Thursday 9 June 2011

'रामदेवलीला मैदानाचे उत्खनन'- एक अहवाल ( ई. स . ३०२२)


इ .स . ३०२२  

नुकत्याच  भारतीय  पुरातत्त्व  खात्याने  दिलेल्या  निर्देशानुसार  दिल्ली  येथील   रामदेवलीला मैदानाचे  उत्खनन  हाती  घेण्यात  आले आहे . या  उत्खननात  काही  धक्कादायक  बाबी  समोर  आल्या  आहेत . उत्खननातून   सापडलेले  पुरावे  त्या  काळच्या  समाजव्यवस्थेवर  ( पुराव्या  अंती  तिला  'व्यवस्था'  म्हणण्यापेक्षा  'अव्यवस्था'  म्हणणेच  अधिक  योग्य  होईल )  चांगलाच  प्रकाश  टाकतात .
साधारणतः  इ .स . २००० -२०७०  च्या  आसपास  इथे  लोकशाही  नावाची  गूढ  शासन -प्रणाली  अस्तित्वात   असावी  असा  शास्त्रज्ञांचा  कयास  आहे . सुरुवातीला  तर  काही  पुरातत्त्व्वेत्त्यांच्या  मते  'लोकशाही'  हा  शासनप्रकार नसून  तो  एक  खाद्यप्रकार  होता . कारण  त्या  काळी  बालुशाही , शाही  पनीर ,शाही कुर्मा  इत्यादी   नामसाधर्म्य  असलेले  खाद्यप्रकार  अस्तिवात  होते . तथापि  नवीन  संशोधनांती  हे  मत  खोडून  काढण्यात  आलेले आहे .
लोकशाही  म्हणजे  'लोकांचे,  लोकांसाठी,  लोकांनी  चालवलेले  राज्य'  असे  ते लोक  मानीत . तथापि  त्याचा  नेमका  अर्थ  काय  हे  त्या  लोकांनाही  नीट  कळलेले  नसावे . त्याकाळी  आपल्यातूनच  एखाद्याला  नेता  म्हणून  निवडून  देण्याची  प्रथा  असे .राजकारणात  जाण्यासाठी  कुठल्याच  पात्रतेची  आवश्यकता  नसे . किंबहुना  ज्याला  दुसरे  कुठलेच  उद्योग  येत  नसत  अशाच   व्यक्ती  त्याकाळी  राजकारणात  जात . असे  निवडून  गेलेले  सर्व  लोक  देश  चालवायला  घेत .
निवडणुकात  मते  देण्यासाठी  पैसे  घेण्याची  चाल  त्याकाळी  रूढ  होती .लोक  आधी  निवडून  देत  आणि  मग  आपल्याच  प्रतिनिधींना  शिव्या  घालीत . ते  असे  का  करीत  याचे  कारण  'नेत्यांनी  केलेला  भ्रष्टाचार'  असे  संशोधनांती  आढळून  आलेले  आहे . भ्रष्टाचार  म्हणजे  त्या  काळी  रूढ  असलेली  आणि  प्रतिष्ठीत  लोकांनीच  करावयाची  एक  धाडसाची  बाब  असे . सामान्य  लोक  काबाडकष्ट  करून  पैसे  मिळवीत .'प्रामाणिकपणा'  हा  गुण  त्यांच्या  अंगी  असे .(तथापि  हा  सद्गुण  की  दुर्गुण  याबद्दल  शास्त्रज्ञांमध्ये  मतभेद  आहेत ). काही  तज्ञांच्या  मते  'पैसे  घेऊन  मत  टाकणे'  हाही  भ्रष्टाचाराचाच एक प्रकार आहे. मग  हे   लोक  आपल्या  नेत्यांना  का  शिव्या  घालीत ? त्याचे  कारण  म्हणजे  या   लोकांचा  मेंदू  तेवढा  विकसित  नव्हता . तथापि  त्याकाळीसुद्धा  अत्यंत  विकसित  बुद्धिमत्तेचे  लोक  राजकारणात  असल्याचे  पुरावे  आहेत . ए. राजा , कानिमोळी  , हसन अली , ह्या  लोकांना  गतवर्षीच International  Institute of Intellectual Sciences या  संस्थेने  आईन्स्ताईन, न्यूटन , दा  विन्ची  प्रभृतीच्या बरोबरीचे  स्थान  दिले  आहे . कारण  ही  मंडळी  कुठलेच  कष्ट  न  करताही  अमाप  पैसा  जमवण्याचा  चमत्कार  करू  शकत . त्याकाळी  पैशाचे  दोन  प्रकार  असत - काळा पैसा व पांढरा पैसा . काळा पैसा  ह्या  व्यक्तीना  विशेष  करून  आवडत  असे . अशा पैशांची काही नाणी स्वित्झर्लंडनामक देशातील उत्खननातही सापडली आहेत.
