Saturday 20 August 2011

'अण्णा हजारेंचा काटा काढण्याचे १०१ मार्ग'



माननीय पंतप्रधान साहेब,
आपण सध्या किती कठीण परिस्थितीतून जात आहात याची मला एक जागरूक नागरिक या नात्याने जाणीव आहे.
तुमच्या पगडीतून आतले टक्कल दिसत नसले तरी त्याच्यावर आलेला लोड मी समजू शकतो.
अण्णा हजारे या माणसाचे काय करावे तुम्हाला काही कळत नसेल नाही. होतं असं कधी कधी. (माझ्या सासऱ्याबद्दलही मला अधून मधून असंच काहीतरी वाटत असतं.)
तुम्ही एवढ्या महान देशाचे पंतप्रधान. मी आपला सामान्य माणूस. माझा वकूब तो केवढा. पण  माझ्या परीने का होईना तुम्हाला मदत करावीच म्हणतो.
 तुमची या अडचणींतून  सुटका व्हावी या निर्मळ हेतूने प्रेरित होऊन मी एक पुस्तक लिहिले आहे- 'अण्णा हजारे यांचा काटा काढण्याचे १०१ मार्ग' !
हवं तर तुम्ही याला 'सेल्फ हेल्प बुक' समजा.
हे पुस्तक मी अनुक्रमे तुम्हाला आणि सोनियाबाईंना समर्पित करीत  आहे.
अहो एक माणूस अख्खी संसदीय लोकशाही वेठीस  धरू पाहतो म्हणजे गम्मत आहे की काय? अशात काहीतरी चमत्कार घडावा आणि हे शुक्लकाष्ठ एकदाचं निघून जावं असं तुम्हाला कित्ती कित्ती वाटत असेल नाही?   
म्हणूनच असले असले जालीम उपाय सुचवले आहेत या पुस्तकात तुम्हाला सांगतो....
उदाहरणादाखल काही उपाय मी तुम्हाला वाचून दाखवतो.
पान नंबर १३ उघडा.
धडा २ रा.   
"जगबुडीची आवई उठवणे"  
अशा नाजूक  वेळेस जनतेचं ध्यान दुसरीकडे वळवायचा हा सर्वात सोपा आणि निरुपद्रवी मार्ग आहे. नाहीतरी २०१२ साली  जगबुडी येणार अशी  हवा आहेच. आपण त्याचाच फायदा घ्यायचा.आणि "जगबुडी आली! जगबुडी आली!" अशी आवई उठवायची! मेडिया सगळा म्यानेज करा. यावेळेस  ती चूक करू नका. हवं तर जॉर्ज बुशला फोन करा. त्याने पण अशीच अफगाण युद्धाच्या वेळेस रुपर्ट मर्डोकसोबत सोयीच्या प्रसारणासाठी एक डील केली होती म्हणे. तुमची अवस्था  बघून तो तुमचं काम स्वस्तात करून देईन.
तसं जनतेचं लक्ष वळविण्याचा दुसरा एक घरगुती उपाय होता माझ्याकडे. तो असा की आपण ऑलिम्पिक  सारखे  काहीतरी अचाट खेळ अगदी वाजत गाजत सुरु करून द्यायचे. जुन्या काळी जनतेला भुलवण्यासाठी ग्रीसमध्ये अशा खेळांचा उपयोग करून घ्यायचे. पण नेमकाच आपला राष्ट्रकुट खेळांचा पचका झालाय. अजून लोक तेच विसरले नाहीत. त्यामुळे तूर्तास हा उपाय वापरणे शक्य नाही. उगाच खाजवून खरुज कशाला काढायची?
हे उपाय फारच पानचट वाटत असेल काही जालीम उपायांसाठी पान नंबर ४७ उघडा .
धडा ५ वा .
"जारण मारण तंत्र" 
अण्णा हजारेंना सरळ अटक करायचं . पण यावेळेस त्यांना तिहार जेलमध्ये नाही ठेवायचं. लांब कुठेतरी नेवून ठेवायचं. ते अंदमानातले  काळ्या पाण्याचे जेल चालू आहे  का हो अजून?
अण्णांच्या मागे जाणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे वगैरे उपाय मला सुचले होते. पण या उपायांत काही originality नाही. इंग्रज लोकांनी ते आधीच करून ठेवलय. नाहीतर निष्पाप जनतेवर गोळीबार करण्याचा तुमचा नंदीग्राम, मावळचा  अनुभव इथे कामाला आला असता. 
तसं 'प्रत्यक्ष' हिंसा न करताही आपलं काम होऊ शकेल बरं का . म्हणजे बघा अण्णा आहेत वयोवृद्ध. आधीच तब्येतीने तोळामासा. त्यात पुन्हा उपोषणाला बसलेत. आठवडा तर होतच आलाय... बसू द्या असंच...!
पण या उपायात एक फार मोठा धोका आहे. अण्णांचं असं काही बरं वाईट  झालं तर सगळीच जनता पेटून उठेल. आपल्याला आताच देशात क्रांती वगैरे परवडणार  नाही. आहे त्या सिस्टीम मधले आपले ' vested interests ' आपल्याला विसरून कसे चालेल? 
शिवाय क्रांती ,संपूर्ण क्रांती हे एकदा पोळलय ना आपल्याला ? तेव्हा आता जरा जपूनच !
आणिबाणी वगैरे लागू करा असंही सुचवणार होतो पण जाऊ द्या.... तुम्हाला नाही झेपायचं ते.
त्यापेक्षा आपला एक सनातन उपाय सांगतो- "यामागे विदेशी शक्तींचा हात आहे" असा सरळ ठोकून द्यायचं! "नेमका कोण?" म्हणून विचारलं की काहीतरी मोघम मोघम सांगून द्यायचं. तेवढं तर तुम्हाला चांगलंच जमतं की!
जारण मारण तंत्रात अजून एक उपाय आहे. तो म्हणजे अण्णांना वेडा ठरविणे. नाहीतरी "समाजसेवा"! "समाजसेवा"! करीत आयुष्यभर लोकांसाठी झिजून स्वतःसाठी दमडीही शिलकीत न ठेवणाऱ्या  माणसाला आपल्याकडे वेडाच म्हणायची पद्धत आहे. आणि  आतातर हा माणूस उभ्या देशाला वेडाच्या नादी लावतोय. अशा वेड्यांवर धमक्या बिमक्यांचाही  काही परिणाम होत नाही. नंगे से खुदा डरे!

