुगात वरील आडनावाची घराणी प्रभावी राहिली असावीत.  
ह्याच  काळात त्यांची  सुबत्ता पाहून लुटालूट करण्यासाठी काही रानटी  टोळ्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले असावे .  मघाशी उल्लेख केलेली 'रुकारी' व 'खल्लाळ' यासारखी कुठेच तर्कसंगती  न लागणारी आडनावे याच  रानटी टोळ्यांतली असावीत  . ह्या टोळ्यांविरुद्ध पराक्रमाने लढणारे  लोक हे उपरोल्लेखित खुपसे, मानकापे शिवाय  ढाले  या आडनावाचे असावेत. लढाईत प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी झाली होती याचा अंदाज युद्धामुळे जायबंदी झालेल्यांच्या एकबोटे, आंधळे ,घयाळ ,मानमोडे   अशा आडनावावरून येतो . 
युद्धानंतर काही काळाने शांतता प्रस्थापित होऊन सगळी स्थिरस्थावर झाली असता सुबत्ता व स्थैर्य यांची नैसर्गिक परिणीती म्हणून एक विचारयुग अवतरले . विचारे , शहाणे, सहस्त्रबुद्धे ही  आडनावे याच 'Renaissance' च्या काळातली असावीत . 
विचारयुगाचा अतिरेक होऊन जास्त विचार केल्यामुळे लोकांचे केस झडायला लागले आणि 'टकले' हे आडनाव उदयास आले …. 

अशाप्रमाणे  आमचा ' Theory of  Surnames'  हा सिद्धांत पूर्णपणे तर्काधिष्ठित असून अजून बराच प्रदीर्घ आहे . विस्तारभयामुळे आम्ही तो इथे संक्षेपात देत आहोत. आमच्या या सिद्धांतामुळे  बरेच वादंग माजण्याची  शक्यता आहे याची आम्हाला कल्पना आहे . झालेच तर लोक आम्हाला वाळीत टाकतील . आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्याही देतील . पण सत्याचा शोध घेण्याच्या मार्गावर कितीही अडचणी  आल्या तरी त्याला आम्ही तयार आहोत. मग महाडिक सारख्यांनी आमच्यावर रोज हल्ले केले तरी बेहेत्तर ! पण असे होणार नाही याची आम्हाला जाण आहे कारण महाराष्ट्राच्या सहिष्णू आणि सत्यशोधक परंपरेवर आमचा विश्वास आहे. 
तथापि आमच्या या शोधानिबंधामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही त्यांची प्रांजळपणे माफी मागतो. 
पण तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आमच्या चिंतनात आम्हाला जे सगळ्यात महत्वाचं गवसलं ते हे नाहीच मुळी ! ते अजून काहीतरी वेगळंच आहे. यापेक्षाही कैक पटीने मौल्यवान असं....!   
आडनावांच्या विरोधाभासातून, त्यातून निर्माण होणाऱ्या  विनोदातून आम्हाला लक्षात आली ती आडनावाची निरर्थकता… आम्हाला लक्षात आले की कसे आपण आडनावाशी आपले अहंकार जोडून घेतो...  कसे  आपल्या जातीची धर्माची ओळख आपल्या आडनावाशी जोडून देतो… आणि मग त्यासाठी इतके आग्रही होतो की  आपण कुठल्याही थराला जावून पोचतो . एकमेकांची डोकी फोडतो, माणसाला माणसापासून तोडतो, व्यक्तीला व्यक्ती म्हणून न ओळखता आडनावावरून ओळखतो … ज्या पूर्वजांमुळे त्या आडनावाला महात्म्य प्राप्त झालं  त्यांनाच आपण लाज आणतो… त्याच आडनावाशी  आपण राजकारण जोडून देतो आणि लोकशाहीसारख्या उदात्त संकल्पानाची धूळधाण करतो …. 
माझं एक ऐका! एकदा आडनावाचे सगळे संदर्भ बाजूला काढून बघा. त्या आडनावात असलेला विनोद शोधा आणि एकदा आपलंच आडनाव उच्चारून हसून पहा...  पुन्हा पुन्हा म्हणा आणि खदखदून हसा . घराबाहेर पडा . मित्रांना भेटा . त्यांचं  आडनाव   विचारून हसा . त्यांना तुमचं आडनाव सांगून हसा . आणि तुमच्या हसण्यासोबत तुमच्या आडनावाला चिकटलेले सगळे दांभिक संदर्भ गळून पडू द्या...  सगळा निचरा होऊ द्या.  आणि फक्त एक माणूस म्हणून घरी परत जा !
आम्हाला सगळ्यात मौल्यवान शोध लागला आहे तो 'Theory of Surnames' चा नव्हे तर या 'Therapy of  Surnames' चा !
चला, आज  हॉस्पिटल मधून आमचा डिस्चार्ज आहे . महाडिक स्वतःची गाडी घेऊन मला घरी न्यायला आलाय!   