ह्यांची  अचाट  बुद्धिमत्ता  बघून  काही  लोकांचे  पोटशूळ  उठे . ही  मंडळी  मग  दाह  कमी होण्यासाठी  योगा शिकत . या  मंडळीनी  अशाच  एका  योगा  गुरुचे  कान  भरले  आणि  त्याने  भ्रष्ट  नेत्याविरुद्ध  आंदोलन  केले  अशी  आख्यायिका  आहे . तथापि  आंदोलन  म्हणजे  नेमके  काय  ते  अजून  समजू  शकलेले   नाही . त्याकाळी असंतुष्ट  लोक  आंदोलने  करीत . हुशार  असूनही  ज्यांची  कुठेच  डाळ  शिजली  नाही  अशा  मंडळींनी  सरकारच्या  नावाने  बोटे  मोडण्याची  त्या  काळी  प्रथा  होती . ही  मंडळी  त्यासाठी  सिविल  सोसायट्या  स्थापन  करीत . उत्खननात  अशा  लोकांची  नावे  पोत्यानी  सापडली  आहेत . उदा . शेषन*,मेधा, अरुंधती, किरण  बेदी*,हेगडे*  .... ( * -  सरकारी नोकरदारांनी हयातभर खाऊन-पिऊन निवृत्तीनंतर आंदोलने करावीत असा संकेत रूढ होता.)
पण  संबंधित  बाबा  हुशार  वा  असंतुष्ट  नसतानाही  आंदोलनात  का  पडले  हे  कळायला  मार्ग  नाही . काही  तज्ञांच्या  मते  या  बाबांचे  नाव  रामदेव  असून  , रामदेवलीला  मैदानाचे  नाव  त्यांच्याच  लीलांवरून  पडले  आहे . नाहीतर  आधी  या  मैदानाचे  नाव  फक्त  रामलीला  मैदान  असेच  होते .तथापि  यासंबंधीचे  पुरावे  अजून  हाती  लागलेले   नाहीत .
रामदेवबाबा  ही असामी  फारच गूढ   असावी . एकतर  योगा -बिगाचे  क्लासेस  चांगले  चालू  असताना  हा  बाबा  राजकारणाकडे  का  वळला  हे  कळायला  मार्ग  नाही . ( असे क्लासेस बंद करून राजकारणात येण्याची उदाहरणे त्याकाळी अधून-मधून आढळत. पहा- 'मनोहर जोशी आणि शिवसेनेचे वाटोळे' खंड- ५ वा) काही  तज्ञांच्या  मते  त्याकाळची  समाजाची  दुरवस्था  पाहून  बाबाच्या  पोटाला  पीळ  पडला आणि ते राजकारणाकडे वळले. ( असे  पोटाला  पीळ  पडलेले  बाबांचे  बरेच  फोटो  उत्खननात    सापडले  आहेत ),तर  काहीजणांच्या  मते  बाबा  रोजरोज  तेच  ते  कपालभाती ,भस्रिका , भ्रामरी  करून  वैतागले  आणि  "साला  जिंदगीत  काही  थ्रिल  नाही " म्हणून  झटक्याने  राजकारणात  शिरले .
काही  तज्ञांच्या    मते  तर  हे  बाबा  बाबा  नसून  मुळात  ती  एक  बाई  होती . कारण  बाबांचे  सलवार  कमीज नेसलेले  काही  फोटो  मैदानातील  उत्खननात  आढळले  आहेत .
