Monday, 10 October 2011

पोतराज





मुंबईतल्या  अनेक  गजबजलेल्या  जागांपैकी  ही  एक  जागा . हवेत  समुद्राचा  दमट  वास , ओसंडून  वाहणारी  गर्दी , दाटीवाटीने  उभी  असलेली  दुकाने ,उंचच उंच इमारती, कॉर्नरवरच्या   चहाच्या  टपर्या , बेवारस  फिरणारी  कुत्री , आणि  असंख्य  आवाज  एकमेकात  मिसळून  तयार  झालेला  परिचित  कोलाहल .
बायको  क्लिनिकमध्ये  पेशंट  तपासत  होती . माझी  कामं  उरकून  मी तिला  न्यायला  आलो होतो . तिचं  होतंय  तोवर  बाळाला घेउन  मी  क्लिनिकबाहेरच्या   स्ट्रीटवर   फेऱ्या  मारायला  लागलो . समोरच्या  ग्यारेजवाल्याच्या  दुकानातील  धांदल  टुकूटुकू   बघत  बाळ   चांगलीच  रमली  होती . एवढ्यात  कसल्याशा   अनोळखी  आवाजाने  तिची  तंद्री  भंग  पावली . टुणकन मान  वर  करून  ती  त्या  आवाजाचा  वेध  घेऊ  लागली . इथल्या  गर्दीत  असला  आवाज  अपेक्षितच  नसल्यामुळे  मी  ही  तिला  घेऊन  त्या  आवाजाच्या  दिशेनं  गेलो . मार्केटच्या  मुख्य  रस्त्यावरून  तो  आवाज  येत 
होता . या  आधी  गावाकडेच  ऐकलेला ... गुबू ..गुबू ..गुबू ...
मी आवाजाच्या  दिशेनं  नजर  वळवली  आणि  बघितलं ....पोतराज !!!
कमरेच्या  वर  उघडेबंब अंग ,पिळदार  शरीर , पाठीवरून  मोकळे  सोडलेले लांबसडक  केस  ,कपाळभरून  कुंकवाचा  मळवट , त्याखालचे  उग्र  डोळे , धारदार  नाक ,  कमरेभोवती  वेगवेगळ्या  रंगांच्या  कापडी  झीरमाळ्याचे  वस्त्र , पायात  घुंगरू , ओल्या  कुंकवाच्या रेषा ... आणि हातात  धरलेला लांबलचक असूड! 
त्याच्यासोबत त्याची बायको होती.  फाटकं   लुगडं नेसलेली , खांद्यावर   दोरीनं  अडकवलेला  चामड्याचा  ढोल,  मानेवरून पोटावर बांधलेल्या कळकट कापडात सुकट चेहऱ्याचं   तान्हं बाळ , आणि डोईवर मरीआई!  तिचा चेहरा सावळा पण कोरीव होता.  एका हातातली टिपरी चामड्यावर घासत ती वाजवीत होती -
                                                                गुबू ..गुबू ..गुबू ...

पोतराज मोकळ्या जागेत उभा राहायचा  आणि नाचत नाचत चाबूक हवेत उंच फिरवायचा. चाबकाचा फटकारा त्याच्या पाठीवर बसताक्षणी  काडकन आवाज व्हायचा. मग त्याची बायको दुकाना- दुकाना समोर उभी राहून मरिआईच्या नावानं दान मागायची. काहीजण द्यायचे , काहीजण फटकारून लावायचे ,काहीजण बघून न बघितल्यासारखं करायचे. काहीजणांच्या नजरा तिच्या फाटक्या वस्त्रामधून  जे बघायचे ते बघून घेत होत्या. माझं लक्ष तिच्या झोळीतल्या बाळाकडे गेलं. धुळीनं माखून  कळकट झालेलं ते बाळ कधी रडत होतं, कधी त्या झोळीच्या कापडाशी खेळत होतं. तिचं त्या बाळाकडे लक्ष नव्हतं.
पोतराज पुन्हा नवीन जागी उभा राहिला  आणि नाचत नाचत  त्याने कडाडकन चाबकाचा आवाज काढला . त्या  आवाजासरशी माझ्या अंगावर शहारे आले  आणि मला माझ्या लहानपणीचा पोतराज आठवला!
                                                   "आली आलिया मरीआई
                                                     तिचा कळंना आनभाव 
                                                   भल्या भल्याचा घेती जीव    
                                                    आली आलिया मरीआई " 

भरदार आणि उग्र दिसणारा हा पोतराज गावात आला म्हणजे बायाबापड्यांची लेकराबाळांची  एकच धांदल उडायची. ढुंगणावर फाटलेल्या चड्ड्या सावरीत आणि शेंबडी नाकं पुशीत आम्ही लेकरं मोठ्या उत्साहानं "पोतराज आला!" "पोतराज आला!" म्हणीत उड्या मारीत  पोतराज बघायला पळत सुटायचो.पायातल्या  घुंगराचा  नाद  करीत  ठेका  घेऊन  पोतराज नाचायला  लागला  की  आम्हा  लेकरांना  आभाळाएवढा  आनंद  होई . चाबूक हवेत फिरवून त्यानं पाठीवर 'कडाड' आवाज काढला की छातीत  धड धड करी आणि तरी आम्ही दोन्ही डोळे विस्फारून पोतराजाकडे  बघत रहायचो.
हा  पोतराज  शहरी पोतराजासारखा चिरमटलेला  नसायचा . हा मिजाशीने  गावात मिरवायचा . हक्काने घरा घरात जायचा . वाड्याच्या दारासमोर उभा राहून कडक आवाजात साद घालायचा- 
                                                           'दार उघड बये दार उघड!"
त्या हाकेसरशी घरातल्या सवाशीण बायका, म्हातारी आजी- जी  कुणी असेल ती -घाई गडबडीने हळदी कुंकुवाचा करंडा घेऊन,  सुपात धान्य घेऊन, डोक्यावर पदर घेऊन मरीआईच्या दर्शनाला यायच्या. पोतराज मरीआईचा सांगावा घेऊन  यायचा. कोणी काही नवस बोलला असेल तर बायका, म्हाताऱ्या पोतराजाची वाट बघायच्या. मग तो आला की मरीआईला  साडी चोळी करून नवस फेडायच्या. आई पोतराजाच्या अंगात यायची आणि प्रसन्न होऊन वरदान द्यायची-
                                   " इडा पीडा टळो. वंश वाढीला लागो. धन धान्याला बरकत येवो"   .
मरीआई म्हणजे 'कडकलक्ष्मी'.  तिचा  'सराप' वाईट असतो. तिचा कोप झाला तर घरात पडझड सुरु होते, माणसं, लेकरं, गुरं ढोरं दगावतात. म्हणून तिला खूष ठेवण्यासाठी माय मावल्या धडपड करायच्या. दान मिळालं की पोतराज खुश होई. मग नाचत नाचत गोल रिंगण घेई आणि आम्हा लेकरांकडे  बघून पुन्हा एकदा  चाबूक फिरवून पाठीवर  आवाज काढी- कडाड!
तेव्हा आमच्या वाड्यात पोतराज यायचा, वासुदेव यायचा, गोंधळी यायचे...हे लोक पावसासारखे हवे हवेसे  आणि विठ्ठलाइतके  खरेखुरे वाटायचे !
इथे- मुंबईत- मात्र हा पोतराज फारच विजोड वाटत होता. आजूबाजूच्या चकचकीत इमारतीत, इमारतींप्रमाणेच  वसकन अंगावर येणाऱ्या लोकांच्या नजरांमध्ये, इथल्या करकरीत अलिप्तपणात हा कसातरीच बेंगरूळ वाटत होता. रानात सुंदरपणे बागडणारं फुलपाखरू एखादे दिवशी बेडरूमच्या ट्यूबलाईट भोवती चिलटासारखं घिरट्या घालायला लागलं म्हणजे कसं ओंगळवानं वाटत तसं!
हा पोतराज त्याचं गाव सोडून इथे का आला असावा ?
कदाचित शहरामध्ये खूप पैसा असतो असं त्याला कुणीतरी सांगितलं असेल.  कदाचित इथे तुला चांगला लौकिक मिळेल असं कुणीतरी म्हटलं असेल .  कदाचित ही बाई दुसऱ्या जातीची असेल आणि तिच्याशी लग्न केलं म्हणून याला गावातल्या लोकांनी हाकलला असेल....तोंड लपवायला मुंबई सारखं शहर नाही. तुटून पडलेल्या सगळ्या लोकांसाठी आणि गावातून भिरकावून दिलेल्या सगळ्यांसाठी उकीरड्यासारखं, हे  शहर म्हणजे एक वरदान आहे.
माझं लक्ष पोतराजाच्या चाबूक धरलेल्या हाताकडे गेलं. त्याचा  अंगठा तुटलेला होता. गावातून रानावनातून निखळलेला हा एकलव्य शहरात आला होता. आणि तो एकटाच नाही, अख्खी एक संस्कृतीच विस्थापित होत होती.
त्याच्या बायकोने ताल धरला होता. हातातल्या दुसऱ्या टिपरीने ती आता वेगळाच ठेका वाजवीत होती-

                           डंग डंग डडांग-  डांगचिक  डडांग,   डंग डंग डडांग- डांगचिक  डडांग 

मघाचं केविलवानं  गुबू गुबू आता बंद झालं होतं आणि हे टिपेचं, घाबरवून सोडणारं  संगीत सुरु झालं होतं.
आता ती दान मागत नव्हती. निर्विकार चेहऱ्याने  सरळ समोरच्या डांबरी रस्त्याकडे बघून ती भेदक सूर वाजवीत होती-
                           डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
जणूकाही सगळा बाजार त्या क्षणात गोठून बसलाय आणि त्याच्या पलीकडे जाउन ती  एकटीच तिथे वाजवीत होती. तिच्या वाजवण्यात लोककथेतील पात्रांचा मनस्वीपणा होता. आपलं बाळ गळ्यात लटकवून जणू ती ह्या इमारतींना, ह्या शहरांना, ह्या संस्कृतीला प्रश्न विचारत होती.