    



Monday 1 April 2013

एक 'एप्रिल फूल ' मुलाखत !



सनदी अधिकारी म्हणून आम्हाला पदरात घ्या अशी विनंती गेली कित्येक वर्षे आम्ही राज्य शासनाकडे करतोय . आमच्या अर्ज-विनंत्यांना मान देऊन शेवटी त्यांनी आमची कलेक्टरकीसाठी  मुलाखत घ्यायचं ठरवलं . आणि मुलाखतीसाठी आम्हाला थेट मंत्रालयात पाचारण केलं . तिथे झालेल्या आमच्या मुलाखतीचा हा वृत्तांत … 



(मुलाखत मंडळाच्या अध्यक्षांनी आमचा बायो-डाटा वाचला आणि पहिला प्रश्न विचारला )

तुम्ही मराठवाड्यातले दिसता.  सांगा पाहू दुष्काळ म्हणजे काय ?
 दुष्काळ हा तीन प्रकारचा असतो. ओला  दुष्काळ ,कोरडा दुष्काळ आणि  अकलेचा दुष्काळ .
पहिले दोन दुष्काळ परवडतात  पण तिसऱ्या प्रकारचा दुष्काळ हा  फार वाईट असतो .  अकलेचा दुष्काळ असला की  बाकी दोन प्रकारचे दुष्काळ त्यामागे आपोआप चालत येतात.
अकलेच्या  दुष्काळाला स्थलकालाचे बंधन नसते.  किंबहुना काही भागात हा दुष्काळ endemic म्हणून असतो . गीतेत ज्याला 'स्थानुरचलोयम  सनातनः'  म्हटले आहे तसा तो काही भारतीय राज्यकर्त्यांच्या ठायी दिसून येतो.
प्रशासनाच्या भाषेत त्याला 'नियोजनाचा अभाव' किंवा फारच sophisticated  शब्द  द्यायचा झाला तर 'policy paralysis' असेही म्हणतात .
हजारो कोट खर्चूनही केवळ  शून्य पॉईन्ट  काहीतरी टक्के शेतजमीन  सिंचनाखाली येणे, दुष्काळप्रवण  भाग आहे हे माहित असूनही साठ पासष्ट वर्षात काहीही ठोस उपाय-योजना न करणे  ही अकलेचा दुष्काळ पडल्याची  काही उदाहरणे देता  येतील .

जल-सिंचन खात्याची कार्ये सांगा. 
 जल सिंचन खात्याला सोन्याचे  अंडे देणारी कोंबडी असेही म्हणतात . महाराष्ट्रात नुकत्याच उघडकीस आलेल्या काही घटनांवरून ही  कोंबडी काहीजणांनी कापून खाल्ली असा संशय आहे.

तुम्हाला कार्ये विचारलीत तुम्ही व्याख्या सांगताय!
sorry  सर … जल-सिंचन खात्याचे मुख्य कार्य म्हणजे पाट बंधारे प्रकल्पांची टेंडरं भरणे आणि त्यातून अमाप पैसा खाणे . असे करताना तळागाळातील आपल्या कार्यकर्त्यांचे  उखळ पांढरे होईल याकडे खास लक्ष दिले जते. प्रकल्पाची जागा चुकली तरी चालेल पण कार्यकर्ता  नाराज नाही झाला पाहिजे हे या खात्याचे मार्गदर्शक तत्त्व आहे. म्हणूनच हे खाते नेहमीच वजनदार माणसाकडे दिले जाते. वर सांगितलेल्या कार्यांव्यातिरिक्त  दुष्काळाची उपाययोजना म्हणून जलसंधारण  करणे वगैरे चिल्लर कामेही जल-सिंचन खात्याला करावी लागतात . पण ही  कामे दुय्यम किंवा वैकल्पिक समजण्याची महाराष्ट्रात प्रथा अहे.