बाबांना  बरेच  शत्रू  असावेत . बाबांच्या  खुनाच्या  बऱ्याच  कटांचे पुरावे  उत्खननात  हाती  आलेले  आहेत . त्यापैकी  ‘मार  देव  बाबा  ”ही  चिट्ठी  मुळात  ‘राम  देव  बाबा ’ अशी इंग्रजी भाषेतून  आहे  असे  एका  तज्ञाने  सांगितल्यानंतर  याबाबतचे  संशोधन जरा   थंडावले  आहे . त्याकाळी  मनमौजी  सिंग ( किंवा   मनमोहन  सिंग)  नावाचा  देशाचा  प्रधान  बाबाचा  द्वेष  करी . पण  बाबांचा  रोष  मात्र  सोनिया  नावाच्या  एका  बाईवर होता . "'ही  सोनिया  कोण'?  हे  इतिहासातले  क्लिओपात्रा नंतरचे   सर्वात  मोठे  गूढ कोडे   आहे"  असे  विधान   नुकतेच  भारतीय  प्राच्यविद्या  विभागाच्या  प्रमुखांनी  बुरुंडी  येथील  अधिवेशनात  केले .
प्राच्याशिरोमनी  तुं. बा. तुळपुळे  ह्यांच्या  मते  ही  बाई  देशाच्या  प्रधान  असलेल्या  मनमौजी  ( किंवा  मनमोहन ) सिंगाची  बायको  असावी . '"बायकोशिवाय  माणूस  दुसऱ्या  कुणासमोर  इतकी  हांजी  हांजी  कशाला  करेल ?"  हा तुळपुळे यांनी   मांडलेला  युक्तिवाद  बिनतोड  आहे . तथापि  त्याकाळचे  बहुतांशी  नेते  बाईला  वचकूनच  असत . याचे  कारण  काय  हे  अजून   उलगडलेले  नाही  . एकंदरीत  ही  बाई  सुद्धा  बाबाइतकीच   गूढ  होती .
बाबांचे  जसे  उघड  तसे  छुपे  शत्रुसुद्धा   बरेच  असावेत . बाबांचा  लपून  छपून तिरस्कार  करणाऱ्यांपैकीच    एक  अण्णा  हजारे  नामक  कुपोषित  व्यक्ती  होती  असा  शोध  नुकताच  प्राच्यविद्या  विद्यापीठातील  एका  विद्यार्ध्याने  लावला  आहे .  सुरुवातीला  हा  शोध  घेऊन  संबंधित  विद्यार्थी  विभागप्रमुखाकडे  गेला  असता    विभागप्रमुखांनी  त्याच्या  श्रीमुखात  भडकावली  आणि  "रामलीलाच्या  लढाईत   बाबा  आणि  अण्णा  खांद्याला  खांदा  लाऊन  लढले" असे  खडसावून  सुनावले . यावर   त्या  बाणेदार विद्यार्थ्याने  स्वतःच्या  समर्थनार्थ  राळेगण  सिद्धी  येथील  अवशेषात  सापडलेली  अन्नाची  ‘ Who Stole My Agenda?’ ह्या  अप्रकाशित  आत्मचरित्राची    प्रत  दाखवल्यावर  विभागप्रमुखांनी  आपल्या  मतांवर  पुनर्विचार  करायला  सुरुवात  केली  आहे .