पुस्तकात अजुन पुढे काही तात्त्विक उपाय सुचवले आहेत.त्यासाठी पान नंबर १६७ उघडा. 
धडा ११ वा . 
"मनमोहन विषाद योग" 
यातला पहिला मार्ग आहे- 'सन्यास घेणे'.
राजकारणातूनच नाही, तर एक आपला, जनरली, संन्यासाच घेऊन टाकायचा. म्हणजे कसं "राजकारण नको पण अण्णा आवर" असं जे तुमचं होतंय ना त्यातून तुमची कायमची सुटका होईल.
आता तुमचा राजकारणाचा लोभ सुटतच नसेल तर त्यासाठीही काही मार्ग आहेत आपल्याकडे.
काय करा, तुम्ही आत्तापुरता राजीनामा देउन टाका. मग तुमच्या अख्ख्या मंत्रीमंडळासोबत विदेशात जाउन सगळ्यांची  होलसेल प्लास्टिक सर्जरी करून घ्या. आणि एका 'नव्या चेहऱ्यानिशी' परत येउन एक नवीनच राजकीय पक्ष सुरु करून मगच जनतेसमोर या! (तुमच्या नवीन पक्षासाठी  राजकीय सल्लागार म्हणून मी आहेच!)
यातूनही यशाची खात्री वाटत नसेल तर एक काम करा. एखादं नवीन बेट शोधून काढा. तिथे जावून निवडणूक लढवा. गेलाबाजार राहुलबाबाचं पंतप्रधान व्हायचं  स्वप्न तर नक्की पूर्ण होईल!
एक खबरदारी मात्र बाळगा. तुमचे काही कच्चे सल्लागार "अन्नांनाच तिकीट द्या" असं सुचवतील. ही घोडचूक अजिबात करू नका! अशी खतरनाक माणसं सत्तेच्या रिंगणात मुळीच घुसता कामा नयेत.
आता आपण राजकीय उपायांकडे वळलोच आहोत तर पान नंबर ८२ वरचा, ८ व्या धड्यातला एक उपाय जाता जाता सांगून टाकतो.' विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणे'. आज तुम्ही जात्यात आहात ते सुपात आहेत. तुमच्याकडे अशोक चव्हाण आहेत तर त्यांच्याकडे येडीयुरप्पा आहेत. तेव्हा त्यांनी नुसती मजा बघून किंवा आगीत तेल ओतून कसं चालेल? पण सध्या कात्रीत तुम्ही अडकला आहात तेव्हा पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागेल. एकत्र मिळून अण्णांवर काही तोडगा निघतो ते पहावे. 