                    " गावं खेडी भाकड झाली . जुने सांधे निखळले.  पोतराज फुटून शहराकडे वळले."
                          
                        डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग
                     
                                  " माये नाळ वाळून गेली,  पान्हे सारे आटून गेले
                                      मुळं  पाळं  खुडून गेले, भगत सारे बुडून मेले" 
                                           
                            डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 
                 
                                   "रेट्यामध्ये जिरत चाललो, आम्ही आता मरत  चाललो 
                                    देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो" 
                                           
                             डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या या प्रश्नात अगतिकता नव्हती, याचना नव्हती की उपकाराची आस नव्हती. ती फक्त साऱ्या शहरानं दवंडी देत फिरत होती - 'आम्ही आता बुडत चाललो'.
तिच्या डोळ्यात रानावनातल्या अघोरी देवतांचं तेज उतरलं होतं.
गोठून बसलेल्या त्या क्षणाच्या बुडबुड्यातून काही इमारती सरसरून वर आल्या.  आणि जादू   ह्वावी तशा चमचम चमकत गगनाला भिडल्या. अजस्र  अफाट  महाकाय. .अमरवेलीसारख्या.   क्षितिजापर्यंत  लांबल्या. आसमंत व्यापून गेल्या.
आणि तेवढ्या त्या चिंचोळ्या डांबरी रस्त्यावर बाई वाजवीत राहिली . तिचा ठेका या सगळ्या जंजाळातून  दुमदुमायला लागला.

                               डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

आणि बघता बघता त्या बाईच्या पाठीमागे एक भल्ली मोठी रांग उभी राहिली. या रांगेत पोतराज होते, वासुदेव होते, गोंधळी होते, बोहारणी, कोल्हाटणी , अंगठा तुटलेले आदिवासी, मोरपिसांचा झाडू घेतलेले फकीर होते...दूर कुठेतरी वारकरयांचे  झेंडे दिसत होते.
या गर्दीला थांग नव्हता. या सगळ्यांच्या वतीनं ती वाजवीत होती-

                                    "देवा आमचं काय होणार, आम्ही आता बुडत चाललो."
                                
                                डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग,  डंग डंग डडांग - डांगचिक  डडांग 

तिच्या ठेक्यात कुठेतरी अस्पष्ट भूपाळीचे सूर ऐकू येवू लागले, कुठेतरी 'ग्यानबा तुकाराम' चा  गजर ऐकू येऊ लागला आणि हा सगळा नादकल्लोळ  वर वर चढत आभाळाला भिडत चालला. आभाळावर आता सत्ता ह्या  जत्थ्याची होती की त्या इमारतींची हे सांगवत नव्हते  .
आणि ह्या सगळ्या गर्दीच्या पुढे पोतराज चालला होता. आता पोतराजाच्या अंगात आलं होतं. तो जोरजोरात घुमू लागला होता. आणि त्वेषाने गोल  गोल फिरून स्वतःच्या चामड्यावर चाबकाचे आवाज काढीत होता - कडाड कडाड!

कुणीतरी  'साहेब' म्हणून हाक मारली आणि  मी अचानक भानावर आलो.
माझ्या अंगावर चांगले कपडे होते. माझं बाळ संगमरवरासारखं  गोरंपान आणि  गुटगुटीत दिसत होतं.
शहरी झालो होतो. साहेब झालो होतो. इस्तरीच्या कपड्याची घडी मोडू  देणं परवडणारं  नव्हतं. पोतराज केव्हाच निघून गेला होता.

पाऊस माती सुगीत उगवलेली ही संस्कृती आणि तिचे हे शिलेदार माझ्या वनरूम किचन मधे मी कुठे बसवू? देवघरासाठी एक स्क्वेअर फूट जागा जिथे चैन वाटावी तिथे मी पंढरीची दिंडी कुठे बसवू? पोटापाण्यासाठी रोज लोकल मधून जाता येता जिथे घरातल्या भिंतींप्रमाणेच मनालाही कुबट ओल सुटते तिथे मी ही एक पोतराज झालेला असतो...सांधा निखळलेला, फुटून बाहेर पडलेला!





                    


                    

  


    




Tuesday, 27 September 2011

"कोण आहे रे तिकडे ?"

"कोण  आहे  रे  तिकडे ?"
राजमहालात अस्वस्थपणे येरझारा घालत महाराज गरजले.
एवढ्यात आपली पगडी सांभाळत प्रधानजी धावत धावत येतो.
"मुजरा महाराज. आपण आज्ञा  केलीत? सेवक आपल्या चरणी हजर आहे महाराज "
येरझारा घालीतच राजाने विचारले ,
"प्रधानजी, ही 'गरिबी' म्हणजे काय भानगड असते तुम्हाला ठावूक आहे काय?"
"नाही महाराज! मला तर काही ठावूक नाही . तसा बऱ्याचदा आपल्या राज्यात मी हा शब्द ऐकलाय पण गरिबी म्हणजे काय मला नेमकं नाही सांगता येणार."....
"तथापि आपण काळजी करू नये महाराज . मी ताबडतोब एक समिती नियुक्त करतो आणि गरिबी म्हणजे काय याचा छडा लावतो"..."काय झालं महाराज? आपण फारच अस्वस्थ दिसत आहात. नेमकं झालंय तरी काय ?"
"प्रधानजी , गोष्ट मोठी गंभीर आहे, तेवढीच ती नाजूक पण आहे. रूपनगरीच्या  राजकुमारीचं  स्वयंवर आहे. आम्ही स्वयंवराचा विडा उचलून बसलोत. पण...पण प्रधानजी आम्हाला भीती वाटतेय की आम्ही हे स्वयंवर नाही जिंकू शकणार."
"असं काय म्हणताय महाराज? अहो तुम्ही एवढे शूर वीर असताना कुणाची टाप आहे तुम्हाला स्वयंवर जिंकण्यापासून रोखण्याची?"
"प्रधानजी, रूपनगरीच्या राजकन्येनं असं जाहीर केलय की ज्या राज्यात गरीब लोक असतील त्या राजाच्या गळ्यात ती माळ घालणार नाही. प्रश्न आता प्रतिष्ठेचा होऊन बसलाय प्रधानजी."
प्रधान, " हात्तिच्या! एवढंच ना? महाराज, तुम्ही  काही  टेन्शन  घेऊ  नका. आज तुम्ही निवांत झोपा. उद्यापासून आपल्या राज्यात झाडून झटकून बघितलं तरी गरीब दिसणार नाही याची जबाबदारी मी घेतो. तुम्ही निर्धास्त रहा."  
महाराजांना गुड नाईट करून प्रधानजी जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रधानजी दरबारात हजर होतो. त्याच्या सोबत सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेला एक मरतुकडा इसम हातात  भल्या मोठ्या फायलींचा गठ्ठा   घेऊन   उभा   असतो  .
राजाला  लवून  मुजरा  करून प्रधानजी सांगतो , "महाराज , हे आपल्या राज्यातले  फार मोठे  विद्वान  आहेत . 'गरिबी' हा  त्यांचा स्पेशालिटीचा विषय  आहे. गरीबीवर  आपण काल नेमलेल्या  एकसदस्यीय  समितीचे  तेच  अध्यक्ष  आहेत. त्यांनी समितीचा अहवाल सुद्धा सोबत आणला आहे."
हे ऐकून राजा अवाक होतो.
"महाराज,त्यांच्या  अहवालानुसार   तर  आपल्या  राज्यात  भरमसाठ  गरीब  लोक  असे ठासून  भरले  आहेत . मला  तर  वाटतंय  की  महालातले  आपण  काही  निवडक  लोक  सोडले  तर  आपली  अक्खी  प्रजा  गरीब  वर्गातच  मोडत असावी  .पण  तुम्ही  घाबरू  नका  महाराज , तसाच  गरिबी  'निर्मूलनाचा'  मार्ग  सुद्धा  मी  शोधून  काढलाय ." 
"तो काय?"
"महाराज  आपण  काय  करायचं  गरिबीची  रेषाच  इतकी  खाली  ओढायची  की  सगळेजण  आपोआप  गरिबी  रेषेच्या   वरच दिसले  पाहिजेत . म्हणजे  ती  गोष्ट  नाही  का , 'रेषेला  हात  ना  लावता  तिला  छोटी  करायची  असेल  तर  तिच्या  बाजूलाच  एक  मोठी  रेषा  काढायची' ...हे  थोडफार  तसच  आहे . एक  दमडीच्या  वर  ज्याचं   उत्पन्न  असेल  तो  श्रीमंत  म्हणूनच  घोषित  करायचा!"
"अहो,  पण  प्रधानजी, असं  कोंबडा  झाकून  ठेवला  म्हणजे  काय  उजाडायचं   थोडीच  राहणार  आहे? गरीब  तर  शेवटी  गरीबच  राहणार  ना ?"
"महाराज,  तुम्हाला  राजकन्येशी  लग्न  करायचंय   की  नाही ? मग  मुकाट्याने  मी  सांगतोय  तसं  करा . अहो  ते  स्वयंवर  म्हणजे  एक प्रकारची  शर्यतच  असणार  आहे . आणि  अशा  शर्यतीत  तुम्ही  ह्या  गरीबांचं   ओझं  पाठीवर घेवून धावणार  असाल  तर  कसली  जिंकताय   तुम्ही  शर्यत ?"
"पण प्रधानजी हा चक्क खोटारडेपणा आहे. आपण सत्याच्या मार्गाने जाउन खरं म्हणजे गरिबी नष्ट करायला पाहिजे."
राजाच्या  वक्तव्यात काही दम नाही हे धूर्त प्रधान जाणून असतो. कावेबाजपणे तो राजाला म्हणतो,
'मला सांगा महाराज आपण किती वर्षांपासून "गरिबी हटाव"चा नारा देतोय. झाली गरिबी दूर? कशी होणार? अहो आपल्या राज्यात शेवटचा गरीब मरून जात नाही तोपर्यंत गरिबी दूर होणारच नाही. आणि गरिबी निर्मूलनाचा हाच एक शहाणपणाचा मार्ग  आहे.आपण त्यांचं अस्तित्त्वच मान्य करायचं नाही राज्यात. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी..."
"....इतकच नाही तर 'गरिबी' हा शब्दावरच आपण बंदी घालायची. राज्याच्या शब्दावालीत 'गरीब' हा शब्द शोधून देखील नाही सापडला पाहिजे. फार झालं तर बाराखडीतूनच 'ग' हा शब्द आपण काढून टाकू. म्हणजे कसलीच नौबत राहणार नाही."
"पण मग प्रधानजी, सगळे गरीब गरजू लोक जर राज्यातून नष्ट झाले तर आपल्याला काम तरी काय राहणार? आपली राज्यव्यवस्था मुक्त आणि उदार आहे, जो तो आपली आपली कामे स्वतः करतो. एक जनतेला सामाजिक सुरक्षा देण्याचं काम तर तेवढं आपण करीत असतो. तेही झटकून टाकायचं म्हणजे जरा अतीच..."
" तिथेच  तर खरी मेख आहे महाराज! अहो असला फुकटचा खर्च आपण उरावर घ्यायचाच कशाला? तेवढ्या पैशात आपल्या अक्ख्या महालात ए.सी.बसवून होईल... बड्या बड्या लोकांना नजराणे भेट करता येतील... त्यांच्या आगमनासाठी मलमली गालिचे अंथरता येतील...भारी भारीची शस्त्रास्त्रे  विकत घेता येतील... त्यांच्या जोरावर शेजार्याना दम भरता येईल...आणि मुख्य म्हणजे महाराज रूपनगरच्या राजकन्येची मर्जी संपादन करता येईल! तसं पाहिलं तर आता आजूबाजूंच्या सगळ्या राज्यांमध्ये तुमच्याशिवाय सामर्थ्यवान दुसरा कोणी राहिलेला राहिला नाही. हीच नामी संधी आहे. अशा निर्वाणीच्या क्षणी  ही गरिबीची नाट लावून घेऊ नका. झटकून टाका आणि पुढे व्हा."
प्रधानाच्या ह्या बोलण्याचा  राजाला तिरस्कार वाटतो पण त्याच क्षणी त्याला  आत कुठेतरी हलकेच सुखावल्याची  जाणीव  होते. वरकरणी तो प्रधानाला विचारतो, 
"आपणच असं झटकून टाकल्यावर या लोकांनी जायचा तरी कुठे? त्यांना कोण वाली आहे. काय करणार बिचारे?"
"वा! वा! असं कसं? असं कसं? चांगले  तीन पर्याय  आहेत की त्यांच्या समोर-
पहिला पर्याय म्हणजे 'उपोषण करणे'. नाहीतरी सध्या राज्यात उपोषण करण्याची फ्याशन पडलीच आहे तेव्हा गरिबांनी सुद्धा तेच करीत रहायचं. ह्या मोठ्या मोठ्या लोकांचा अनुकरण करायचं. काय म्हणतात बरं त्याला...महाजनो येन गता स पंथः!   हा हा हा!
उपोषणे फारच असह्य व्हायला लागली की दुसरा पर्याय आहेच- 'फाशी घेणे'! तोपर्यंत आपण कायद्याने फाशी घेण्याला शिस्तशीर मान्यताही  देऊन टाकू. फार झालं तर जीव देणाऱ्या गरीबांना मरणोपरांत पुरस्कार जाहीर करू. नाहीतरी जीव देऊन हे लोक राज्यावरचा भार हलकाच तर करीत आहेत. ही पण  एक प्रकारची राष्ट्र भक्तीच आहे की? हा हा हा हा !
त्यातले काही कट्टर गरीब मात्र तिसरा मार्ग पत्करतील. तो म्हणजे- 'हाती बंदूक घेणे'! हा हा हा ! पण आपल्याला  घाबरायचं  मुळीच कारण नाही. एवढी सुसज्ज सेना आपण बनवलीय तरी कशासाठी मग? या बंडखोरानाच आपला 'एक नम्बरचा शत्रू' म्हणून जाहीर करायचं आणि...आणि करायचा गोळीबार...धाड धाड धाड..हा हा हा हा हा ! "
प्रधानाचा अभिनिवेश पाहून राजा घाबरतो पण मनातल्या मनात मात्र तेवढाच खुश होतो. 
समितीच्या शिफारसपत्रिकेवर राजा स्वहस्ते राजमुद्रा उठवतो. आणि स्मितहास्य करीत स्वयंवराची गुलाबी स्वप्ने रंगवीत स्वतःच्या कक्षात निघून जातो.