त्याकाळी  'लोकपालाची  दंतकथा'  फार  लोकप्रिय होती.( हल्लीच्या काळी तिचे काही अवशेष  'लोकपाल आला रे आला' या बड्या वर्गात प्रिय असलेल्या लोककथेत आढळून येतात).  लोक  त्याला  देवदूत  मानीत . तो  प्रकट  झाला  म्हणजे  सगळी  पापे   नष्ट  होतील  अशी  त्याकाळच्या  लोकांची  धारणा  होती .  स्वतःच  निवडून  दिलेल्या  नेत्यांवर  या  लोकांचा  विश्वास  नसे . शिवाय हे  लोक  स्वतः  राजकारणात  जायला  घाबरत. असे  केल्याने   आपण  भ्रष्ट  होतो  असे  ते  मानीत . परंतु  काम  अडल्यावर  मात्र याच  भ्रष्ट  नेत्यांची  जी -हुजुरी  करायची  या  लोकांना  लाज  वाटत  नसे .वरतून  हेच  लोक  निवडणुकीत  नेत्यांकडून  पैसे  घेत . रोजच्या व्यवहारात हे लोक सर्रास चिरी-मिरी देत आणि घेत. आणि  हे  सगळे करून-सवरून  भ्रष्टाचाराच्या  नावाने   बोंबा  मारीत व  लोकपालाचा  धावा  करीत . स्वतःच पायंडा पाडलेल्या प्रणालीबद्दल या लोकांना आदर नव्हता.हे लोक क्रांतीची भाषा बोलत आणि निवडणुकीच्या दिवशी पिकनिकला जात. एकंदरीतच  स्वशासन  करण्यासाठी  हे  लोक  नालायक  होते. पुढे या व्यवस्थेचा अशाच अंगभूत दोषांमुळे ह्रास झाला. पुरातत्त्व खात्याच्या संशोधनामुळे अजूनही बऱ्याच बाबी समोर आल्या आहेत पण त्या सर्वच प्रकाशित करायची आम्हाला लाज वाटते. अशाप्रकारचे संशोधन चालू राहिल्यास चालू पिढीतला आपल्या पूर्वजान्बद्दलचा आदर कमी होऊन त्यांना आपल्या इतिहासाची लाज वाटेल व त्यांना आत्मग्लानी येईल म्हणून हे संशोधन तात्काळ थांबवण्यात आले आहे
                                                 आपले- 
                                                 प्राच्यविद्यामहिम  खं.दा.खंडोबल्लाळ                                                                                                                                                                                                                                     

'घाटी गेट'

मी गेटवर पोहोचलो तेव्हा रात्र झाली होती. इकडे थंडीपण कडक होती. एरव्ही मुंबईला असताना हिवाळा चालू आहे असं कुणी म्हटलं तरच लक्षात यायचं. 'गेट' बरंच बदललेलं दिसलं. 'अतिक्रमण हटाव' मोहिमेखाली महानगरपालिकेने या टपर्या आजवर कित्येकदा उठवल्या होत्या. पण तेवढ्याच जोमानं रात्रीतून त्या उभ्याही राहिल्या.यावेळेस मात्र मनपा जास्त serious असावी. 'रॉयल' वाल्याची टपरी निव्वळ एखाद्या तम्बुसारखी उभी दिसली.ही टपरी 'अझीझची टपरी' म्हणून ओळखल्या जाते. विशेष म्हणजे 'अझीझ' इथला मालक नसून चहा बनवणारा नोकर आहे. त्याचा 'golden चाय ' इथे वर्षानुवर्षे प्रसिद्ध आहे.समोरची टपरी 'मुशिर'ची. विचारलं की पोरं सरळ सांगतात- 'अझीझवर बसलो होतो' किंवा 'मुशिरवर बसलो होतो'.या दोन टपर्यांच्या मधून पाणचक्की रोड जातो.याच रोडवर ladies hostel असल्यामुळे इथे बसलं की चिक्कार पोरी टापता येतात.या दोन टपर्या, मधला रोड,दोन्ही बाजूच्या पानटपर्या , किरकोळ जनरल  स्टोर्स ,एक दोन टेलेफोन बुथ्स... या सगळ्याना  मिळून एक समूहवाचक संज्ञा होती - गेट!
आम्ही सगळे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी. 

'Government Hospital And Authorised Training Institute' असलं धडाकेबाज नाव असतानाही  विद्यार्थी मात्र  त्याचा  shortform 'घाटी' असं  म्हणनच  prefer करायचे .
घाटीत  शिकणाऱ्या  प्रत्येक  विद्यार्थ्याच्या  कॉलेज  लाईफचं  एक  अविभाज्य  अंग  'गेट'  ने  व्यापलेल  होतं. इथे  सगळी  सुख-दुख  शेअर   केल्या  जातात... 