हे उपाय करा न करा. पण एक गोष्ट मात्र आधी करा. आधी ते मख्ख  चेहऱ्याचे पक्ष प्रवक्ते हटवा आणि स्वतः पब्लिकला सामोरे जा. अहो लोकशाहीत तुम्ही खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुम्हीच  असं लोकांपासून तोंड लपवून कसं चालेल? इकडे तुम्ही ताटी लावून बसलात. तिकडे सोनियाबाई सोवळ्यात असल्यासारखं वागतायत. लोकशाहीत जनतेलाच असं अस्पृश्यासारखं वागवून कसं चालेल? जा की त्यांना सामोरे. आणि त्यात एवढं कानकोंडा वाटून घ्यायची गरजच काय? शेवटी ती तुमचीच जनता आहे. आणि भ्रष्टाचार जगात कुठे होत नाही? या एकदा समोर. संवाद घडला की सगळ्यांची मने निर्मळ होतात.
जन-लोकपाल बिलाचे तुम्ही म्हणता तसे 'grave consequences for parliamentary democracy ' , तुमची 'theory of parliamentary supremacy ' ,' एक शक्तिशाली लोकपाल बनविण्यातल्या मर्यादा आणि संभाव्य  धोके' .....हे सगळं अगदी बरोबर आहे हो. पण सामान्य जनतेला एवढं जास्त कळत नसतं. ते त्यांना समजेल अशा भाषेत आणि योग्य त्या व्यक्तीने सांगणेच ...जाऊ द्या. त्यापेक्षा सरळ तुम्ही पान नंबर २१४ काढा आणि धडा १४ वा 'public perception management ' वाचून काढा.
अण्णांच्या उपोषणाचे दिवस वाढत जातील तशी तुमची गोचीही वाढत जाणार आहे. तेव्हा काही निर्वाणीचे उपायही आताच सांगून ठेवतो. पुस्तकात ते Annexture -२ मधे दिले आहेत.
फारच अटीतटीची  वेळ आली तर अण्णांना एक 'जादू की झप्पी' द्या आणि त्यांचे म्हणणे सरळ मान्य करून टाका! लोकपाल ते म्हणतात तस्साच  काही अगदी बनवायची गरज नाही. पण काहीतरी बनवा तर खरे! अहो लोकांनी तर  तुमचा लोकपाल येणार की अन्नाचा लोकपाल येणार यावर सट्टा लावायला सुरुवात केली आहे म्हणे!
शेवटी आता तुम्हाला खरं सांगू का, मूळ मुद्दा भ्रष्टाचाराचा नाहीच आहे. 'तळे राखील तो पाणी चाखील' हा न्याय भारतीय जनतेला अनादी काळापासून मान्य आहे. आज मुद्दा आहे तो महागाईचा, misgovernance चा  आणि असल्याच छोट्या छोट्या गोष्टींचा. आणि ह्याच छोट्या गोष्टी बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. म्हणूनच ती लोक आज अण्णा हजारेंच्या मागे उभी राहतात.  त्यांच्या मागे उभ्या असलेल्या गर्दीला आणि त्यांच्या आंदोलनाला मेणबत्त्या घेऊन फिरणार्यांचा  urban  middle class phenomenon समजण्याची चूक करू नका. राष्ट्राचं भवितव्य बदलण्याच्या शक्यता या आंदोलनात दडलेल्या आहेत.तेव्हा पंतप्रधान साहेब... सावध असा!
सगळेच उपाय काही मी तुम्हाला फुकट  सांगणार नाही. हे फक्त एक ट्रेलर दाखवतोय. बाकी पुस्तकात मी सगळं लिहिलंच आहे. पुस्तकाचे मानधन म्हणून माझी फार काही मागणी नाही. आपल्या सरकारात जेवढे काही  भ्रष्ट व्यवहार होतील त्याच्या फक्त 0 .१%  रक्कम माझ्या बँक खात्यात जमा होत रहावी इतकेच. घाबरू नका...माझेपण स्विस बँकेत खाते आहे! आधी तिकडे खाते उघडून मगच पुस्तक लिहायला बसलो!
(ता.क. - चुकून माकून परत सत्तेवर आलात तर तुमचा राजकीय सल्लागार म्हणून माझ्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा ही नम्र विनंती.)