 

Saturday, 20 August 2011

'अण्णा हजारेंचा काटा काढण्याचे १०१ मार्ग'



माननीय पंतप्रधान साहेब,
आपण सध्या किती कठीण परिस्थितीतून जात आहात याची मला एक जागरूक नागरिक या नात्याने जाणीव आहे.
तुमच्या पगडीतून आतले टक्कल दिसत नसले तरी त्याच्यावर आलेला लोड मी समजू शकतो.
अण्णा हजारे या माणसाचे काय करावे तुम्हाला काही कळत नसेल नाही. होतं असं कधी कधी. (माझ्या सासऱ्याबद्दलही मला अधून मधून असंच काहीतरी वाटत असतं.)
तुम्ही एवढ्या महान देशाचे पंतप्रधान. मी आपला सामान्य माणूस. माझा वकूब तो केवढा. पण  माझ्या परीने का होईना तुम्हाला मदत करावीच म्हणतो.
 तुमची या अडचणींतून  सुटका व्हावी या निर्मळ हेतूने प्रेरित होऊन मी एक पुस्तक लिहिले आहे- 'अण्णा हजारे यांचा काटा काढण्याचे १०१ मार्ग' !
हवं तर तुम्ही याला 'सेल्फ हेल्प बुक' समजा.
हे पुस्तक मी अनुक्रमे तुम्हाला आणि सोनियाबाईंना समर्पित करीत  आहे.
अहो एक माणूस अख्खी संसदीय लोकशाही वेठीस  धरू पाहतो म्हणजे गम्मत आहे की काय? अशात काहीतरी चमत्कार घडावा आणि हे शुक्लकाष्ठ एकदाचं निघून जावं असं तुम्हाला कित्ती कित्ती वाटत असेल नाही?   
म्हणूनच असले असले जालीम उपाय सुचवले आहेत या पुस्तकात तुम्हाला सांगतो....
उदाहरणादाखल काही उपाय मी तुम्हाला वाचून दाखवतो.
पान नंबर १३ उघडा.
धडा २ रा.   
"जगबुडीची आवई उठवणे"  
अशा नाजूक  वेळेस जनतेचं ध्यान दुसरीकडे वळवायचा हा सर्वात सोपा आणि निरुपद्रवी मार्ग आहे. नाहीतरी २०१२ साली  जगबुडी येणार अशी  हवा आहेच. आपण त्याचाच फायदा घ्यायचा.आणि "जगबुडी आली! जगबुडी आली!" अशी आवई उठवायची! मेडिया सगळा म्यानेज करा. यावेळेस  ती चूक करू नका. हवं तर जॉर्ज बुशला फोन करा. त्याने पण अशीच अफगाण युद्धाच्या वेळेस रुपर्ट मर्डोकसोबत सोयीच्या प्रसारणासाठी एक डील केली होती म्हणे. तुमची अवस्था  बघून तो तुमचं काम स्वस्तात करून देईन.
तसं जनतेचं लक्ष वळविण्याचा दुसरा एक घरगुती उपाय होता माझ्याकडे. तो असा की आपण ऑलिम्पिक  सारखे  काहीतरी अचाट खेळ अगदी वाजत गाजत सुरु करून द्यायचे. जुन्या काळी जनतेला भुलवण्यासाठी ग्रीसमध्ये अशा खेळांचा उपयोग करून घ्यायचे. पण नेमकाच आपला राष्ट्रकुट खेळांचा पचका झालाय. अजून लोक तेच विसरले नाहीत. त्यामुळे तूर्तास हा उपाय वापरणे शक्य नाही. उगाच खाजवून खरुज कशाला काढायची?
हे उपाय फारच पानचट वाटत असेल काही जालीम उपायांसाठी पान नंबर ४७ उघडा .
धडा ५ वा .
"जारण मारण तंत्र" 
अण्णा हजारेंना सरळ अटक करायचं . पण यावेळेस त्यांना तिहार जेलमध्ये नाही ठेवायचं. लांब कुठेतरी नेवून ठेवायचं. ते अंदमानातले  काळ्या पाण्याचे जेल चालू आहे  का हो अजून?
अण्णांच्या मागे जाणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कार्यकर्त्यांवर गोळीबार करणे वगैरे उपाय मला सुचले होते. पण या उपायांत काही originality नाही. इंग्रज लोकांनी ते आधीच करून ठेवलय. नाहीतर निष्पाप जनतेवर गोळीबार करण्याचा तुमचा नंदीग्राम, मावळचा  अनुभव इथे कामाला आला असता. 
तसं 'प्रत्यक्ष' हिंसा न करताही आपलं काम होऊ शकेल बरं का . म्हणजे बघा अण्णा आहेत वयोवृद्ध. आधीच तब्येतीने तोळामासा. त्यात पुन्हा उपोषणाला बसलेत. आठवडा तर होतच आलाय... बसू द्या असंच...!
पण या उपायात एक फार मोठा धोका आहे. अण्णांचं असं काही बरं वाईट  झालं तर सगळीच जनता पेटून उठेल. आपल्याला आताच देशात क्रांती वगैरे परवडणार  नाही. आहे त्या सिस्टीम मधले आपले ' vested interests ' आपल्याला विसरून कसे चालेल? 
शिवाय क्रांती ,संपूर्ण क्रांती हे एकदा पोळलय ना आपल्याला ? तेव्हा आता जरा जपूनच !
आणिबाणी वगैरे लागू करा असंही सुचवणार होतो पण जाऊ द्या.... तुम्हाला नाही झेपायचं ते.
त्यापेक्षा आपला एक सनातन उपाय सांगतो- "यामागे विदेशी शक्तींचा हात आहे" असा सरळ ठोकून द्यायचं! "नेमका कोण?" म्हणून विचारलं की काहीतरी मोघम मोघम सांगून द्यायचं. तेवढं तर तुम्हाला चांगलंच जमतं की!
जारण मारण तंत्रात अजून एक उपाय आहे. तो म्हणजे अण्णांना वेडा ठरविणे. नाहीतरी "समाजसेवा"! "समाजसेवा"! करीत आयुष्यभर लोकांसाठी झिजून स्वतःसाठी दमडीही शिलकीत न ठेवणाऱ्या  माणसाला आपल्याकडे वेडाच म्हणायची पद्धत आहे. आणि  आतातर हा माणूस उभ्या देशाला वेडाच्या नादी लावतोय. अशा वेड्यांवर धमक्या बिमक्यांचाही  काही परिणाम होत नाही. नंगे से खुदा डरे!