 घटनेतील कलम ३७१   कशाबद्दल आहे  ?
विभागीय असमतोल  राहू नये  व 'अनुशेष! अनुशेष!' म्हणून गळा काढून आपली झोळी भरणाऱ्या राजकारण्यांची पिलावळ निपजू नये म्हणून घटनेतच अशा प्रकारच्या राजकारण्यांची नसबंदी करण्याची तरतूद  आहे . ती म्हणजे  कलम  ३७१   अंतर्गत असलेली वैधानिक विकास महामंडळे . तथापि हे कलाम सत्ताधारी  पक्ष धाब्यावर बसवतात . कारण तसे केले नाही तर खरच समतोल विकास साधेल  आणि विकासाच्या राजकारणाशिवाय पर्याय राहणार नाही अशी धास्ती त्यांना वाटत रहाते .

राज्यात विविध महामंडळे स्थापन करण्यामागचा  हेतू काय आहे ?
 लोकमतावर निवडून यायची क्षमता नसलेल्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करणे हा या महामंडळांच्या स्थापनेमागचा मुख्य हेतू असतो . मर्जीतल्या लोकांची,, इमानी नोकरशहांची ,पडेल नेत्यांची या महामंडळावर नेमणूक करून त्यांनी केलेल्या सेवेची पावती देणे हा आपल्याकडे एक राजकीय शिरस्ता आहे.

अशी काही अजून उदाहरणे तुम्हाला देता  येतील का?
होय सर. राज्यसभा आणि विधान परिषदा हि अनुक्रमे राष्ट्रपातळीवरील आणि राज्यपातळी वरील सर्वात मोठी राजकीय पुनर्वसन केंद्रे आहेत.
 
राज्यपाल जास्त पावरफुल असतो कि राष्ट्रपती ?
नर्मदेचा गोटा  जास्त गुळगुळीत असतो कि गंगेचा ?

तुम्ही मुलाखत द्यायला आलात कि घ्यायला आलात?
सॉरी सर!  संसदीय लोकशाहीमध्ये  कार्यकारी मंडळ जर इमानेइतबारे  काम करील तर या पदांना फार महत्व उरत नाही . म्हणूनच या पदांना  'Rubber stamp 'ची उपमा दिली जाते. माझ्या ओळखीचे  एक थोर राजकीय विचारवंत   'राष्ट्रपती हे भारतीय राज्यघटनेचे अपेंडिक्स आहे'  या मताचे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे विभाजन करून वेगळा विदर्भला मान्यता द्याला पाहिजे का? तुम्हाला काय वाटते?
 एक न धड भरभर चिंध्या करून काही उपयोग होईल असे मला वाटत नाही . रक्त सांडून आपण एकसंध महाराष्ट्र घेतला आणि आता आपणच त्या महाराष्ट्राला ओरबाडून रक्तबंबाळ   करतोय .  वेगळा विदर्भ केला काय अन वेगळा मराठवाडा केला काय आपल्यासमोरच्या समस्य….   

सध्या महाराष्ट्रासामोरील मुख्य समस्या कोण कोणत्या आहेत?

दुष्काळ, प्रादेशिक असमतोल, कायदा सुव्यवस्था, नक्षलवाद, स्त्री-भृणहत्या ,दलितांवरील अत्याचार…   सर तुमच्याकडे वेळ किती आहे.?त्याचं  काय रात्री ११ ला माझी शेवटची लोकल असते.

'good governance'  म्हणजे काय?
माफ करा सर, मला या प्रश्नाचे नक्की उत्तर माहित नाही .  मला तर वाटते काही प्रशासकीय विचारवंतांच्या डोक्यातून निघालेली ही एक कपोलकल्पित संकल्पना असावी .  good governance  ही  'नेती-नेती' न्यायाने  अभावातूनच लक्षात घेण्याची संकल्पना अहे. तथापि , नागरिकांच्या अन्न, पाणी ,वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पुरेशा प्रमाणात भागवल्या गेल्या तरी सुशासन आहे असे म्हणता येईल  असे मला वाटते .

(यानंतर मंडळातल्या दुसऱ्या सदस्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.)