पोरं  जनरली  फर्स्ट  ईअरच्या  शेवटी  शेवटी  'गेट'  च्या  नादी  लागतात. हळूहळू  मग  चहासोबत  सिगारेटही हातात  येते.  अफझलच्या  पानटपरीवर  उधारी  खातं  उघडल्या  जातं .  'गेट'  वरचे   चहा  देणारे  पोरे नावानिशी  ओळखायला  लागतात.  गेटवर  अधिकार  गाजवणारा  बल्क  मात्र  सेकंड/ थर्ड  आणि  थर्ड /फर्स्ट च्या  पोरांचा  असतो. रीडिंगमधून  अभ्यास  करून  थकल्यावर  किंवा  संध्याकाळी  होस्टेलवरून  फ्रेश होऊन बाहेर  पडल्यावर  किंवा  मार्केटमध्ये  जायच्या  आधी  किंवा  एक्झाम  पेपर  संपला की  एप्रन , स्टेथो, pad घेऊन  पोरं गटागटाने  गेटवर  येऊन  बसतात...... गटातल्या  संख्येनुसार  मग   'एक-मे-दो' ,  'दो- मे-चार',  'तीन-मे-छे'   असल्या  ऑर्डर्स   झडतात.  सिगरेटी पेटतात .  चर्चा सुरु होतात....  नेमकाच viva संपलेला असला  की-  मास्तराने  एखाद्याला  कसं  झापलं  ,  अमुक  विद्यार्थी  cryopencil  ला  condom   कसं  म्हणाला,  काहीच  येत  नसतानाही  मी  मास्तरला  कसं  चुत्या  मारला... असले  किस्से  रंगतात.  बाकी  वेळी  मग एकमेकांची  खेचणं  चालू  असतं.
एखाद्याचं  अफेअर  सुरु  होण्यात  असलं की बाकीचे त्याला 'प्रपोज  मार' म्हणून उचकवतात. नंतर ह्यानच प्रपोज  मारून मुलीच्या शिव्या खाल्ल्या की "कसा  गेम केला!" म्हणून एकमेकांना ( त्याच्याच पैशाने चहा पिऊन ) टाळ्या देतात! कुणा दोघांच वाजलेल असलं  की इथे बाकीचे मित्र compromise घडवून आणतात. पेपर अवघड गेल्यामुळे कुणी डिप्रेस  झालेला  असला  की त्याला धीर दिल्या जातो. ही धीर देण्याची 'गेट' ची एक खास पद्धत होती.
कुणी जर एखाद्याला विचारलं, 
'झाला काय अभ्यास?"
आणि दुसरा म्हणाला, 
"नाही रे, अजून काहीच वाचलं  नाही. वाचलं  तेही लक्षात राहत नाहीय. टेन्शन यायला लागलंय बे, मायला!"
तर तिसरा त्याला म्हणणार,
"झेपत नाही तर कशाला येताव बे MBBS ला ? तिकडच कुठेतरी बी. ए. फी. ए. करायचं असतं की!  नाहीतर गावाकडं शेती करायची".
मग तो दुसरा एकदम धडपडून  म्हणणार -
"म्हणजे तसं नाही रे. तसं एक रिविजन  झालय. उगं जर्रासं वाचायचं राहिलंय. पण परिक्षा म्हटल्यावर वाटतंच ना जरा..."
यावर तो पहिला आणि तिसरा -कसा  दुसर्याचा 'गुलूप शाट' केला म्हणून ख्या-ख्या करून हसणार.
घाटीमध्ये जे कॉलेज  स्पेसिफिक jargon चलनात असायचं  त्याच ओरीजीन  'गेट' हेच असत. 'गुलूप शाट' , 'धातू', 'PC', 'किर्र',' क्रोनिक', असे शब्द  आणि   'संसारा  उध्वस्त करी दारू, संसारच नका करू', 'मुलगा मुलगी भेद नसो, दोघांची मुतारी एक असो', 'ताट तांब्या वाटी, सबसे आगे घाटी' या स्लोगन्स- ही 'गेट'ची घाटीला देणगी होती!
या गेटवरच अडचणीतल्या मित्रांना उधाऱ्या दिल्या जायच्या, भांडणं मिटविल्या जायची,  gatheringsचे  प्लान्स आखल्या जायचे, 'जास्तीत जास्त चहा कोण पितो' असल्या शर्यती लावल्या जायच्या. कधी जर बाहेरच्या पोरांसोबत एखाद्याचं  भांडण झालं  तर अख्ख गेट त्या  भांडणात हिरीरीने सामील व्ह्यायचं आणि बाहेरच्याला बद्दी मार द्यायचं .