पुस्तकात अजुन पुढे काही तात्त्विक उपाय सुचवले आहेत.त्यासाठी पान नंबर १६७ उघडा. 
धडा ११ वा . 
"मनमोहन विषाद योग" 
यातला पहिला मार्ग आहे- 'सन्यास घेणे'.
राजकारणातूनच नाही, तर एक आपला, जनरली, संन्यासाच घेऊन टाकायचा. म्हणजे कसं "राजकारण नको पण अण्णा आवर" असं जे तुमचं होतंय ना त्यातून तुमची कायमची सुटका होईल.
आता तुमचा राजकारणाचा लोभ सुटतच नसेल तर त्यासाठीही काही मार्ग आहेत आपल्याकडे.
काय करा, तुम्ही आत्तापुरता राजीनामा देउन टाका. मग तुमच्या अख्ख्या मंत्रीमंडळासोबत विदेशात जाउन सगळ्यांची  होलसेल प्लास्टिक सर्जरी करून घ्या. आणि एका 'नव्या चेहऱ्यानिशी' परत येउन एक नवीनच राजकीय पक्ष सुरु करून मगच जनतेसमोर या! (तुमच्या नवीन पक्षासाठी  राजकीय सल्लागार म्हणून मी आहेच!)
यातूनही यशाची खात्री वाटत नसेल तर एक काम करा. एखादं नवीन बेट शोधून काढा. तिथे जावून निवडणूक लढवा. गेलाबाजार राहुलबाबाचं पंतप्रधान व्हायचं  स्वप्न तर नक्की पूर्ण होईल!
एक खबरदारी मात्र बाळगा. तुमचे काही कच्चे सल्लागार "अन्नांनाच तिकीट द्या" असं सुचवतील. ही घोडचूक अजिबात करू नका! अशी खतरनाक माणसं सत्तेच्या रिंगणात मुळीच घुसता कामा नयेत.
आता आपण राजकीय उपायांकडे वळलोच आहोत तर पान नंबर ८२ वरचा, ८ व्या धड्यातला एक उपाय जाता जाता सांगून टाकतो.' विरोधी पक्षाशी हातमिळवणी करणे'. आज तुम्ही जात्यात आहात ते सुपात आहेत. तुमच्याकडे अशोक चव्हाण आहेत तर त्यांच्याकडे येडीयुरप्पा आहेत. तेव्हा त्यांनी नुसती मजा बघून किंवा आगीत तेल ओतून कसं चालेल? पण सध्या कात्रीत तुम्ही अडकला आहात तेव्हा पुढाकार तुम्हालाच घ्यावा लागेल. एकत्र मिळून अण्णांवर काही तोडगा निघतो ते पहावे. 

हे उपाय करा न करा. पण एक गोष्ट मात्र आधी करा. आधी ते मख्ख  चेहऱ्याचे पक्ष प्रवक्ते हटवा आणि स्वतः पब्लिकला सामोरे जा. अहो लोकशाहीत तुम्ही खऱ्या अर्थाने लोकनेते आहात. तुम्हीच  असं लोकांपासून तोंड लपवून कसं चालेल? इकडे तुम्ही ताटी लावून बसलात. तिकडे सोनियाबाई सोवळ्यात असल्यासारखं वागतायत. लोकशाहीत जनतेलाच असं अस्पृश्यासारखं वागवून कसं चालेल? जा की त्यांना सामोरे. आणि त्यात एवढं कानकोंडा वाटून घ्यायची गरजच काय? शेवटी ती तुमचीच जनता आहे. आणि भ्रष्टाचार जगात कुठे होत नाही? या एकदा समोर. संवाद घडला की सगळ्यांची मने निर्मळ होतात.
जन-लोकपाल बिलाचे तुम्ही म्हणता तसे 'grave consequences for parliamentary democracy ' , तुमची 'theory of parliamentary supremacy ' ,' एक शक्तिशाली लोकपाल बनविण्यातल्या मर्यादा आणि संभाव्य  धोके' .....हे सगळं अगदी बरोबर आहे हो. पण सामान्य जनतेला एवढं जास्त कळत नसतं. ते त्यांना समजेल अशा भाषेत आणि योग्य त्या व्यक्तीने सांगणेच ...जाऊ द्या. त्यापेक्षा सरळ तुम्ही पान नंबर २१४ काढा आणि धडा १४ वा 'public perception management ' वाचून काढा.
अण्णांच्या उपोषणाचे दिवस वाढत जातील तशी तुमची गोचीही वाढत जाणार आहे. तेव्हा काही निर्वाणीचे उपायही आताच सांगून ठेवतो. पुस्तकात ते Annexture -२ मधे दिले आहेत.
फारच अटीतटीची  वेळ आली तर अण्णांना एक 'जादू की झप्पी' द्या आणि त्यांचे म्हणणे सरळ मान्य करून टाका! लोकपाल ते म्हणतात तस्साच  काही अगदी बनवायची गरज नाही. पण काहीतरी बनवा तर खरे! अहो लोकांनी तर  तुमचा लोकपाल येणार की अन्नाचा लोकपाल येणार यावर सट्टा लावायला सुरुवात केली आहे म्हणे!
शेवटी आता तुम्हाला खरं सांगू का, मूळ मुद्दा भ्रष्टाचाराचा नाहीच आहे. 'तळे राखील तो पाणी चाखील' हा न्याय भारतीय जनतेला अनादी काळापासून मान्य आहे. आज मुद्दा आहे तो महागाईचा, misgovernance चा  आणि असल्याच छोट्या छोट्या गोष्टींचा. आणि ह्याच छोट्या गोष्टी बहुसंख्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या असतात. म्हणूनच ती लोक आज अण्णा हजारेंच्या मागे उभी राहतात.  त्यांच्या मागे उभ्या असलेल्या गर्दीला आणि त्यांच्या आंदोलनाला मेणबत्त्या घेऊन फिरणार्यांचा  urban  middle class phenomenon समजण्याची चूक करू नका. राष्ट्राचं भवितव्य बदलण्याच्या शक्यता या आंदोलनात दडलेल्या आहेत.तेव्हा पंतप्रधान साहेब... सावध असा!
सगळेच उपाय काही मी तुम्हाला फुकट  सांगणार नाही. हे फक्त एक ट्रेलर दाखवतोय. बाकी पुस्तकात मी सगळं लिहिलंच आहे. पुस्तकाचे मानधन म्हणून माझी फार काही मागणी नाही. आपल्या सरकारात जेवढे काही  भ्रष्ट व्यवहार होतील त्याच्या फक्त 0 .१%  रक्कम माझ्या बँक खात्यात जमा होत रहावी इतकेच. घाबरू नका...माझेपण स्विस बँकेत खाते आहे! आधी तिकडे खाते उघडून मगच पुस्तक लिहायला बसलो!
(ता.क. - चुकून माकून परत सत्तेवर आलात तर तुमचा राजकीय सल्लागार म्हणून माझ्या नावाचा गांभीर्याने विचार व्हावा ही नम्र विनंती.)