                                                                     आपलाच-
                                                                       फकीरा 

 


 




  

  

Wednesday 17 August 2011

गांधीजींचे 'चौथे' माकड


काल  मला  एक  विलक्षण  स्वप्न  पडलं . 
रात्री  माझ्या  स्वप्नात  बापूजी   आले . 
बापूजी  सारखं  काहीतरी  शोधत  होते .
मी  म्हटलं, "बापू  काय  चष्मा  शोधताय  की  काय?  तो  काय  तुमच्या  डोक्यावरच  आहे  की"!! 
बापू  म्हणाले, " नाही  रे  फकिरा!  मी  काहीतरी  दुसरंच  शोधतोय ..." आणि  पुन्हा  इकडेतिकडे  शोधायला  लागले .
मी म्हटलं ,   "बापू , अहो  सांगा  तरी  काय  शोधताय  ते. मी  मदत  करीन  तुमची  सापडून  द्यायला  " 
मग  बापूंनी  नजर  वर  करून  माझ्याकडे  पाहिलं . त्यांच्या  चेहऱ्यावर  आशा  जागी  झाली . बापू  माझ्या  दिशेने  जवळपास धावतच  आले  आणि  म्हणाले,  "खरंच ? खरंच  शोधून  देशीन  मला ?"
स्वप्नात  बापूच्या  चेहऱ्यावर  तेवढा  उजेड  दिसत  होता.  बाकी  सर्वत्र  अंधार  होता . पण  तेवढ्या  उजेडातही  बापूच्या  दातांच्या  फटीतून  'खरंच'  म्हणण्यात  मला  एक  वेडाची  झलक  दिसली .
मी  जरा  आश्वासक  सूर  धारण  केला  आणि  विचारलं ,
"काय  हरवलय  बापू?" 
पुन्हा  अस्वस्थपणे  इकडेतिकडे  पाहत  बापू  मला  म्हणाले, 
"अरे,  माझं  चौथं  माकड  हरवलय  रे ..."
मी  चक्रावून  गेलो 
"अहो  बापू  असं  काय  करताय?  तुमची  तीनच  माकडं  नव्हती  का ? एक  डोळे  बंद केलेलं , एक  कान  बंद  केलेलं , आणि  एक  तोंड  बंद  केलेलं ?
"नाही  रे.  मला पक्कं आठवतंय . माझं  एक  चौथं  माकड  पण  होतं ...कुठे  हरवलय  कोण  जाणे?" 
आणि  असं  म्हणून  बापू  पुन्हा  इकडे -तिकडे  अस्वस्थपणे  भिरभिरत  शोधायला   लागले .
मला  शंका  आली  बापूंना   काही  वेड -बीड   तर  लागलं  नाही  ना ? 
मी  ठरवलं  की  आपण  बापूंची  मदत  करायची . मी  बापूंचा  हात  धरला  आणि  म्हटलं  ,
"बापू , चला  आपण  त्या  चौकात  जाऊ ,तिथे  काही   लोक  जमलीत . आपण  जाऊन त्यांना  विचारू .त्यातल्या   कोणीतरी नक्कीच  चौथे  माकड  पहिले  असेल ".
बापूंना लहान मुलासारखा आनंद झाला.
आम्ही दोघे चौकात गेलो.
तिथे धूसर उजेड होता आणि भयाण शांतता होती.
माणसांच्या काही आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या. पण आवाज कशाचाच होत नव्हता.
मी अजून जवळ गेलो...आणि माझं रक्तच थिजून गेलं.
यातल्या कुठल्याच माणसाला चेहरा नव्हता...
बापूंना हाताशी धरून मी धिटाईने एकाला विचारले,
"का हो! तुम्ही चौथं माकड पाहिलंत का?"
माझा प्रश्न ऐकून तो बिन-चेहऱ्याचा माणूस काहीच बोलला नाही. फक्त त्याने बोट दुसऱ्या एका माणसाकडे दाखवले. ही सगळी माणसे सारखीच दिसत होती!
त्याच्याजवळ जाऊन  मी त्यालाही  तोच प्रश्न केला.
"का हो! चौथं माकड पाहिलंत का?"
प्रश्न ऐकून हा माणूस एकदम रडायला लागला. मी आणि बापू  गोंधळून गेलो. त्याने रडतरडतच तिसऱ्या एकाकडे बोट दाखवले.
त्याच्याकडे जाऊन मी पुन्हा प्रश्न केला.
प्रश्न ऐकला आणि हा माणूस मोठ मोठ्याने हसायला लागला.
मी आणि बापू त्याच्या हसण्याने दचकून गेलो. लगबगीने आम्ही तिथून निघून दूर, एका घोळक्याकडे गेलो.
तशीच बिना चेहऱ्याची माणसे.
मी पुन्हा तोच प्रश्न केला,
"का हो! तुमच्यापैकी कुणी चौथं माकड पाहिलंय का?"
एकजण बोलला आणि कुत्सितपणे म्हणाला,  
"चौथे माकड होय?  हुं.....ते गेलं पळून. बाकी तिघांची दुर्दशा बघून त्याने पळ काढला. काही बोलायचं नाही, ऐकायचं नाही, बघायचं नाही.....गेला पळून !ह्याच दिशेने गेला बघा."
त्याच्यानंतर  दुसरा बोलला .दोन्ही हात जोडून म्हणाला,