तुमच्या hobbies  and  interests मध्ये तुम्ही 'spirituality' असं  लिहिलय.  spirituality  म्हणजे काय?
spirituality ला सोप्या भाषेत 'बुवागिरी' असे म्हणतात .  धार्मिकतेच्या  नावाखाली स्वतःचे प्रस्थ वाढवून घेणे हा बुवागीरीचा हेतू असतो . त्यासाठी फार उच्च दर्जाचे talent  लागते . प्रशासनात जर काही जुगाड नाही जमला तर पुढे बुवागीरीतच करीअर  करायचे असा माझा विचार आहे. परमपूज्य आसारामजी बापू हे माझे आदर्श आहेत.

बुवाबाजीच करायची तर मग प्रशासनात का येताय ?
सर, बुवागीरीसाठी जो attitude लागतो तो प्रशासनामध्ये काम केल्याने develop  होईल असा माझा विश्वास आहे.   प्रशासकीय अधिकाऱ्यांचा  मख्खपणा- म्हणजेच कितीही समस्या आल्या तरी निर्विकार रहाणे- हा खरे तर एक आध्यात्मिक गुण आहे. गीतेत ज्याला 'समशीतोष्ण सुखदुखेषु' असं  म्हटलंय तो एक तर अधिकारी असू शकतो नाहीतर बाबा!  प्रशासनात मला या skill development ची संधी तर मिळेलच शिवाय माझ्या कारकिर्दीत निर्माण झालेले राजकीय हितसंबंध पुढे बाबागीरीत उपयोगी पडतील असे मला वाटते .

सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वहात आहे. या निवडणुकीत मुख्य मुद्दे काय असतील असं  तुम्हाला  वाटतंय?
राहुल गांधीने लग्न करावे की  नाही; करावे तर कुणाशी करावे; संजय दत्तला अटक ह्वावी कि नाही; असे बरेच गंभीर मुद्दे यावेळच्या निवडणुकीच्या तोंडावर उभे राहिलेले आहेत.  शिवाय तोंडी लावायला आर्थिक मंदी , अंतर्गत सुरक्षा, भ्रष्टाचार, महागाई, बलात्कार  इत्यादी चावून चोथा झालेले  विषयही आहेत. तथापि भारतीय लोकशाहीची परंपरा पाहता यावेळेसही जातीय समीकरण आणि पैसा हेच मुख्य मुद्दे ठरतील असा माझा अंदाज आहे.

राज ठाकरे यांच्या राजकीय शैलीबद्दल तुमचे काय मत आहे?
(या प्रश्नाचे उत्तर आम्ही जाहीर करू इच्छित नाहि. प्रश्न अभिव्यक्तीचा नाही . प्रश्न वैयक्तिक  सुरक्षेचा आहे.)

(यानंतर  मुलाखत मंडळाच्या तिसऱ्या  सदस्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली . )

आर्थिक तूट म्हणजे  काय?
राज्याच्या आर्थिक व्यवहारामध्ये अंगापेक्षा बोंगा मोठा झाला की जी परिस्थिती उद्भवते तिला आर्थिक तूट म्हणतात .

त्यावर उपाय म्हणून काय करतात?
आर्थिक तूट  घालवण्याचा सोपा उपाय म्हणजे उधारी घेणे . माझ्या वैयक्तिक अनुभवावरून कुठल्याही आर्थिक समस्येवर मला हा फारच नामी उपाय वाटतो . यात परतफेड नाही करता आली तर दिवाळखोरी जाहीर करता येण्याचाही पर्याय असतो. उधार उसणवारी करणे  हे आपल्या सामाजिक संस्कृतीचेच   नव्हे तर आर्थिक धोरणाचेही महत्वाचे अंग आहे. आपला देश जागतिक बँकेकडे उधारी मागतो, दुष्काळात आपले राज्य केंद्राकडे उधारी मागते. तेव्हा कुठलाही संकोच न बाळगता  "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" हे  आपल्या आर्थिक धोरणाचे तत्त्व म्हणून स्वीकारायला हवे . पूर्व नियोजन करून किंवा कष्ट करून संचित जमवण्यापेक्षा  'तंगी आली की हात पसरणे' हीच  जास्त pragmatic economic policy आहे असे मला वाटते.    