                                                                     आपलाच-
                                                                       फकीरा 

 


 




  

  

Wednesday, 17 August 2011

गांधीजींचे 'चौथे' माकड


काल  मला  एक  विलक्षण  स्वप्न  पडलं . 
रात्री  माझ्या  स्वप्नात  बापूजी   आले . 
बापूजी  सारखं  काहीतरी  शोधत  होते .
मी  म्हटलं, "बापू  काय  चष्मा  शोधताय  की  काय?  तो  काय  तुमच्या  डोक्यावरच  आहे  की"!! 
बापू  म्हणाले, " नाही  रे  फकिरा!  मी  काहीतरी  दुसरंच  शोधतोय ..." आणि  पुन्हा  इकडेतिकडे  शोधायला  लागले .
मी म्हटलं ,   "बापू , अहो  सांगा  तरी  काय  शोधताय  ते. मी  मदत  करीन  तुमची  सापडून  द्यायला  " 
मग  बापूंनी  नजर  वर  करून  माझ्याकडे  पाहिलं . त्यांच्या  चेहऱ्यावर  आशा  जागी  झाली . बापू  माझ्या  दिशेने  जवळपास धावतच  आले  आणि  म्हणाले,  "खरंच ? खरंच  शोधून  देशीन  मला ?"
स्वप्नात  बापूच्या  चेहऱ्यावर  तेवढा  उजेड  दिसत  होता.  बाकी  सर्वत्र  अंधार  होता . पण  तेवढ्या  उजेडातही  बापूच्या  दातांच्या  फटीतून  'खरंच'  म्हणण्यात  मला  एक  वेडाची  झलक  दिसली .
मी  जरा  आश्वासक  सूर  धारण  केला  आणि  विचारलं ,
"काय  हरवलय  बापू?" 
पुन्हा  अस्वस्थपणे  इकडेतिकडे  पाहत  बापू  मला  म्हणाले, 
"अरे,  माझं  चौथं  माकड  हरवलय  रे ..."
मी  चक्रावून  गेलो 
"अहो  बापू  असं  काय  करताय?  तुमची  तीनच  माकडं  नव्हती  का ? एक  डोळे  बंद केलेलं , एक  कान  बंद  केलेलं , आणि  एक  तोंड  बंद  केलेलं ?
"नाही  रे.  मला पक्कं आठवतंय . माझं  एक  चौथं  माकड  पण  होतं ...कुठे  हरवलय  कोण  जाणे?" 
आणि  असं  म्हणून  बापू  पुन्हा  इकडे -तिकडे  अस्वस्थपणे  भिरभिरत  शोधायला   लागले .
मला  शंका  आली  बापूंना   काही  वेड -बीड   तर  लागलं  नाही  ना ? 
मी  ठरवलं  की  आपण  बापूंची  मदत  करायची . मी  बापूंचा  हात  धरला  आणि  म्हटलं  ,
"बापू , चला  आपण  त्या  चौकात  जाऊ ,तिथे  काही   लोक  जमलीत . आपण  जाऊन त्यांना  विचारू .त्यातल्या   कोणीतरी नक्कीच  चौथे  माकड  पहिले  असेल ".
बापूंना लहान मुलासारखा आनंद झाला.
आम्ही दोघे चौकात गेलो.
तिथे धूसर उजेड होता आणि भयाण शांतता होती.
माणसांच्या काही आकृत्या इकडून तिकडे फिरत होत्या. पण आवाज कशाचाच होत नव्हता.
मी अजून जवळ गेलो...आणि माझं रक्तच थिजून गेलं.
यातल्या कुठल्याच माणसाला चेहरा नव्हता...
बापूंना हाताशी धरून मी धिटाईने एकाला विचारले,
"का हो! तुम्ही चौथं माकड पाहिलंत का?"
माझा प्रश्न ऐकून तो बिन-चेहऱ्याचा माणूस काहीच बोलला नाही. फक्त त्याने बोट दुसऱ्या एका माणसाकडे दाखवले. ही सगळी माणसे सारखीच दिसत होती!
त्याच्याजवळ जाऊन  मी त्यालाही  तोच प्रश्न केला.
"का हो! चौथं माकड पाहिलंत का?"
प्रश्न ऐकून हा माणूस एकदम रडायला लागला. मी आणि बापू  गोंधळून गेलो. त्याने रडतरडतच तिसऱ्या एकाकडे बोट दाखवले.
त्याच्याकडे जाऊन मी पुन्हा प्रश्न केला.
प्रश्न ऐकला आणि हा माणूस मोठ मोठ्याने हसायला लागला.
मी आणि बापू त्याच्या हसण्याने दचकून गेलो. लगबगीने आम्ही तिथून निघून दूर, एका घोळक्याकडे गेलो.
तशीच बिना चेहऱ्याची माणसे.
मी पुन्हा तोच प्रश्न केला,
"का हो! तुमच्यापैकी कुणी चौथं माकड पाहिलंय का?"
एकजण बोलला आणि कुत्सितपणे म्हणाला,  
"चौथे माकड होय?  हुं.....ते गेलं पळून. बाकी तिघांची दुर्दशा बघून त्याने पळ काढला. काही बोलायचं नाही, ऐकायचं नाही, बघायचं नाही.....गेला पळून !ह्याच दिशेने गेला बघा."
त्याच्यानंतर  दुसरा बोलला .दोन्ही हात जोडून म्हणाला,
"नमस्कार बापू! तुमचे चौथे माकड आम्हाला चांगले ठाउक आहे. ते आता आमचे नेते आहेत. हो,थोडं पोट सुटलंय त्यांचं आता, पण बापू,त्यांच्यासारखा थोर जगात कुणीच नाही. आता चौकात  तुम्ही त्यांची लाईफ साईझ पोस्टर्स पहिलीच असतील.गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं  काहीही काम असू द्या, ते नक्की करतील याचं आश्वासन मी तुम्हाला देतो. अहो, अख्खी सत्ता शेपटात गुंडाळून फिरतात ते!....पण बापू,यंदाच्या निवडणुकीत तुमचं मत मात्र त्यांनाच पडायला हवं बरं का?  ख्या ख्या ख्या  !"
त्याच्यानंतर  तिसरा बोलला.हा सारखा सिग्रेट पीत होता.
“चौथे माकड  ना? . Oh i see! I know him. तो  गेला . I mean he has left this country for good. You know this country is going to dogs... मी  पण  देश  सोडतोय  लवकरच ” असं म्हणून त्याने जळालेलं थोटूक दूर भिरकावून दिलं.
मी  बापूंच्या   चेहऱ्याकडे  बघायचं  टाळत  चौथ्याकडे वळलो. 
तो  मला   दुर्लक्षित  करून  थेट  बापूंकडेच   बघत  म्हणाला ,
“केम  छे  बापू ? ते  चौथे  माकड  ने ? ते  धंद्यामंदी लय  मोठा  झ्याला . बेज्या मोठ्ठा! आता  ते  मोठ  मोठे   MNCs चलावते . तुमचा  ते  tribal  लोकांचे  जमीन  घेते  अन  मोठेमोठे  प्लांट  उभे करते ...तुमचा  सरकारला  इलेक्शनमंदी  finance करते ...अन  मोठ्या मोठ्या   २७   मंजीली   घरात   राहते  . तेच्या  एकदम  च्यांगला  झाला बापू .हे  हे  हे !”
त्या  चौथ्याला  बाजूला  सारीत  पाचवा माणूस  धाडदिशी  समोर  आला  आणि  म्हणाला ,
“ ए  बापू , तेरा  चौथा  माकड  अभी  भाई  बन  गयेला  है . बोले  तो  एकदम  बडा  डॉन ! अभी  वो  दुबई  से धंदा करता  है . इधर  का  पूरा सट्टा  मार्केट , स्मगलिंग, match fixing  पूरा  देखता  है ...सुप्पारी भी लेता है .तेरा  कुछ  सेट्टिंग  होयेगा  तो  बोल ..”
अजून  कोणी  बोलायच्या  आत  बापूंनीच  माझ्या  हाताला एक  हिसका  दिला  आणि  म्हणाले, 
"आधी  इथून  निघ" .
आम्ही  जात  होतो  तोच   अजून  एक  तसाच  बिन  चेहऱ्याचा  माणूस  आम्हाला  सामोरा  आला .
त्याच्या  आवाजात  नम्रता  होती . तो  म्हणाला ,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  पण  तुमची  गांधी  टोपी  घालतंय . देशात  भ्रष्टाचाराविरुद्ध  जनमत  जागवतंय   . तुमच्यासारखीच  आंदोलने  करतंय  ...आणि  तुमच्यासारखच  अटक पण  होतंय ."
पहिल्यांदा  बापूंच्या  चेहऱ्यावर  मी  तिरस्काराशिवाय  एखादी  भावना  पहिली .
आनंद , व्याकुळता , अभिमान , हताशपणा..... बापूंच्या  डोळ्यात  पाणी  तरळलं .
एक एक शब्द मोजीत बापू  म्हणाले,
“ नथूरामांना  आता  अजून  एकदा  पिस्तुलं  तयार  ठेवा  म्हणावं ”
आणि एवढं  बोलून  उद्वेगाने   बापू  पुढे  चालू  लागले .
चौकापासून  खूप  दूर  एका   भेसूर  दिसणाऱ्या  झाडाच्या  पारावर  कुणीतरी  एकटच  मान  खाली  घालून बसलं  होतं . तिथून  अस्पष्टसे    हुंदके  ऐकू  येत  असल्यासारखं  मला  वाटलं .
अभावितपणे  मी  बापूंचा  हात  ओढीत  तिकडे  चालायला  लागलो .
ती  एक  वृद्ध  स्त्री  होती ! जुनकट  आणि  बिनचेहऱ्याची.   
बापुपासून  नजर  चोरत  तिने  पदर  तोंडाला  लावला .
डोळे  पुसायच्या  निमित्ताने  ती  बापूंना  चेहरा  दाखवायचं  टाळत  होती .
पदराआड तोंड लपवून तिच्या  थकल्या  वृद्ध  आवाजात ती  बोलायला लागली,
"बापू , तुमचं  चौथं  माकड  मला  माहित  आहे . खूप  वर्षे  ते  इथे  होतं . उणीपुरी  साठ  वर्षे  आम्ही  संसार  केला . ही  जी  सगळी  बिना  चेहऱ्याची  प्रजा  तुम्ही  बघताय  ती  आमच्या  दोघांचीच  संतती  आहे . पण  चौथं माकड  कुठे  गेलं  मला  काहीच   ठाउक  नाही  बापू ....." एक  हुंदका  देऊन  पुन्हा  निर्धाराने  ती  बोलली, 
 "असो  ते  कधीतरी  जाणारच  होतं ”
सुन्न  शांतता   पुन्हा  पसरली.
मी  विचारलं ,
"बाई  तुझं   नाव  काय ?"
बापुंपासून  अजूनच  तोंड  झाकत, अत्यंत  खजील  आवाजात  ती वृद्ध स्त्री म्हणाली, 
"माझं  नाव  लोकशाही !"