"नमस्कार बापू! तुमचे चौथे माकड आम्हाला चांगले ठाउक आहे. ते आता आमचे नेते आहेत. हो,थोडं पोट सुटलंय त्यांचं आता, पण बापू,त्यांच्यासारखा थोर जगात कुणीच नाही. आता चौकात  तुम्ही त्यांची लाईफ साईझ पोस्टर्स पहिलीच असतील.गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं  काहीही काम असू द्या, ते नक्की करतील याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. अहो, अख्खी सत्ता शेपटात गुंडाळून फिरतात ते!....पण बापू,यंदाच्या निवडणुकीत तुमचं मत मात्र त्यांनाच पडायला हवं बरं का?  ख्या ख्या ख्या  !"
त्याच्यानंतर  तिसरा बोलला.हा सारखा सिग्रेट पीत होता.
“चौथे माकड  ना? . Oh i see! I know him. तो  गेला . I mean he has left this country for good. You know this country is going to dogs... मी  पण  देश  सोडतोय  लवकरच ” असं म्हणून त्याने जळालेलं थोटूक दूर भिरकावून दिलं.
मी  बापूंच्या   चेहऱ्याकडे  बघायचं  टाळत  चौथ्याकडे वळलो. 
तो  मला   दुर्लक्षित  करून  थेट  बापूंकडेच   बघत  म्हणाला ,
“केम  छे  बापू ? ते  चौथे  माकड  ने ? ते  धंद्यामंदी लय  मोठा  झ्याला . बेज्या मोठ्ठा! आता  ते  मोठ  मोठे   MNCs चलावते . तुमचा  ते  tribal  लोकांचे  जमीन  घेते  अन  मोठेमोठे  प्लांट  उभे करते ...तुमचा  सरकारला  इलेक्शनमंदी  finance करते ...अन  मोठ्या मोठ्या   २७   मंजीली   घरात   राहते  . तेच्या  एकदम  च्यांगला  झाला बापू .हे  हे  हे !”
त्या  चौथ्याला  बाजूला  सारीत  पाचवा माणूस  धाडदिशी  समोर  आला  आणि  म्हणाला ,
“ ए  बापू , तेरा  चौथा  माकड  अभी  भाई  बन  गयेला  है . बोले  तो  एकदम  बडा  डॉन ! अभी  वो  दुबई  से धंदा करता  है . इधर  का  पूरा सट्टा  मार्केट , स्मगलिंग, match fixing  पूरा  देखता  है ...सुप्पारी भी लेता है .तेरा  कुछ  सेट्टिंग  होयेगा  तो  बोल ..”
अजून  कोणी  बोलायच्या  आत  बापूंनीच  माझ्या  हाताला एक  हिसका  दिला  आणि  म्हणाले, 
"आधी  इथून  निघ" .
आम्ही  जात  होतो  तोच   अजून  एक  तसाच  बिन  चेहऱ्याचा  माणूस  आम्हाला  सामोरा  आला .
त्याच्या  आवाजात  नम्रता  होती . तो  म्हणाला ,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  पण  तुमची  गांधी  टोपी  घालतंय . देशात  भ्रष्टाचाराविरुद्ध  जनमत  जागवतंय   . तुमच्यासारखीच  आंदोलने  करतंय  ...आणि  तुमच्यासारखच  अटक पण  होतंय ."
पहिल्यांदा  बापूंच्या  चेहऱ्यावर  मी  तिरस्काराशिवाय  एखादी  भावना  पहिली .
आनंद , व्याकुळता , अभिमान , हताशपणा..... बापूंच्या  डोळ्यात  पाणी  तरळलं .
एक एक शब्द मोजीत बापू  म्हणाले,
“ नथूरामांना  आता  अजून  एकदा  पिस्तुलं  तयार  ठेवा  म्हणावं ”
आणि एवढं  बोलून  उद्वेगाने   बापू  पुढे  चालू  लागले .
चौकापासून  खूप  दूर  एका   भेसूर  दिसणाऱ्या  झाडाच्या  पारावर  कुणीतरी  एकटच  मान  खाली  घालून बसलं  होतं . तिथून  अस्पष्टसे    हुंदके  ऐकू  येत  असल्यासारखं  मला  वाटलं .
अभावितपणे  मी  बापूंचा  हात  ओढीत  तिकडे  चालायला  लागलो .
ती  एक  वृद्ध  स्त्री  होती ! जुनकट  आणि  बिनचेहऱ्याची.   
बापुपासून  नजर  चोरत  तिने  पदर  तोंडाला  लावला .
डोळे  पुसायच्या  निमित्ताने  ती  बापूंना  चेहरा  दाखवायचं  टाळत  होती .
पदराआड तोंड लपवून तिच्या  थकल्या  वृद्ध  आवाजात ती  बोलायला लागली,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  मला  माहित  आहे . खूप  वर्षे  ते  इथे  होतं . उणीपुरी  साठ  वर्षे  आम्ही  संसार  केला . ही  जी  सगळी  बिना  चेहऱ्याची  प्रजा  तुम्ही  बघताय  ती  आमच्या  दोघांचीच  संतती  आहे . पण  चौथं माकड  कुठे  गेलं  मला  काहीच   ठाउक  नाही  बापू ....." एक  हुंदका  देऊन  पुन्हा  निर्धाराने  ती  बोलली, 
 "असो  ते  कधीतरी  जाणारच  होतं ”
सुन्न  शांतता   पुन्हा  पसरली.
मी  विचारलं ,
"बाई  तुझं   नाव  काय ?"
बापुंपासून  अजूनच  तोंड  झाकत, अत्यंत  खजील  आवाजात  ती वृद्ध स्त्री म्हणाली, 
"माझं  नाव  लोकशाही !"