                                                  इथे  प्रत्येकाला ज्याची त्याची identity बहाल केल्या जायची. म्हणूनच गेट म्हणजे जसं पोरांसाठी एक व्यासपीठ होतं तसच वैद्यकीय विद्यार्ध्यांच्या आयुष्यात नेहमीच छळणाऱ्या तणावासाठी ते एक स्वच्छंद 'आउटलेट'  होतं. एक विरेचन  होतं.... 
गेट नसतं तर घाटीत   होतात   त्यापेक्षा  कितीतरी  पट  आत्महत्या   झाल्या असत्या!
अभ्यासू  पोरे तर फक्त  चहा पिण्यासाठीच  गेटवर  यायचे .पण तथाकथित  वाया  गेलेल्या  'क्रोनिक' पोरांना  इथे आपल्यासारखे  बाकीचे भेटायचे  .त्यांच्या  interaction मधून स्ट्रेसचा निचरा व्हायला  मदत   व्हायची .व्यसनी  पोरांना  इथे  आपले  alter -ego सापडल्यामुळे  त्यांची  व्यसने  प्रतिष्ठीत  व्हायची . 'गेट'  एकंदरीतच  या  मागे  पडलेल्या , हरवलेल्या  पोरांना  त्यांची  अस्मिता  मिळवून  द्यायचं, असण्याला  एक  justification मिळवून  द्यायचं... .आणि  म्हणूनच  'गेट'  बदनामही  होतं!  इथे  studious , sincere पोरांची  सत्ता  चालत  नसे .'New-comers ला  व्यसनांची  ओळख  करून  देणारे' , 'potentially हुशार  पोरांना  'झोड'  बनवणारे' , 'वाया  जाण्यालाही  प्रतिष्ठा  मिळवून  देणारे'  म्हणून  'गेट'ची  बरीच  बदनामी  होती . पण  हे  मान्य  करूनही  हेच 'gate -mechanism ' घाटीचं   लाईफ  healthy ठेवण्यासाठी  ventilator चं  काम  करीत  होतं! ते  एक  फार  मोठं  buffer होतं . एक  असं  shock - absorber की  ज्याच्यामुळे  कितीही  मोठा  धक्का  ही  मुलं  बिनदिक्कत  पचवू  शकत ... 
निकाल  लागला  आणि  एखादा  फेल  झाला  हे  कळलं की  त्याचे -  सोबतच  फेल  झालेले  , आधीच  गेटवर  येऊन  बसलेले - मित्र  तो  आला   की  त्याच्याकडं पाहत  खो -खो  हसायचे .
"च्युत्या ! एका  मार्कावरून  कसं  fail होतोस  बे ? हे  'ठो' बघ , पंधरा  मार्क  कमी  आहेत,  अन  सालं थिअरीत  first-class आलंय सायकाड!
घे , सिगरेट  घे , बस ”
असलाच  एखादा  attempt holder प्रपोज  मारायला  जाऊन  तोंड  पाडून  परत  आला  की  बाकीचे  फिदीफिदी  हसत  आणि  त्यातला  सिनिअरमोस्ट  मोठ्या  नाटकी  थाटात  त्याला  सांगत -
"अटेम्प्टवालों    की  कोई  प्रेमकहाणी  नहीं   होती" 
पुन्हा  फिदीफिदी  हसत  जमावातला कुणीतरी   त्याला  म्हणत 
" ईन काढ  भडव्या  आता . आणि  माझा  शर्ट धुवून  परत  दे "
इथे  दांभिकपणाला  अजिबात  वाव  नव्हता . एखादा  कुणी  फारच  शहाणपणाचा  आव आणीत  प्रचारकी  थाटात  काही  सांगायला  लागला  की   ग्रुपमधला  एकजण  दुसर्यांकडे  पाहून  कुटील  हसून,  तोंडातला  गुटखा  चघळीत  म्हणायचा,
"घ्या  लिहून , नायतर  बाबा  जायचा  निघून ’
या  सगळ्या  प्रकारात  मार्दव  किंवा  नाजुकपण  कुठेच  नव्हतं. जे  काही  होतं  ते राकट  रांगडं सच्चेपण!