बापू , मी ,  तो   चौक ... सगळेच  स्तब्ध  झाले .... स्मशान  शांतता पसरली .
सगळी  बिनचेहऱ्याची  माणसे  आमच्या  भवती  गोल  रिंगण  करून  गोळा  झाली .
बापू  पुतळ्यासारखे  खिळून  निश्चल  उभे  राहिले  होते .
आणि  आता  अंधार   चहुबाजूंनी  आमच्या  जवळ  जवळ  सरकत येत चालला होता .




Tuesday, 2 August 2011

काल एक चमत्कार झाला!

काल एक चमत्कार झाला! 
तीन महिन्याची बाळं सहसा बोलत नाहीत...सहसा म्हणजे काय बोलतच नाहीत, पण माझी तीन महिन्याची मुलगी मला बोलली!
अहो नाही, तुम्ही म्हणता तसं डोळ्यातल्या हावभावांनी वगैरे नाही हो! चक्क  मोठी माणसं बोलतात तस्स बोलली!!!
म्हणजे त्याचं असं झालं बघा, मी आपला रात्री उशीरापर्यंत कुठलसं पुस्तक वाचत बसलो होतो.... साधारणतः रात्री दोनचा सुमार असेल.... बाळ अशी  माझ्या बाजूला झोपली  होती.... आणि मला अचानक खुदकन हसण्याचा मोहक आवाज ऐकू आला!  आता झोपेत लडिवाळ हसण्याचे बायकोचे दिवस राहिले नाहीत हे मला ठावूक आहे. मग हसतंय कोण म्हणून पाहिलं तर माझी मुलगी माझ्याकडे बघून खुदुखुदू हसत होती.
तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहून मला वाटलं की हिला आताच बोलता आलं तर किती छान होईल!
कधी कधी जीभेवर सरस्वती का काय विराजमान होते म्हणतात ना,तसं झालं बघा! मी परत पुस्तकात डोकं खुपसतोय इतक्यात पुन्हा मला हसण्याचा आवाज आला आणि त्यापाठोपाठ चक्क बाळाचे बोल ऐकू आले-
" काय वाचतोयस रे बाबा इतकं? माझ्याशी पण बोल की जरा" !
क्षणभर माझा विश्वासच बसला नाही. पण खरंच ती मला बोलत होती. अगदी अस्खलित शब्दात ती माझ्याकडे बघून बोलायला लागली.
"असं दचकतोयस  काय रे बाबा?  मी बोलू शकते याच्यावर विश्वास नाही ना बसत? पण मी खरंच बोलतेय. तू स्वप्नात वगैरे नाहीस. ते स्वतःला चिमटा वगैरे घेऊन बघतोयस ते बंद कर.
....आता तुला मी सांगते की मला असं बोलणं का भाग पडतंय. बाबा,आवश्यक होतं रे. त्याचं कायै, मी थोडी confused आहे सध्या.... हसायला काय झालं? छोटी बाळं confuse होऊ शकत नाहीत का?... तुला सांगते बाबा,अरे, उलट आम्हा newcomers चे  tensions तुम्हा आई-बाबांपेक्षा जास्त आहेत.
त्यात मी मुलगी. म्हणजे मला तर जन्मायच्या आधीपासूनच tension! बरं जन्मल्यानंतर सुखी म्हणावं तर ते तरी सोपं दिसतंय का?. अरे काय काय चालू असतं हल्ली आपल्या देशात! ...श्ह्या! मला तर बाई पश्च्चात्तापच  होतोय इथे जन्माला आल्याचा!
....बरं हे जन्माला येणं तरी सुखाचं होतं म्हणतोस की काय? तू काय सांगत होतास ना एका मित्राला की तू कुठल्याशा परीक्षेला चार वेळा बसलास, अरे मी तुला सांगते, मागच्या सहा महिन्यात मी पाच वेळा जन्म घेतलाय! प्रत्येक वेळी मी मुलगी आहे म्हणून मला जन्म नाकारला गेला. तू जरा भला माणूस आहेस, त्यातून थोडा शिकला सवरलेला आहेस, शिवाय मी तुझं पहिलं बाळ नं....आले जन्माला!
.....खोचक बिचक नाही रे, हे असंच आहे बघ. पाहिलं बाळ असलं ना की आनंदाने "मुलगी काय मुलगा काय आम्हाला सारखेच" असं म्हणून मुलीला जन्माला घालतात. पण दुसरीसुद्धा मुलगीच होणार असेल तर मात्र बरोबर क्लिनिक मधे जाऊन 'आधी सोनोग्राफी मग एम्.टी.पी.' असा रीतसर कार्यक्रम उरकून घेतात.
तू असशील रे डॉक्टर-बिक्टर पण मला या गोष्टींचा  'याचि देहि याचि डोळा' अनुभव आहे म्हणून सांगते. नेमकं तिसऱ्या महिन्यात मला ultra -sound waves चा कर्ण कर्कश्श आवाज ऐकू यायचा.आणि माझं काळीज धड धड करायचं. आणि मग काही दिवसात TERMINATE !
यावेळेस तर मी आशाच सोडून दिली होती. But you see I am here ,ALL ALIVE !
बरं ते सोड, मुद्द्याचं बोलू... तर मी तुला काय सांगत होते...हं, की मी थोडी confused आहे!
....नाही रे, तसलं existential confusion वगैरे नाही, साधा आपला logical dilemma आहे...म्हणजे बघ आता मी जन्माला आले म्हणून तू एवढा कौतुक सोहळा वगैरे केलास, 'जन्मले एकदाची' म्हणून मला पण बराच आनंद वगैरे झाला...पण बाबा मला आता वाटायला लागलंय की खरंच Is this world a safe place to be in ?
.....कालचाच न्यूजपेपर बघ की-   आंतरराष्ट्रीय बातम्याचं पान बघ- सिरियातील गोळीबारात ४५ आंदोलक ठार, इराक मधील आत्मघातकी स्फोटात १२ जण ठार, जगाच्या दारावर पुन्हा मंदीची थाप...शिवाय अफगाणिस्तान, कोरिया, ग्लोबल वार्मिंग,दहशतवाद हे रोजचं स्टफ.... आता राष्ट्रीय बातम्याचं पान काढ  - बिहारमध्ये माओ वाद्यांनी दोघांची हत्या केली, त्रिपुरामध्ये ग्रामस्थांचा B.S.F. कडून छळ....आणि बाकी कलमाडीचं स्मृतीभ्रंश , अण्णा हझारेंचा लढा, येदियुराप्पाचा शिरजोरपणा, ए राजाची तिरंदाजी हे रोजचं...आता तुझा पुरोगामी महाराष्ट्र बघ- बुलढाण्यात  एका C.E.O. ला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.....पुढे अजून काही सांगण्याची गरज आहे का?
हा झाला एका दिवसाचा पेपर....काय? एवढं पेज नंबरसहित कसं लक्षात राहिलं म्हणतोस? अरे मेमरी strong आहे माझी....आईवर गेलेय नं! 
चल एकवेळ आपण जगाचं  सोडून देऊ, पण individual life तरी कुठे सोपं राहिलंय? अरे competition किती भय्यंकर आहे हल्ली आणि survival साठी struggle करता करताच आयुष्य हातचं निघून चाललंय की.... म्हणायला मी एक अख्ख आयुष्य घेऊन आलीय पण ह्या सगळ्यात धावता धावता नेमकं तेच आयुष्य जगण्याची उसंत तरी मला भेटणार आहे की नाही.....बाय द वे यावर्षी इंजिनीरिंगचि admissions कितीला क्लोज झालीय रे ?
आणि नुसता intelligent वगैरे असून तरी  कुठे भागतय? वरतून पुन्हा पैसे लागतातच.
ए बाबा, आपण गरीब आहोत की श्रीमंत? खजील नकोस रे होऊ. कायै की top वर असल्याशिवाय कुणी विचारतच नाही... घुमवून फिरवून गोष्ट तिथेच येते. आता तो सिनेमा नाही का... 'तारे जमीन पर'... शेवटी त्यात पण काय दाखवलय, तो मुलगा top पेंटिंग बिंटिंग  काढतो तेव्हाच त्याला recognition मिळतं की नाही? आणि तेच त्याला काहीच येत नसतं  आणि नुसतीच त्याला learning disability असती तर? झाला असता तो हिरो? निघाला असता त्याच्यावर चित्रपट?..बाबा, मी पण समजा कुठल्याच क्षेत्रात extra -ordinary निघाले नाही तर...avarage लोकांना खरच काही स्थान नाही का रे बाबा या जगात ? त्यात पुन्हा तू तर खेड्यापाड्यात settle व्हायचं म्हणतोयस म्हणजे आमचं तर करियरच बोम्बललं!
.....अच्छा! ते चित्रपटाचं मला कसं माहीत म्हणतोस? अरे तेव्हा मी पोटात होते ना! का बरं ? अभिमन्यू पोटात राहून चक्रव्युव्ह भेदायचं लक्षात ठेवू शकतो मग  मला काय साधी पिक्चरची  स्टोरी पण लक्षात राहू नये काय?.... आणि थांब मधेच लिंक तोडत जाऊ नकोस अशी... 
.....ही धावपळ पण कशी चाललीय बघ ना, आधी शिक्षण, उच्च शिक्षण, मग नोकरी, लग्न, घर, गाडी,EMI ,savings,... सगळेच कसे आपण जणू eternity पर्यंत जिवंत राहणार आहोत अशा धुंदीत जगल्यासारखे जगत आहेत , जे जगून घ्यायचे त्या एक-एका क्षणाची value कोणी ठेवीतच नाही.जणूकाही.....बाबा?...ऐकतोयस ना? का झोपलास?
थोडी philosophical वगैरे sound करतेय ना मी? सहा महिन्यात पाच वेळा जन्म घेणारा कुणीही philosopher बनेल.
Good for me ! बाबागिरीत काय सोल्लिड करीअर बनेल नं? 
ए बाबा, नाहीतर आयडीया! तूच का रे नाही बाबा-बिबा होत? नाहीतरी तू काहीतरी career-crisis वगैरे बोलत होतास नं मघाशी फोनवर...
काय धम्माल होईल नाही! पैसा,फेम,पावर सगळच मिळतं. अरे चक्क नट्या लग्नाची ऑफर टाकतात बोल! काय म्हणतोस? घाबरू नकोस आई झोपलीय!
.....अरे हो! आई उठायच्या आत मला तुझ्याशी सगळं बोलून घ्यायला हवं. मला बोलताना बघितलं तर shock मधेच जाईल बिचारी!  बाकी काही नाही रे बोललं की मन मोकळं होतं म्हणे. तसा तू काही टिपिकल 'male chauvinist pig' नाहीस खात्री आहे मला, पण कुणास ठाऊक उद्या तू बदलशील... जरा मी कॉलेजात जायला लागले की 'असले  कपडे घालू नको, तसली फ्याशन करू नको' टाईप फंडे झाडशील.... मुलगी आहे नं मी.....सेंटी नाही मारत रे, सेंटी मारायला मी काही आई नाही!
....मी बघ आपले doubts बोलून दाखवले. तसं उत्तरांची अपेक्षा मला नाहीच. पण आज मी prejudiced नाही . कोरी पाटी आहे तोवर बोलून दाखवते... उद्या मी तू घडवशील तशी घडेल तुझ्या 'हो' ला 'हो' आणि 'नाही' ला 'नाही' म्हणायला लागेल....I may not be so lucid tomorrow ...शिवाय  'life adds to confusion' (म्हणतात). आणि माझी तर सुरुवातच कन्फ्युजनपासून आहे! माझी एकटीचीच नाही, आम्हा सगळ्याच नव्याने जन्मलेल्या बाळांची ! काय गम्मत आहे नं!
अरे एवढा काय गंभीर झालास? मी काही concrete उत्तरं मागत नाहीये तुझ्याकडे. मला माहित आहे ती कुणाकडेच नाहीत. असती तर तू स्वतः आज एवढा confused नसतास. so chillaxx ! नाहीतरी लोक म्हणतातच 'पोरगी बापावर गेलीय' म्हणून!
बाप रे! आई उठतेय वाटतं. चल आता मी झोपते. बाकी गप्पा मी मोठी झाल्यावर करू ...अरे एक राहिलंच की, बाबा माझं नाव कधी ठेवणार आहेस तू?  ठेव काहीतरी छानसं..... 