बापू , मी ,  तो   चौक ... सगळेच  स्तब्ध  झाले .... स्मशान  शांतता पसरली .
सगळी  बिनचेहऱ्याची  माणसे  आमच्या  भवती  गोल  रिंगण  करून  गोळा  झाली .
बापू  पुतळ्यासारखे  खिळून  निश्चल  उभे  राहिले  होते .
आणि  आता  अंधार   चहुबाजूंनी  आमच्या  जवळ  जवळ  सरकत येत चालला होता .




Tuesday 2 August 2011

काल एक चमत्कार झाला!

काल एक चमत्कार झाला! 
तीन महिन्याची बाळं सहसा बोलत नाहीत...सहसा म्हणजे काय बोलतच नाहीत, पण माझी तीन महिन्याची मुलगी मला बोलली!
अहो नाही, तुम्ही म्हणता तसं डोळ्यातल्या हावभावांनी वगैरे नाही हो! चक्क  मोठी माणसं बोलतात तस्स बोलली!!!
म्हणजे त्याचं असं झालं बघा, मी आपला रात्री उशीरापर्यंत कुठलसं पुस्तक वाचत बसलो होतो.... साधारणतः रात्री दोनचा सुमार असेल.... बाळ अशी  माझ्या बाजूला झोपली  होती.... आणि मला अचानक खुदकन हसण्याचा मोहक आवाज ऐकू आला!  आता झोपेत लडिवाळ हसण्याचे बायकोचे दिवस राहिले नाहीत हे मला ठावूक आहे. मग हसतंय कोण म्हणून पाहिलं तर माझी मुलगी माझ्याकडे बघून खुदुखुदू हसत होती.
तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहून मला वाटलं की हिला आताच बोलता आलं तर किती छान होईल!
कधी कधी जीभेवर सरस्वती का काय विराजमान होते म्हणतात ना,तसं झालं बघा! मी परत पुस्तकात डोकं खुपसतोय इतक्यात पुन्हा मला हसण्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ चक्क बाळाचे बोल ऐकू आले-
" काय वाचतोयस रे बाबा इतकं? माझ्याशी पण बोल की जरा" !
क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. पण खरंच ती मला बोलत होती. अगदी अस्खलित शब्दात ती माझ्याकडे बघून बोलायला लागली.
"असं दचकतोयस  काय रे बाबा?  मी बोलू शकते याच्यावर विश्वास नाही ना बसत? पण मी खरंच बोलतेय. तू स्वप्नात वगैरे नाहीस. ते स्वतःला चिमटा वगैरे घेऊन बघतोयस ते बंद कर.
....आता तुला मी सांगते की मला असं बोलणं का भाग पडतंय. बाबा,आवश्यक होतं रे. त्याचं कायै, मी थोडी confused आहे सध्या.... हसायला काय झालं? छोटी बाळं confuse होऊ शकत नाहीत का?... तुला सांगते बाबा,अरे, उलट आम्हा newcomers चे  tensions तुम्हा आई-बाबांपेक्षा जास्त आहेत.
त्यात मी मुलगी. म्हणजे मला तर जन्मायच्या आधीपासूनच tension! बरं जन्मल्यानंतर सुखी म्हणावं तर ते तरी सोपं दिसतंय का?. अरे काय काय चालू असतं हल्ली आपल्या देशात! ...श्ह्या! मला तर बाई पश्च्चात्तापच  होतोय इथे जन्माला आल्याचा!
....बरं हे जन्माला येणं तरी सुखाचं होतं म्हणतोस की काय? तू काय सांगत होतास ना एका मित्राला की तू कुठल्याशा परीक्षेला चार वेळा बसलास, अरे मी तुला सांगते, मागच्या सहा महिन्यात मी पाच वेळा जन्म घेतलाय! प्रत्येक वेळी मी मुलगी आहे म्हणून मला जन्म नाकारला गेला. तू जरा भला माणूस आहेस, त्यातून थोडा शिकला सवरलेला आहेस, शिवाय मी तुझं पहिलं बाळ नं....आले जन्माला!