गुड! तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून नेमल्यास तुम्ही प्राधान्याने कोणत्या गोष्टी कराल?
सर्वप्रथम मी कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष घालीन . महाराष्ट्र पोलिसांना आमदार- खासदारांच्या गाड्यांचे नंबर माहित नसल्यामुळे नियमाचे उल्लंघन झाले इत्यादी  क्षुल्लक कारणावरून पोलिस मुर्खासारखे त्यांच्या गाड्या अडवतात आणि मार खातात . यासाठी  पोलिसांना खास प्रशिक्षण देउन व्हि. आय . पी . च्या गाड्या कशा ओळखायच्या , अशी गाडी आली कि नियमपुस्तिका बाजूला ठेवायची आणि लवून मुजरा कसा करायचा याचे ट्रेनिंग देण्यात येईल. दुसरी मुख्य समस्या म्हणजे शिक्षकांचा संप . यावर तोडगा म्हणून उच्च शिक्षणाचे खाजगीकरणच केले पाहिजे. म्हणजे 'तुला न मला, घाल कुत्र्याला' असे होइल आणि प्राध्यापक मंडळी  थंडगार पडतील. असंही  शिक्षणाचा आणि आयुष्यातील यशाचा काही संबंध नसतो अशी माझी धारणा असल्यामुळे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा काही प्रश्नच  नाही .
या गोष्टी राबवणे खूप अवघड आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण 'एक धडाडीचा प्रशासक' अशी प्रतिमा बनवायची असेल तर असे कठोर निर्णय घेतलेच पाहिजेत असे मला वाटते .

व्हेरी गुड! तुम्ही पेपर कुठला वाचता?
 सर मी कुठलाच पेपर वाचत नाही.  पेपरात बातम्या कमी आणि भंकस जास्त असते. पेपर वाचल्याने विचारांची आणि मतांची originality दूषित होते अशी माझी धारणा आहे . त्यामुळे पेपरच काय पण कुठल्याच  छापील गोष्टीवर माझी श्रद्धा नाही .
माझ्यातला अंगभूत आळशीपणा हे त्यामागचे दुसरे कारण आहे.    

पुढचा प्रश्न विचारणार इतक्यात  बाहेर "आग! आग!" "पळा!पळा !" असा गोंधळ सुरु झाला . मुलाखत मंत्रालयात चालू  असल्यामुळे लागलेल्या  आगीबद्दल  शंका असण्याचे काही कारणच नव्हते .  अध्यक्षांनी घाईघाईने मुलाखत संपली असा इशारा करून पळ  काढला . आणि माझी मुलाखत संपली .

मित्रहो!  आता काही दिवसातच माझा निकाल लागेल . मुलाखत वाचून तुम्हाला काय वाटतंय.  होईल की  नाही माझं  सिलेक्शन ?



Thursday 24 January 2013

व्हीलचेअर



अमीबापासून  ते  आजोबापर्यंत कोणीच नपुंसक निघालं  नाही 
कोणीही लग्नाआधी मेलं नाही 
की कोणीच सन्याशी झालं नाही 
चमत्कार म्हण षडयंत्र म्हण 
बाप,तू जन्माला आलास 


तू जन्माला आलास बाप आणि पाचव्या दिवशी सटवाईनं 
तुझ्यासोबत माझ्याही कपाळावर चित्रकथा  कोरली 
त्या क्षणापासून बाप माझ्या आयुष्याची गुंतावळ 
तुझी देणेकरी झाली 


पालं उचलून तू आम्हाला शेतापासून लांब 
शहरात घेउन आलास 
तेव्हापासून बाप अगदी तेव्हापासून 

तुझा संघर्ष 
तुझी शर्यत 
तुझी गरिबी 
तुझी दहशत
मुस्कटदाबी माझ्या श्वासांची 
घुसमट गुदमर करीत राहिले 

दोष, उपदेश, भाकरी, 
तुझ्या जनुकांची गुलामगिरी 
या रिंगणात बाप 
कधी मी इडीपस  कधी तू ययाती 
बनत राहिलो, कण्हत राहिलो 


आता मला  सांग बाप
आता मला सांग  
आयुष्याच्या संध्याकाळी 
खिडकीत बसून विषण्ण नजरेने 
दूरवर बघत असतोस तेव्हा 
तुला नेमकं काय आठवतं 

तीस वर्षाची मास्तरकी ? 
कपाटाच्या किल्ल्या ?
नदीतला डोह ?
गीतामाईचा पदर ?
भांडून गेलेला पूत  ?
सरणावरची लेक ...?

खरं सांग बाप 
कॅन्सरनं पांगुळलेलं शरीर घेऊन 
व्हीलचेअर वर बसल्यावर आज 
तुला नेमकं काय काय आठवतं ?