Thursday, 14 July 2011

"कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं "


१३ जुलै २०११
मुंबई 

कसाब-
"माझी दोन वर्षाची कमाई- 
माझ्या सुरक्षेसाठी या सरकारला बसलेला ४० कोटी भुर्दंड, आजचे ३ बॉम्ब स्फोट ,१७ बळी११० जखमी...Happy birthday to myself! अजून १०० वर्षे मी इथे राहायला तयार आहे!"

गृहमंत्री आर.आर. पाटील-
स्फोटानंतर ज्या पद्धतीने  चिदंबरम, NSG , NIA , यांनी बाह्या सरसावून हालचाली सुरु केल्या ते पाहून महाराष्ट्राचे  गृहखाते  केंद्राने  दत्तक  घेतले  की काय  अशी  शंका यायला लागली.
दरम्यान महाराष्ट्राचे स्वतःचे गृहमंत्री कुठे गायब झाले कुणाला काही पत्ता नाही. नागपुराहून येतो म्हटले आणि मधेच कुठेतरी तोंड लपवून बसले. बऱ्याच जणांनी बऱ्याच शंका व्यक्त केल्या,
'यावेळेस एखादा भारी डायलॉग सुचतो का म्हणून वेळ घेत असतील... ते मागच्या वेळेसचं  "बडे बडे शहरो मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है" जरा अंगलटच आलं होतं.' 
त्यांच्या निकटवर्तीयांनी  आणि विशेषतः गृहखात्याच्या बाबू लोकांनी "गेले आबा कुणीकडे?" म्हणून एकच टाहो फोडला.
काही उत्साही मंडळींनी तर पेपरातही जाहिरात दिली.
"आपण यांना पाहिलात का?
नाव- आबा पाटील
हुद्दा- गृहमंत्री म.रा. (महाराष्ट्र राज्य) 
वर्ण- सावळा (फारच प्रामाणिकपणे  बोलायचं ठरलं तर काळा) 
कमी उंची ( शरीराची आणि कर्तृत्त्वाचीही) 
मध्यम बांधा
सदरहू इसम काल झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हरवले आहेत. शोधून देणारास चव्हाण साहेब योग्य ते इनाम देतील" ( आणि आबांना काय द्यायचं याचं ते नंतर ठरवतील!)

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण -
परिस्थिती चव्हाणांच्या कॅबीनमधेही फार चांगली नसणार. आयुष्य south block च्या चकचकीत ऑफिसांमध्ये  आणि गुळगुळीत रस्त्यांवर गेलेलेआता मुंबईच्या गल्ल्यांमध्ये गचके लागले की त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. नेहमी दाताखाली सुपारी फोडत असल्यासारखा चेहरा करून बोलणाऱ्या चव्हाणांना सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच दाताखाली खडा आल्यासारखे वाटत असेल. 
'आषाढीला पंढरपूरच्या विठ्ठलाला "देवा मुंबईत स्फोट होऊ देऊ नको रे" एवढं मागायचा नेमका विसरलो आणि तेच मुळाशी आलं' असं राहून राहून त्यांच्या मनाला वाटत असेल.

अशोक चव्हाण- 
"सालं आडनावातच काहीतरी नाट आहे!"

 विलासराव देशमुख- 
                   २००७-           "मुख्यमंत्रीच रहावं की दिल्लीत जावं?"
                   २६-नोवेंबर -  "दिल्लीतच जावं!"
                   २००९-           "अवजड उद्योग सांभाळावे का पुन्हा मुख्यमंत्रीच व्हावे?"
                   २०११-           "छे छे! ग्रामीण  विकासत्यापेक्षा मुख्यमंत्रीच व्हावे."
                   १३ जुलै-       "मुख्यमंत्री नाही झालो तेच चांगले झाले. आपले विज्ञान तंत्रज्ञान खातेच बरे आहे!"

मेडिया 
"चला महिन्याभराची सोय झाली!" 

दिल्लीतील 'anti -अण्णा, anti - बाबागट  - 
हुश्श! आता काही दिवस तरी लोकांचे  लोकपाल बिलावरचे लक्ष जरा कमी होईल."

पाकिस्तान, चीन - (एका सुरात)- 
"आम्ही काही नाही केलं बरं!"

काही उत्साही कवी-

"नेमेचि येतो मग पावसाळा
पावसात घडती स्फोटांच्या माळा

मृत्यूचे थैमान पाहवेना डोळा
माणसांचे जीव जायपालापाचोळा 

मेडियासी मग गवसतो चाळा
पाहोनिया जन कापे चळचळा

दिल्लीत नेते भरवोणी शाळा
शेजाऱ्यांच्या नावाने काढिती गळा 

जुनेच हे प्रश्न तरी किती दिस घोळा
अकलेसि बसले का लावूनिया टाळा

असलिया सरकारा नेउनिया जाळा
श्वान पीठ खाय दळतो आंधळा"

मृत  
"सुटलो एकदाचे..."

Monday, 4 July 2011

जुन्या डायरीतलं एक पान - "सिग्रेट"

पुस्तकातून डोकं काढून वर बघितलं.खिडकीच्या काचाबाहेर आकाशाचा काळाभोर रंग बदलून निळसर होत आला होता. पहाट झाली. खुर्चीतून उठून खिडकी उघडली. थंड हवेच्या झुळूकीसोबत काही देशभक्तीपर गाण्यांचे सूर ऐकू आले. आज २६ जानेवारीचा दिवस होता. अंगावर कपडे चढवले आणि लांब एके ठिकाणी खास चहा पिण्यासाठी म्हणून मी रूममधून बाहेर पडलो. वातावरणात बरीच स्फूर्ती होती. पायातल्या चपलांकडे बघत मी पावले उचलीत होतो. डोक्यात डॉक्टर झिवागो घोळत होता. युरी,लारा,पाशा मेंदूत फेर धरून नाचत होते......हवेत चांगलीच थंडी होती.कॉर्नरजवळ आलो तसे गाण्यांचे आवाज अजूनच ऐकू येऊ लागले.
"ऐ मेरे वतन के लोगो..."
"मेरे देश की धरती सोना उगले ,उगले हीरे मोती"
२६ जानेवारी....लहानपणी हा दिवस म्हणजे किती धावपळ असायची! सकाळी प्रभातफेरी,पांढरा शर्ट हिरवी चड्डी घालून आम्ही सगळ्यात पुढे उभे राहायचो. नेकटाय,ईन शर्ट ,आईने एका हातात दोन्ही गाल पकडून चोपून पाडलेला भांग, पावडर, बूट, सॉक्स... सगळ्या गावातून प्रभातफेरी एक एक गल्ली करत पुढे जायची. मामा चौक,बुधवार पेठ,शुक्रवार पेठ,काळी पेठ... असं सगळ्या गावाला वेढा टाकून परत झेंडा चौक,पोलीस स्टेशन करीत बहिर्जी शाळेपर्यंत. गल्ल्यागल्ल्यांतून आम्ही घोषणा देत निघालो की लोक प्रभातफेरी पहायला जमायचे.ओट्यावरून,बाल्कनीतून,नळाच्या लाईनीतून....जुन्या गल्लीत दाराच्या गोणपाटी पडद्याआडून मूल कडेवर घेऊन बघणाऱ्या मुस्लीम बायका...सगळे कौतुकाने बघायचे.आम्हाला अजूनच चेव यायचा. घोषणा देऊन देऊन घसा बसला तरी आम्ही त्वेषानं सुरूच ठेवायचो-
"एक रुपैय्या चांदी का, देश हमारा गांधी का"
"पुढे चला रे पुढे चला,गांधीजी की जय बोला"
"बसमत हो या कोहिमा,भारत हमारी एक माँ"
"महात्मा गांधी ,अमर रहे"
१५-१६ वर्षांपूर्वी नेमका या वेळेला मी कुठे असेल?
प्रभातफेरीमध्ये सगळ्यात पुढे तिरंगा झेंडा हातात घेऊन बुधवार पेठेच्या रस्त्यावरून जात असेल की मामा चौकात रस्त्याच्या कडेने कौतुकाने बघणाऱ्या एखाद्या ओळखीच्याला  पाहून अजून मोठ्याने घोषणा देत असेल?