.....खोचक बिचक नाही रे, हे असंच आहे बघ. पाहिलं बाळ असलं ना की आनंदाने "मुलगी काय मुलगा काय आम्हाला सारखेच" असं म्हणून मुलीला जन्माला घालतात. पण दुसरीसुद्धा मुलगीच होणार असेल तर मात्र बरोबर क्लिनिक मधे जाऊन 'आधी सोनोग्राफी मग एम्.टी.पी.' असा रीतसर कार्यक्रम उरकून घेतात.
तू असशील रे डॉक्टर-बिक्टर पण मला या गोष्टींचा  'याचि देहि याचि डोळा' अनुभव आहे म्हणून सांगते. नेमकं तिसऱ्या महिन्यात मला ultra -sound waves चा कर्ण कर्कश्श आवाज ऐकू यायचा.आणि माझं काळीज धड धड करायचं. आणि मग काही दिवसात TERMINATE !
यावेळेस तर मी आशाच सोडून दिली होती. But you see I am here ,ALL ALIVE !
बरं ते सोड, मुद्द्याचं बोलू... तर मी तुला काय सांगत होते...हं, की मी थोडी confused आहे!
....नाही रे, तसलं existential confusion वगैरे नाही, साधा आपला logical dilemma आहे...म्हणजे बघ आता मी जन्माला आले म्हणून तू एवढा कौतुक सोहळा वगैरे केलास, 'जन्मले एकदाची' म्हणून मला पण बराच आनंद वगैरे झाला...पण बाबा मला आता वाटायला लागलंय की खरंच Is this world a safe place to be in ?
.....कालचाच न्यूजपेपर बघ की-   आंतरराष्ट्रीय बातम्याचं पान बघ- सिरियातील गोळीबारात ४५ आंदोलक ठार, इराक मधील आत्मघातकी स्फोटात १२ जण ठार, जगाच्या दारावर पुन्हा मंदीची थाप...शिवाय अफगाणिस्तान, कोरिया, ग्लोबल वार्मिंग,दहशतवाद हे रोजचं स्टफ.... आता राष्ट्रीय बातम्याचं पान काढ  - बिहारमध्ये माओ वाद्यांनी दोघांची हत्या केली, त्रिपुरामध्ये ग्रामस्थांचा B.S.F. कडून छळ....आणि बाकी कलमाडीचं स्मृतीभ्रंश , अण्णा हझारेंचा लढा, येदियुराप्पाचा शिरजोरपणा, ए राजाची तिरंदाजी हे रोजचं...आता तुझा पुरोगामी महाराष्ट्र बघ- बुलढाण्यात  एका C.E.O. ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.....पुढे अजून काही सांगण्याची गरज आहे का?
हा झाला एका दिवसाचा पेपर....काय? एवढं पेज नंबरसहित कसं लक्षात राहिलं म्हणतोस? अरे मेमरी strong आहे माझी....आईवर गेलेय नं! 
चल एकवेळ आपण जगाचं  सोडून देऊ, पण individual life तरी कुठे सोपं राहिलंय? अरे competition किती भय्यंकर आहे हल्ली आणि survival साठी struggle करता करताच आयुष्य हातचं निघून चाललंय की.... म्हणायला मी एक अख्ख आयुष्य घेऊन आलीय पण ह्या सगळ्यात धावता धावता नेमकं तेच आयुष्य जगण्याची उसंत तरी मला भेटणार आहे की नाही.....बाय द वे यावर्षी इंजिनीरिंगचि admissions कितीला क्लोज झालीय रे ?
आणि नुसता intelligent वगैरे असून तरी  कुठे भागतय? वरतून पुन्हा पैसे लागतातच.
ए बाबा, आपण गरीब आहोत की श्रीमंत? खजील नकोस रे होऊ. कायै की top वर असल्याशिवाय कुणी विचारतच नाही... घुमवून फिरवून गोष्ट तिथेच येते. आता तो सिनेमा नाही का... 'तारे जमीन पर'... शेवटी त्यात पण काय दाखवलय, तो मुलगा top पेंटिंग बिंटिंग  काढतो तेव्हाच त्याला recognition मिळतं की नाही? आणि तेच त्याला काहीच येत नसतं  आणि नुसतीच त्याला learning disability असती तर? झाला असता तो हिरो? निघाला असता त्याच्यावर चित्रपट?..बाबा, मी पण समजा कुठल्याच क्षेत्रात extra -ordinary निघाले नाही तर...avarage लोकांना खरच काही स्थान नाही का रे बाबा या जगात ? त्यात पुन्हा तू तर खेड्यापाड्यात settle व्हायचं म्हणतोयस म्हणजे आमचं तर करियरच बोम्बललं!
.....अच्छा! ते चित्रपटाचं मला कसं माहीत म्हणतोस? अरे तेव्हा मी पोटात होते ना! का बरं ? अभिमन्यू पोटात राहून चक्रव्युव्ह भेदायचं लक्षात ठेवू शकतो मग  मला काय साधी पिक्चरची  स्टोरी पण लक्षात राहू नये काय?.... आणि थांब मधेच लिंक तोडत जाऊ नकोस अशी... 
.....ही धावपळ पण कशी चाललीय बघ ना, आधी शिक्षण, उच्च शिक्षण, मग नोकरी, लग्न, घर, गाडी,EMI ,savings,... सगळेच कसे आपण जणू eternity पर्यंत जिवंत राहणार आहोत अशा धुंदीत जगल्यासारखे जगत आहेत , जे जगून घ्यायचे त्या एक-एका क्षणाची value कोणी ठेवीतच नाही.जणूकाही.....बाबा?...ऐकतोयस ना? का झोपलास?
थोडी philosophical वगैरे sound करतेय ना मी? सहा महिन्यात पाच वेळा जन्म घेणारा कुणीही philosopher बनेल.
Good for me ! बाबागिरीत काय सोल्लिड करीअर बनेल नं? 
ए बाबा, नाहीतर आयडीया! तूच का रे नाही बाबा-बिबा होत? नाहीतरी तू काहीतरी career-crisis वगैरे बोलत होतास नं मघाशी फोनवर...
काय धम्माल होईल नाही! पैसा,फेम,पावर सगळच मिळतं. अरे चक्क नट्या लग्नाची ऑफर टाकतात बोल! काय म्हणतोस? घाबरू नकोस आई झोपलीय!
.....अरे हो! आई उठायच्या आत मला तुझ्याशी सगळं बोलून घ्यायला हवं. मला बोलताना बघितलं तर shock मधेच जाईल बिचारी!  बाकी काही नाही रे बोललं की मन मोकळं होतं म्हणे. तसा तू काही टिपिकल 'male chauvinist pig' नाहीस खात्री आहे मला, पण कुणास ठाऊक उद्या तू बदलशील... जरा मी कॉलेजात जायला लागले की 'असले  कपडे घालू नको, तसली फ्याशन करू नको' टाईप फंडे झाडशील.... मुलगी आहे नं मी.....सेंटी नाही मारत रे, सेंटी मारायला मी काही आई नाही!
....मी बघ आपले doubts बोलून दाखवले. तसं उत्तरांची अपेक्षा मला नाहीच. पण आज मी prejudiced नाही . कोरी पाटी आहे तोवर बोलून दाखवते... उद्या मी तू घडवशील तशी घडेल तुझ्या 'हो' ला 'हो' आणि 'नाही' ला 'नाही' म्हणायला लागेल....I may not be so lucid tomorrow ...शिवाय  'life adds to confusion' (म्हणतात). आणि माझी तर सुरुवातच कन्फ्युजनपासून आहे! माझी एकटीचीच नाही, आम्हा सगळ्याच नव्याने जन्मलेल्या बाळांची ! काय गम्मत आहे नं!
अरे एवढा काय गंभीर झालास? मी काही concrete उत्तरं मागत नाहीये तुझ्याकडे. मला माहित आहे ती कुणाकडेच नाहीत. असती तर तू स्वतः आज एवढा confused नसतास. so chillaxx ! नाहीतरी लोक म्हणतातच 'पोरगी बापावर गेलीय' म्हणून!
बाप रे! आई उठतेय वाटतं. चल आता मी झोपते. बाकी गप्पा मी मोठी झाल्यावर करू ...अरे एक राहिलंच की, बाबा माझं नाव कधी ठेवणार आहेस तू?  ठेव काहीतरी छानसं.....