....आणि १५-१६ वर्षानानंतर नेमका या वेळेला मी आज या ठिकाणी दोन रात्रीचं जागरण डोळ्यावर घेऊन,भणभण डोक्यानं फकाफक सिगरेट पीत बसलो होतो. केस विस्कटलेले, दाढीचं खुंट वाढलेलं ,कपडे अस्ताव्यस्त, मागचा काही हिशोब नाही,पुढचा काही अंदाज नाही.
रूमवर परतून कपडे न काढता नुसताच डोळे उघडे ठेवून पलंगावर पडून राहिलो.डोळे जड पडत चालले .डोक्याखालची नागवी उशी कानावर घेतली अन पायाची पोटाशी मुटकुळी करून डोळे बंद केले तशी मला झपकन गुंगी आली.
जाग आली तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते.  डोकं अजूनही भणभणत होतं. होस्टेलमध्ये सगळीकडे नीरव शांतता होती. उठून बसलो. डोकं चांगलंच दुखत होतं. दोन्ही हातांनी डोकं गच्च ठरून ठेवलं.नंतर तेच हात डोळ्यांवर जरावेळ दाबून धरले.जरा बरं वाटलं तसं मी हात खाली घेतले. आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून त्यांच्याकडे बघत बसलो. हातावरच्या रेषा, हातावरचे तीळ,बारावीला हात जाळून घेतल्याच्या खुणा... चंद्रपर्वतावर तीळ असला की माणूस आत्महत्या करतं म्हणे...ही सगळ्यात छोटी आहे ती आयुष्यरेषा...हुश...मी एक मोठा उसासा टाकला.टेबलाकडे समोर नजर गेली. 
सिगरेट! सिगरेट प्यावी!
झटकन उठून टेबलावर चाळाचाळ करायला लागलो.टेबलावर डाव्या बाजूला पुस्तकांची थप्पी होती. Text -books सगळ्यात खाली.वरती सगळी इंग्रजी नॉवेल्स- Doctor Zhivago, Men are from mars , psycho -analysis, Body Language, Five point someone, Emotional Intelligence...सगळ्यात वर डायरी! या थप्पीच्या बाजूला अस्ताव्यस्त पडलेल्या कागदांवर शुभदाने गिफ्ट दिलेली छोटीशी पिशवी, तिच्याखाली  लोकलची, BEST ची तिकिटे गजबजून पडलेली.टेबलावर ऐसपैस पसरलेलं DON'T QUIT चं पोस्टर. त्याच्या वर, खाली आडव्या तिडव्या स्केचेस काढून ठेवलेले काही,काही कोरे कागद, Mid Day चे एक दोन उघडे अंक. उजव्या कोपर्यात धुळीचा थर साचलेलं बिन-कवरचं medicine चं पुस्तक.त्याच्या बाजूला कुणीतरी फार आधी इथे विसरून गेलेल्या चाव्यांचा जुडगा,टेबलाच्या उघड्या सन्माईकवर धूळ धूळ. डाव्या कोपर्यात पिंजारलेला टूथ ब्रश आणि चुरागाळलेली टूथ पेस्ट.पाण्याची बाटली. धुळीत पाण्याच्या बाटलीमुळे उमटलेले अगणित गोल-गोल रिंग्स, एकमेकांत गुंतलेले, वाळून आता permanent झालेले.
सिग्रेट? सिग्रेट?
हां! Mid Day खाली एक सिगारेट सापडली. ती उलटी करून फिल्टरच्या बाजूने टेबलावर दोन-तीनदा आदळली. नंतर ओठात अलगद धरून ठेवली. अन  "माचिसमाचिस?"  म्हणून पुटपुटत टेबलावर इकडेतिकडे बघायला लागलो.
Medicine जवळ पडलेल्या सोपच्या फुटक्या पुडीजवळ AIM ची  माचिस सापडली. हातात घेऊन आधी ती दुसऱ्या बाजूने वळवून पहिली. पाठीमागे लिहिलं होतं,
" success is a capacity to go from failure to failure without losing your enthusiasm".
 माचिस उघडून बघितली. हत्. हिच्यात फक्त तीन जळलेल्या काड्या अन थोडी ash . बेफिकीरीने मी ती  माचिस टेबलावर फेकून दिली आणि दुसरी शोधायला लागलो.
Mid Day  उचलून बघितलं. एक दोन कोरे कागद......छे!
तिकिटांच्या गठ्ठ्यात एक  माचिस उभी पडलेली दिसली. पटकन उचलून मी उघडली. मध्ये तीन जळलेल्या कड्या अन थोडी ash ! पुन्हा तीच  माचिस उचलली होती!
यावेळेस काळजीपूर्वक मी ती माचिस टेबलाच्या उजव्या कोपऱ्यावर ठेवली अन मनात म्हटलं ,
"ही नाही"
नंतर ओठातली सिगारेट काढून हातात घेतली. सिगारेट जास्त वेळ ठेवल्यास ओठांना चिकटते.नंतर दोन्ही हातांनी खादीचे खिसे, प्यांटचे पुढचे मागचे खिसे चाचपून पहिले... नाहीच!
कपाटाकडे नजर गेली.झपाझप दोन ढांगात कपाटाकडे पोहोचलो.वरच्या,मधल्या,खालच्या फळ्यांवर पाहिलं. 
"इथेही नाही."
मग हँगरला लटकवलेले एकेक ड्रेस बाजूला करून पहिले. एक प्यांट...एक शर्ट... प्यांट...प्यांट-- ह्या प्यांटवर डाग कसला पडलाय? पुन्हा शर्ट...काय शोधतोय आपण?.....हां,  माचिस
"छ्या, इथं नाही."
सिग्रेटवाला  हात झटकून मी मागे वळलो. टेबलावर येऊन व्यवस्थित थप्पीतलं एक-एक पुस्तक बाजूला सारून बघितलं... माचिस... माचिस...तिकिटांच्या गर्द्यात चिवडून पाहिलं... माचिस... माचिस...पुन्हा DON'T QUIT, स्केचेसचे कागद, Mid Day उचकून पाहिलं.... माचिस.... माचिस....पेस्ट,ब्रश उगाच एका जागचा हलवून दुसरीकडे ठेवून त्या जागेकडे पाहिलं.... माचिस.... माचिस....उजवीकडे भिंतीच्या बाजूने टेबलावर बघत धुळीतल्या medicine कडे बघितलं..... माचिस..... माचिस....medicine , DON'T QUIT , चाव्यांचा जुडगा.....माचि....हांssss  सापडली!!!   
Reflexively हातातली  सिग्रेट  तोंडात  ठेवून  मी  झटदिशी   माचिस  उचलून  खर्रकन  उघडली........पुन्हा तीन जळलेल्या काड्या अन थोडीशी ash !!!
"च्याSSSयला !"
मी वैतागून ती डबी बंद केली अन आधी खिडकी उघडून ती माचीस रागाने बाहेर भिरकावून दिली. रागातच खिडकी खाडकन बंद करून चिडून एकदा सगळ्या टेबलाकडे बघितलं. एक पाउल मागे झालो अन अभावितपणे ड्रावरला हात घालून मी ते मागे ओढलं. नजर टेबलावरच. ड्रावरचा उघडताना खट्...घर्रर्र असं आवाज झाला तशी नजर ड्रावरकडे गेली. सरळ मधे....... माचिस!
एकदा खिडकीकडे अन एकदा टेबलावर बघत मी साशंकतेने ती माचिस हातात घेतली अन कानाजवळ नेऊन हलवून बघितली.
ही नवी होती.
एव्हाना सिग्रेट पुन्हा ओठांना चिकटली होती. सिग्रेट पेटवायला काडी ओढल्यावर भर्रर आवाज होऊन जाळ झाला अन धूर सरळ नाकात गेला. चेहरा बाजूला करून मी काडी थोडा वेळ लांब धरली आणि नंतर मान खाली वळवून ती जळती काडी सिगारेटच्या तोंडावर धरली.
सिग्रेट पेटली तसा काडीचा अन सिगरेटचा धूर सरळ वर चढत डोळ्यात गेला. डोळ्यात तीक्ष्ण चरचर झाली.दोन्ही डोळ्यातून लगेच टळकन पाणी आलं.
"च्यायला! काय त्रास आहे!"
मी काडीचा चटका बसायच्या आत ती दूर दरवाज्याजवळ फेकली. जरा वेळ डोळे बंद ठेवून लपलप करीत उघडले. गालावरचे अश्रू पुसले.डोळ्यांच्या कडा कोरड्या केल्या.आणि सिगरेटच्या जळत्या लाल टोकाकडे बघत एक दीर्घ कश घेतला. सगळा धूर छातीत घेताना मी डोळे मिटले अन तसाच जरा वेळ धूर मधे धरून ठेवला.
"काहीच विचार करायचा नाही"
डोळे उघडून मान वर करून छताकडे बघत सगळा धूर वर सोडला.
"काहीच विचार करायचा नाही"